Showing posts with label आठवणी. Show all posts
Showing posts with label आठवणी. Show all posts

21 January, 2019

सुभाष




काॅलेज सोडून नियमित जाॅब पकडावा, असा विचार डोक्यात होता. फर्स्ट ईयर डिस्टिंक्शनमध्ये पास झालेलो. पण सेकंड ईयरला अॅडमिशन घेण्यासाठी १५ हजार रुपये नव्हते. सगळी धावाधाव संपल्यानंतर अखेर सुभाषला याबाबत सांगितलं. त्याने तातडीने १० हजार रुपये रोख हातात ठेवले आणि म्हणाला, आरामात परत कर. पण शिक्षण सोडू नकोस.


सुभाषसारखे आजच्या जगात सहसा भेटत नाहीत. निस्वार्थी आणि मुक्तहस्ताने मदत करणारे. सुभाष वेगळा आहे. अफाट संवेदनशील माणूस.


खरंतर वरील प्रसंग हा माझ्याबाबतीत घडला म्हणून सांगितला. आणि हा फक्त एक झाला. असे असंख्य प्रसंग सुभाषच्या खात्यात जमा आहेत. सुभाषने माणसं कमावलीयेत. तो खरा श्रीमंत आहे.


सुभाषच्या या जाणीवेमागे असंख्य खाचखळग्यांचा इतिहास आहे. मुळात चढ-उतार पार केल्याशिवाय अथांग समुद्राचा अनुभव गंगा-यमुनेसारख्या महानद्यांनाही चुकला नाही. तिथं आपली काय बात? तसंच काहीसं सुभाषचं आयुष्य भन्नाट वळणांचं, अतिव दु:खाचं आणि अफाट इनस्पिरेशनल आहे.


माझी आणि त्याची भेट झाली मुंबईतील विलेपार्ल्यात. संत जनाबाई रोडवरील जाधवांच्या पेपर स्टाॅलवर. पेपरलाईन टाकून चहा पित बसलो असताना, सुभाष पेपर टाकत तिथे आला. त्याला पेपरलाईनसाठी पोरगा हवा होता.


त्याचवेळी मी जिथे पेपर टाकायचो, त्याने दोन-एक महिन्याचा पगार दिला नव्हता. जाधवांनी सूचवलं, याच्याकडे काम करणार का? तातडीने हो म्हणालो. सुभाषचं नाव पार्ल्यातल्या पेपरवाल्यांमध्ये आदरानं घेतलं जाई. त्यामुळे तशी ओळख होतीच. बस्स आमच्या ओळखीचा आणि पुढच्या काळात मैत्रीचा प्रवास इथून सुरु झाला. सुभाष अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक झाला.


सुभाषशी ओळख असणं अभिमानाची बाब वाटावी, इतका सच्चा माणूस. एकास दोन नाही. अगदी आत एक-बाहेर एक. स्पष्ट आणि सरळ. मात्र साधा. याच साधेपणामुळे अनेकांनी त्याला फसवलंही. पण तो तरीही आपला मदत करण्याची सवय सोडली नाही. सुभाषकडे काम करता करता कित्येकांना मदत करताना आणि कित्येकांनी हजारो रुपयांना सुभाषला फसवल्याचं ऐकलंय. 'जाऊदे, कुठे नेणाराय पैसा.' असं बोलून त्याचा प्रवास सुरुच आहे. अविरत आणि अखंड. सुभाषच्या या स्वभावाचं मला फार कौतुक वाटतं.


सुभाषचा वैयक्तिक प्रवास खाचखळग्यांचा आहे. मात्र तेवढाच इनस्पिरेशनल. माणूस म्हणून घडण्याचा प्रवास.


कळतही नव्हतं, त्या वयात सुभाषच्या आईचं निधन झालं. मग शाळा शिकत असतानाच गावातल्या किराणा मालाच्या दुकानात कामाला राहिला. शेतात कामं करत, शाळेपासूनच नोकरी करत शिक्षण घेतलं. दरम्यान वडिलांनी दुसरं लग्न केलं. आईची माया ती आईचीच. हे कळू लागल्यानंतर त्याने अभ्यासातली गोडी वाढवली आणि दहावी-बारावी पूर्ण केली. पुढे पदवीचं शिक्षण घेऊन मुंबईत आला. मात्र शिक्षणाच्या जोरावर नोकरीची वाणवा असल्याने मिळते ते काम करत गेला.


हनुमान रोडवरील फुलांच्या दुकानात काम करुन, खाण्या-पिण्याची आणि त्या दुकानातच झोपण्याची व्यवस्था झाली. पुढे पेपरलाईन टाकू लागला आणि मग स्वत:ची पेपरलाईन सुरु केली. मधल्या काळात कुठेच आधार मिळेना म्हणून हनुमान रोडवरच्याच गझाली हाॅटेलच्या फूटपाथवर वडापव पोटात सारुन कित्येक रात्री घालवल्या. मातीचं आंथरुण आणि आभाळाचं पांघरुण. बस्स!


या सर्व गोष्टींना आता १५ हून अधिक वर्षे लोटली. रत्नागिरीतल्या चिपळूणपासून सुरु झालेला प्रवास मुंबईच्या सावलीत विसावलाय. आता पार्ल्यातील एका चांगल्या भागात रुम घेऊन, पत्नी आणि चिमुकल्या मुलीसोबत स्थायिक आहे. इतक्या खाचखळग्यांची जाणीव मनात कायम ठेवून, अशाच स्थितीतून कुणी आला असेल तर सुभाष मदत करायला मागे पुढे पाहत नाही. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळू नये, इतका दानशूर. या व अशा अनेक गोष्टींमुळे त्याचा मित्रपरिवारही अफाट आहे.

18 July, 2018

वारी : काही आठवणी आणि काही प्रश्न

फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी
मूळ नाव ज्ञानेश्वर, शाळेत दाखल करताना आजोबांनी ज्ञानदेव सांगितलं, लिहिणाऱ्याने नामदेव लिहिलं...असा माझ्या नावाचा प्रवास. पण ज्ञानेश्वर असो, ज्ञानदेव असो, वा नामदेव. तिन्ही नावं वारकरी संप्रदायाशी संबंधित आहेत. नाव ठेवण्यामागे अर्थात आजोबांचं वारकरी संप्रदायातील असणं कारणीभूत आहे. लहानपणापासून घरात - गावात - पंचक्रोशीत वारकरी संप्रदायाबद्दल प्रमाणिक श्रद्धा आहे.
आधी केवळ देव-धर्म म्हणून वारकरी संप्रदायाबद्दल आदर होता, मात्र पुढे तुकोबा वाचल्यानंतर विचारानेही या परंपरेशी जोडला गेलो. तमाम संतांच्या जीवनातून बंधुभावाचीच शिकवण दिली गेलीय. आपण किती अंगीकारली हा पुढचा वादाचा मुद्दा. पण संतपरंपरा ही एकता आणि बंधुभावावर आधारलेली आहे, एवढे निश्चित.
चौथीत असताना माझ्या हट्टामुळे आणि सहावीत असताना आजोबांनी स्वत:हून - अशा दोनवेळा आजोबांनी पंढरीची वारी घडवली. वारीशी संबंधित एक रंजक आठवण आहे. आजोबांचं बोट धरुन पंढरीच्या डेपोत एसटीतून उतरल्यावर घोषणा ऐकायला आली - "यात्रेचा काळ आहे. चोरांचा सुळसुळाट आहे. आपापल्या बॅगांवर लक्ष ठेवा." घोषणा ऐकून आजोबा कुजबुजले, "आम्हीही चोरीच करायला आलोय - बा पांडुरंगाच्या आशीर्वादाची चोरी करायला."
आमच्या गावाकडं वारकरी संप्रदाय चांगला रुजला आहे. मुळात शेतकरी समाज असल्याने वारकरी संप्रदायासारखं तळातल्या माणसांचं जगणं सांगणारा संप्रदाय रुजण्यास सुपिक वातावरण होतं. आणि तसेच झाले. आजही सगळ्या एकादशा नित्यनेमाने साजऱ्या केल्या जातात. दिवंगत सोनब अण्णा कदम यांनी बंधुभावाचा संदेश देणारे किर्तन गावा--गावात केले. लोकांना वारकरी संप्रदायाशी जोडले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रवीण दादा हा वारसा सक्षमपणे पुढे नेत आहे. एकंदरीत मनाने-तनाने वारकरी परंपरेशी जोडला गेलेला आमचा परिसर आहे.
पुढे मुंबईत आल्यानंतर वाचनाकडे वळलो. एका दिवशी तात्यांचं म्हणजे आदरणीय डॉ. आ. ह. साळुंखे यांचं 'विद्रोही तुकाराम' हाती आलं. वैचारिकतेनेही संतपरंपरेशी अधिक घट्टपणे जोडला गेलो. वारकरी संप्रदायाशी जोडला गेलो असलो तरी, काही गोष्टी कायम प्रश्नांकित करत आल्यात. त्यावर आता बोलावं वाटतंय. किंवा वरील सारा लेखनप्रपंच त्या प्रश्नांसाठीच केलाय.
चंद्रभागेच्या वाळवंटी नाना जाती-धर्माची माणसं एकरुप होतात. जाती-धर्माची लेबलं पंढरीच्या बाहेर सोडतात आणि पंढरीच्या विठ्ठलाच्या नामात दंग होतात. कुणीही स्पृश्य-अस्पृश्य राहत नाही. वारीतला प्रत्येकजण केवळ 'वारकरी' असतो. मात्र हेच वारकरी जेव्हा पंढरीची वारी करुन आपापल्या गावात पोहोचतात, तेव्हा पुन्हा आपल्या जाती-धर्मात का शिरतात? (अर्थात अपवाद आहेत. नाही असे नाही.) संतपरंपरेनी विश्वबंधुभावाचा संदेश दिला, तो पंढरीत आपण अंमलात आणतो, मग परतल्यावर का विसरतो? आजूबाजूला जाती-धर्मात विघातक तेढ निर्माण होत असताना, आपल्याला याचे उत्तर नक्कीच शोधायला हवे.
फ्रेंच राज्यक्रांतीने स्वतंत्र्य, एकता बंधुता ही मूल्य दिली असे म्हणतात. मात्र आपल्या वारकरी संप्रदायाने फ्रेंच राज्यक्रांतीच्या साडेसातशे वर्षांपूर्वीच एकता आणि बंधुभावाची शिकवण दिली. ते आपण किती लवकर विसरलो.
ज्या संतपरंपरेने आपल्या वारकरी संप्रदायाच्या चळवळीचं नेतृत्त्व संत सोयराबाई, संत जनाबाई यांसारख्यांच्या खांद्यावर सोपवलं. त्याच परंपरेतील आपण स्त्रियांना का दुय्यम वागणूक देत असून, स्त्रियांकडे कमकुवत म्हणून का पाहतो?
असे अनेक प्रश्न आज मनात घिरट्या घालतात. वारकरी संप्रदायाबद्दल आस्था असल्याने या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपण घेतला पाहिजे आणि आपली परंपरा अधिक सक्षम बनवली पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय हा या भूमीतल्या आधुनिकतेचा अविष्कार आहे. आपण परंपरा जपली पाहिजे. कारण अशी परंपरा जगातल्या खूप कमी समूहांच्या वाट्याला आली आहे. आपण त्यात नशीबवान आहोत.

नामदेव अंजना

02 February, 2018

पाईपलाईन



लहानपणी कधी मुंबईत एसटीने यायचो, त्यावेळी रस्त्याच्या समांतर जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनचे फारच कुतूहल वाटायचे. अत्यंत सहज पळायच्या. एखाद्या सापासारख्या वळवळत. नागमोडी वळणे घेत. गाडीच्या वेगाने सुसाट.

एखाद्या सुंदर मुलीच्या कपाळावरील केसांचा झुपका ज्या लयीत तरंगत असतो ना, तशा लयीत पाईपलाईन दोन छोट्याशा टेकडीवर तरंगताना दिसायच्या. एखाद्या अडवळणाला सहज वळसा घालत आपल्या सोबत पुढल्या प्रवासाला यायच्या.

कधी एखाद्या करवंदीच्या जाळीत लपत छपत, कधी उजाड माळरानावर एकटीच सळसळत... कधी कधी तर सिमेंटच्या भिंतीची बंधनं तोडत बाहेर येणाऱ्या पिंपळाच्या झाडासारखी ती पाईप लाईन कुठल्यातरी कठड्यातून बाहेर यायची... किती कौतुक वाटायचं तिचं!

का धावत येत असेल आपल्यासोबत? कुठे जात असेल ती? कुणाला भेटायला तर जात नसेल? आणि जात असेल, तर कुणाला भेटायला? तिचा कुणी सखा?... नाना प्रश्न पडायचे.

प्रवासात आपल्याला कधी तहान लागेल, म्हणून त्या पाईप लाईन आपल्यासोबत रस्त्याने येत असाव्यात, असेही वाटून जायचे कधी कधी. अन् मग असे वाटून, तिच्याबद्दल प्रचंड आदर वाटायचा, आपुलकी वाटायची.

मग शहर जवळ आलं की, पाईपलाईन गायब व्हायची. कुठे गेली, म्हणून नजर तिला शोधत बसायची. इतक्या प्रवासात ती सोबत असायची. तीही आपल्यासोबत मुंबईला येतेय, असं वाटायचं. मग दिसेनाशी झाली की वाईट वाटायचं. आणि काही वेळाने, ती तिच्या घराकडे गेली असावी, असे म्हणत तिला पुढल्या प्रवासापर्यंत विसरुन जायचो.

एखाद्या पाण्याच्या पाईपलाईन सोबतही आपले ऋणानुबंध जुळावे. किती अप्रूप करणारी गोष्ट वाटते आता. पण एक नक्की, निर्जीव गोष्टी कधीच विश्वासघात करत नसतात. त्या फक्त मैत्री निभावतात. त्या कधीच बदलत नाहीत. त्यांच्याशी झालेली मैत्री चिरंतर असते.

28 June, 2017

आकाशच्या इंटरकास्ट लग्नाची गोष्ट

आता जवळपास महिना व्हायला आलाय आकाश आणि निकिताच्या लग्नाला. या दोघांच्या लग्नाचा प्रसंग थरारक आहे. लग्नाचा दिवस तर विसरुच शकत नाही. मुळात थेट लग्नाचा प्रसंग सांगण्याऐवजी एकंदरीतच बॅकग्राऊंड सांगण्याची गरज वाटते. थोडी लांबलचक वगैरे पोस्ट होईल.. पण ठीकंय. खूप दिवस लिहीन म्हणत होतो. पण राहत होतं. म्हणून लिहितोच.

कॉलेजच्या काळापासून, विशेषत: डिग्रीच्या फर्स्ट ईयरपासून एक मित्र अधिक जवळचा होता. तो म्हणजे आकाश लोणके. मी पार्ल्यातल्या विमानतळाजवळील झोपडपट्टीत राहायचो आणि आकाश तिथेच पुढे आंबेडकरनगरमध्ये. कॉलेजला येणं-जाणं सोबत. पुढे आणखी एक मित्र जोडला गेला, तो म्हणजे राजेश पाटील. आता असे एकूण तीन मित्र झालो. अगदी जिगरी.

कॉलेजमध्ये अनेक खाच-खळग्यांच्या दिवसात आकाश, राजेश आणि मी एकमेकांना मदतीचा हात देत राहिलो. अगदी कोणत्याही अपेक्षेविना. अर्थात खऱ्या मैत्रीत अपेक्षा नसतेच. अगदी तसंच. पुढे कॉलेज संपलं आणि आम्ही आपापल्या कामाच्या शोधात निघालो. मध्यंतरी आकाश 'मुंबई मित्र'ला कामाला लागला, मी एबीपी माझात. राजेशच्या जॉबचं काही झालं नाही. कारण त्याच्या घरीच असंख्य प्रॉब्लेम सुरु होते. तर एकंदरीत तिघेही आपापल्या कामात, अडचणींमध्ये व्यस्त होतो. बोलणं-चालणं-भेटणं सुरु असायचं.
( फोटो : कोर्टात लग्नाची प्रोसेस पूर्ण करुन आल्यानतंर पोलिस स्टेशनला जाण्याआधी रेस्टॉरंटमध्ये जेवताना एकीकडे - निकेतन भोसले, राजेश पाटील आणि मी... तर दुसरीकडे - आकाश आणि निकिता )
तिघांबाबत एक अत्यंत वाईट योगयोग आहे. तिघांच्याही वडिलांचे छत्र हरपलंय. म्हणजे आकाशाचे वडील वारले, त्याच्या दोन वर्षांनी माझे आणि नंतर दोन वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी राजेशचे. तिघेही आपापल्या जागी स्थिरावण्याच्या प्रयत्नात होतो. त्यातले मी आणि आकाश कामाच्या बाबतीत बऱ्यापैकी स्थिरावलोही. राजेशची हेळसांड अधिक होते. अगदी आजही. त्याच्या पप्पांच्या आजारपणाच्या काळात त्याने खूप सोसलंय. त्याने खूप चढ-उतार पाहिलेत.

दरम्यानच्या काळात तिघांचं भेटणं सुरुच होतं. बोरिवलीच्या 'लाजरी' बारमध्ये किंवा पार्ल्याच्या 'शिवलीला' बारमध्ये अनेक संध्याकाळ घालवल्यात. (तिघांपैकी कोण पितो, हे विचारु नका). अशी एकंदरीत आमची मैत्री. माझ्यासाठी तर हे दोघे जीवाभावाचे आहेत. मुळात तिघेही एकमेकांसाठी महत्त्वाचे. कुठल्याही अडचणीत सोबत असतोच. आधार म्हणून. फक्त एकमेकांना हाक मारायची. बस्स. असे मित्र मिळणं खूप नशीब लागतं. खूप.

आता मुद्द्यावर येतो. खूप दिवस बोलणं नाही झालं. म्हणून राजेशला 10 की 11 मे रोजी फोन केला. म्हटलं, "किधर है पाटील? जिंदा है ना? कब मिल रहा है?"... राजेश म्हणाला, 'ते सर्व सोड... आकाश शादी कर रहा है.. 30 जून को.. तू पण ये.. बाकी का उसको फोन लगा के बात कर'.

आकाश लग्न करतोय आणि आपल्याला माहित नाही, असं कसं कसं शक्यय. थेट आकाशला फोन केला आणि विचारलं. तर म्हणे, "हो.. रे. शादी कर रहा है. लेकीन थोडा प्रॉब्लेम है.. लडकी के घरवाले तयार नहीं है.".. म्हटलं, हे काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय. मग आकाशकडे नीट चौकशी केली. तेव्हा कळलं, मुलगी (निकिता) उत्तर प्रदेशातली आहे. जातीने ब्राम्हण आहे. आणि आमचा आकाश महार. (मला ही जात वगैरे सांगायची नव्हती, पण त्याचं संदर्भ पुढे स्पष्ट होईलच.)

माझ्या डोक्याचा भुगाच झाला. म्हटलं ब्राम्हण आहे म्हटल्यावर विरोध तर होणारच होता. आकाशला फोन केला आणि विचारलं, "काय करायचं ठरवलंयेस?".. तर म्हणे, "पळून लग्न करणार. निकिता तयार आहे. कुछ प्रॉब्लेम नहीं आएगा"... तरी मला काही सूचत नव्हतं. पुन्हा आकाशला विचारलं, "निकिता ऐनवेळी पलटणार नाही ना? पोलिसांसमोर ती रडली, तरी तू गोत्यात येशील. कारण ती शेवटपर्यंत निर्णयावर ठाम राहायला हवी."... तेव्हा मग आकाशने सांगितलं की, ती देईल साथ वगैरे किंवा पलटणार नाही वगैरे. मग आम्हालाही धीर आला. म्हटलं, जे होईल ते होईल.. बघू काय ते.

30 मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईतील खारच्या कोर्टात गेलो. सोबत निकेतन भोसले, राजेश पाटील होतेच. म्हणजे आता कोर्टात मी, राजेश, निकेतन, आकाश आणि निकिता असे एकूण पाच जण होतो. आकाशच्या वकिलाने सांगितल्याप्रमाणे पॅनकार्ड आणि आधारकार्ड घेऊनच आलो होतो. तीन साक्षीदार लागतात म्हणून आम्ही तिघे मित्र. लग्नाची प्रोसेस पूर्ण झाली. कोर्टाच्या बाहेर आलो.

खरंतर लग्नाची प्रोसेस फार कठीण नव्हती. मात्र आता यापुढे सर्व कठीण दिसत होतं. आकाशचा तर चेहराच उतरला होता. राजेशही मला हळूच म्हणाला होता, पोलिसांसमोर निकिता नीट बोलायला हवी, नाहीतर आपले सर्वांचेच लागतील. पण मला आकाशचे शब्द आठवत होते. आकाश म्हणालेला, निकिता नाही घाबरणार, ती धाडसाने बोलेल वगैरे. आणि आकाशवर माझा पूर्ण विश्वास होता.

आम्ही कोर्टाखाली आल्यावर ठरवलं, चला सेफ्टीसाठी आता पोलिस एनसी करायची. म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. पण थोडी भीती मनात होती. ती म्हणजे पोलिस निकिताला हजार प्रश्न विचारणार. त्यात तिला मराठी नीट जमत नाही. ती कुठे अडखळली आणि घाबरली तर पोलिस पटकन निगेटिव्ह होतील. त्यात एका पत्रकार मित्राला फोन केल्यावर कळलं की, पोलिसांकडे गेल्यावर ते निकिताच्या आई-वडिलांना बोलावतील. आता तर मलाही भीती वाटायला लागलेली. पण चेहऱ्यावर भीती दाखवून काहीच उपयोग नव्हता. कारण आकाशच्या चेहऱ्यावर आधीच काळजी दिसत होती. त्यात आपणही घाबरलेलो दिसलो, तर मग बट्याबोळच सगळा.

म्हटलं, चला... जो होगा देखा जाएगा. राजेश पाटील आणि निकेतन भोसले बाईकवरुन विलेपार्ल्याला पोहोचले. मी, आकाश आणि निकिता ट्रेनने पार्ल्याला आलो. पार्ला स्टेशनबाहेर 'आरके' हॉटेलमध्ये जेवण केलं आणि रिक्षाने एअरपोर्ट पोलिस स्टेशनला निघालो. पोलिस स्टेशनला जाईपर्यंत पार वाट लागली होती. काय होईल माहित नव्हतं. पण तरीही हसता चेहरा ठेवणं भाग होतं.

अखेर दुपारी पोलिस स्टेशनला पोहोचलो. थोडी भीती वाटत होती. पण आकाश के लिए कुछ भी.... म्हणून निर्धास्तही होतो. दोस्तासाठी काय होईल, ते बघू. बिनधास्त राहायचं, हे राजेश, निकेतन आणि मी तिघांनीही मनोमन ठरवलेलं.

गेल्या गेल्या पोलिसांना सांगितलं, कोर्ट मॅरेज केलंय. पण निकिताच्या घरी माहित नाही. निंबाळकर करुन इन्स्पेक्टर होते तिथे. अत्यंत समजूतदार माणूस. तेच म्हणाले, "काळजी करु नका. बसा त्या बाकड्यावर.".. आम्हा पाचही जणांच्या चेहऱ्यावरील टेन्शन त्यांनी ओळखलं असावं. निंबाळकरांनी त्यांच्या हवालदाराला सांगितंल, "त्यांना पाणी द्या."... पाणी वगैरे प्यायल्यानंतर त्यांनी आकाशला उठवलं आणि सटासट प्रश्नांची सरबत्ती केली. काय करतो, कधीपासून प्रेम होतं, कधीपासून ओळखता, तुझ्या घरी कोण असतं, तिच्या घरी कोण असतं, तुझं वय काय, तिचं वय काय..... वगैरे वगैरे. आकाश भांबावून गेल्याचं मला लक्षात आलं.

मी उठलो. निकेतन बाकड्यावर बसला होता. निकेतनमुळे खूप आधार वाटत होता. कारण त्यानेही चेहऱ्यावर अजिबात टेन्शन असल्याचे दाखवलं नाही. राजेश पोलिस स्टेशनच्या पायऱ्यांवर बाजूला बसला होता. तर मी उठलो आणि निंबाळकरांच्या समोर गेलो. मला म्हणाले, तू कोण आहेस.. म्हटलं, "नामदेव अंजना. आकाशाच मित्र आहे. एबीपी माझात काम करतो.".. तर म्हणे, "आयडी दाखव,".. संध्याकाळी शिफ्टला यायचं होतं म्हणून आयडी सोबतच होता. आयडी दाखवला. त्यात आकाशही पत्रकारच. फक्त त्यावेळी त्याच्याकडे आयडी नव्हता. पण पत्रकार म्हटल्यावर त्यांचं आमच्याशी बोलण्याची शैलीच बदलली. तसेही ते अत्यंत चांगले वागत होते. पण बाकी गोष्टीतही खूप मदत झाली.

पोलिसांनी जबाब नोंदवायला सुरुवात केली. अर्थात निकिताचा. मुलाच्या म्हणण्याला यावेळी काही अर्थच उरत नाही. निकिताकडून त्यांनी सारं लिहून घेतलं. कुणी दबाव आणला नाही ना वगैरे. निकिताही तोपर्यंत निर्धास्तच होती. त्यामुळे तिने न घाबरता सर्व माहिती सांगितली, सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. एक टप्पा पार केला. त्यामुळे आम्हा सर्वांच्याच जीवात जीव आला. पण पिक्चर अभी बाकी था...

पोलिसांनी प्रोसेसप्रमाणे निकिताकडून तिच्या आई-पप्पांचा फोन नंबर घेतला आणि कॉल केला. तिचे पप्पा कुठेतरी बाहेर होते. आईला फोन लागला. तिला पोलिसांनी बोलावून घेतलं. आता तर राजेश, निकेतन आणि माझी थोडी काळजी वाढली होती. आणि आकाशच्या चेहऱ्यावरील टेन्शन तर लख्खपणे दिसत होतं.

त्यात एक गोष्ट चांगली घडली, पार्ल्याचे शिवसेना शाखाप्रमुख नितीन डिचोलकर तिथे आले होते. डिचोलकरांना पार्ल्यात असल्यापासून ओळखत होतो. हनुमान रोडच्या गोकूळ कट्ट्यावर चहा प्यायला रोज संध्याकाळी तिथे असतात. प्रकरण जास्त टोकाला वगैरे गेलं तर आधार म्हणून डिचोलकर असल्याने बरं वाटलं.

काही वेळाने पोलिस ठाण्याच्या आवारात मोठ्याने आवाज करतच निकिताची आई, आजी, भाऊ, काका आणि एरियातले काहीजण आले. झुंबडच्या झुंबड आली आणि आम्ही फक्त पाच जण होतो. बारीक पोरं असल्यागत. राजेश, निकेतन, मी आणि आकाश-निकिता. काय मोठं झालं, तर आमच्या नाकीनऊ येणार होते.

निकिताची आई पोलिस स्टेशनमध्ये आली, ती थेट आकाशच्या अंगावरच. आम्ही बाकड्यावर बसलो होतो. निकेतन आणि मी मध्ये उभं राहिलो. आणि एक पोलिस हवालदारही आमच्यासोबत होते. त्यामुळे तिची आई पुढे आली नाही. थोडी झटापट झाली. पण फार मोठं काही झालं नाही.

पोलिसांनी त्या सर्वांना बाहेर नेलं आणि आम्हाला आधार दिला. ते निंबाळकरच म्हणाले की, "टेन्शन घेऊ नका. मी समजावतो त्यांना. तिची आई आहे म्हटल्यावर हायपर होणारच.".. मुळात एवढा राडा होणार, हे आम्ही गृहित धरलेलंच. पण पोलिसांच्या नकळत निकिताची आजी पुन्हा रागाच्या आवेशात पोलिस स्टेशनमध्ये घुसली आणि थेट आकाश आणि निकिता जबाब नोंदवत बसलेल्या दिशेने गेली. मोठ्या आवाजात आकाशकडे हात रोखून म्हणाली, "तुझे ये भीमवालाही मिला क्या? हम ब्राम्हण है, ये तो याद रखना था.. मेरी बच्ची होती तो काट डालती."... हे ऐकून माझं तर डोकंच फिरलं.

एकतर जीवाभावाचा दोस्तय. त्याला उद्देशून असं काही ऐकून घेताना भयानक राग आला होता. आम्ही बसल्या जागेवरुन तडकन् उठलो. तेवढ्यात पुन्हा पोलिसांनी आम्हाला रोखलं. म्हणाले, आम्ही त्यांना बाहेर काढतो. हायपर झालेत ते. शिवाय, 'काट डालती' वगैरे बोलल्याने पोलिसही निकिताच्या आजीवर संतापले आणि तिला थेट बाहेर काढलं.

ते लोक पोलिस स्टेशनच्या आवारातच काही वेळ बसले होते. आम्हीही काही वेळ तिथेच बसून राहिलो. पोलिस स्टेशनच्या आवारात आहोत, तोपर्यंत सेफ आहोत, हे माहित होतं. कारण हे ब्राम्हण असले, तरी डोक्याने गेलेली माणसं आहेत. हे लोक काही करु शकतात, हे माहित होतं. म्हणून रिस्क नको म्हणून अर्धा तास पोलिस स्टेशनलाच बसलो. मग निकिताचे घरचे थोड्या वेळाने निघून गेले. मग आम्हीही निघालो....

पोलिस स्टेशनच्या बाहेरुनच रिक्षा पकडली आणि विलेपार्ले स्टेशनला जाण्याऐवजी थेट अंधेरी स्टेशनला रिक्षा नेली. पार्ला स्टेशनला निकिताचे लोक असले तर प्रॉब्लेम नको म्हणून. तेवढं बरं त्यावेळी डोक्यात आलं. कारण आधीच निकिताच्या आजीमुळे डोक्याचा भुगा झाला होता. अखेर सर्व संकटं पार पडली.

आकाश आणि निकिताचं चार-पाच वर्षांचं प्रेम होतं. अखेर दोघेही आयुष्याचे सोबती झाले. आकाश माणूस म्हणून ग्रेट आहे. तो निकिताला आनंदात ठेवेल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही. तो मेहनती आहे, जबाबदार आहे, जाणीव असलेला आहे.. त्यामुळे त्याच्यासाठी कोणतीही रिस्क घ्यायला काही वाटत नाही.

शेवटी एकच..... सर्व नीट झालं असलं तरी निकिताच्या आजीचं वाक्य अजूनही डोक्यात घिरट्या घालतंय. 'हम ब्राम्हण है... तुझे ये भीमवालाही मिला क्या?', हे वाक्य काळजाला टोचलंय. दोन्ही बाजूंनी या वाक्याचा त्रास होतो. एकतर माझ्या मित्राला ती असं म्हणाली. साला आम्ही मैत्रीत कधी जात आणली नाही आणि हे तर थेट जातीवरच बोट ठेवत होते. पण प्रकरण सेन्सिटिव्ह होतं म्हणून गप्पच बसणं पसंत केलं. आणि दुसरं म्हणजे कुठल्या मानसिकतेत अजून ही मंडळी वावरतात राव? कधी निघणारेत हे जातीच्या चौकटीबाहेर?

बरं आमच्या आकाशने रितसर तिच्या घरी मागणीही घातली होती. त्यांनी त्याला पाहून होकारही दिला होता. पण जात आडवी आली. 'जात' जाता जात नाही, ती अशी. ते तथाकथित उच्चजातीतले ना.. मग आमचा आकाश कसा त्यांना चालेल?

असो. आकाश आणि निकिताच्या संसाराला दोन-चार दिवसात महिना होतोय. दोघांच्याही सुखी संसाराला खूप खूप शुभेच्छा.

17 June, 2017

वो भी क्या दिन थे, जब राज ठाकरे 'राजसाब' थे...



आता तीनशे साठ अंशात मत बदललंय. विचार बदललेत. प्रत्येक मुद्द्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. पण जर तीनशे साठ अंश हे चक्र उलट फिरवलं, तर मी काहीसा वेगळा सापडतो. आताचा मी आणि तेव्हाचा मी, यात चमत्कारिक बदल जाणवतो. मी मुंबईत येणं आणि राज ठाकरेंचा आक्रमक नेता म्हणून उदय होणं, हे समकालीन वगैरे. 2008 ला मुंबईत आलो त्यावेळी कल्याणमध्ये उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण करत राज ठाकरे नावाचा नेता मराठी माणसांचा नवा हिरो बनत होता. पुढे मराठीच्या नावाने मारझोड करत 'मराठी ह्रदयसम्राट' ही बिरुदावलीही त्यांनी पदरी पाडली. तो काळ खऱ्या अर्थाने राज ठाकरेंचा होता. या ब्लॉगमधील माझा हा फोटो तेव्हाचाच. राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये वगैरे काढलेला. वाईट्ट फॅन होतो त्यांचा. कॉलेजच्या या काळातल्या आठवणीही तितक्याच भन्नाट आहेत.


अकरावीला पार्ल्यातल्या डहाणूकर कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर अगदी काही दिवसातच राज ठाकरे नावाचं वादळ आजूबाजूला घिरट्या घालू लागलं. गावाकडनं आल्याने आधीच थोडा न्यूनगंड मनात होता. त्यामुळे समविचारी आणि सेम परिस्थितीतला कुणी मित्र हवाच होता. तेव्हा अशुतोष चव्हाण भेटला. अशुतोष डाऊन टू अर्थ वाटला. गावाकडून आलोय म्हणून कधी तुसडेपणाने वागला नाही. सांभाळून घेणारा माणूस. त्यामुळे त्याच्याशी चांगली मैत्री झाली. पण आशुतोष राज ठाकरेंचा कट्टर कार्यकर्ता. तितकचा बाळासाहेबांचाही. पण उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंवर अधिक प्रेम. आशुतोषच्या सोबत राहून मनसेत काही प्रमाणात का होईना अॅक्टिव्ह झालो. माझ्याकडे तेव्हा कॅमेरा फोन नव्हता. पण अशुतोषच्या मोबाईलवर तेव्हा राज ठाकरेंची भाषणं ऐकायचो. इव्हन डहाणूकर कॉलेजमध्ये मनसेची पहिली विद्यार्थी युनियनही आम्ही सुरु केली. त्यासाठी राजगडावर जाऊन तांबोळींना भेटलो. ते तांबोळी आता बहुतेक मुंबई विद्यापीठात सिनेट सदस्य आहेत. कदाचित. तर मनसे, राज ठाकरे वगैरेंच्या नावाखाली फुकटचा माज करायचो. आमच्यासोबत सौरभ नावाचा मित्र होता. त्याच्यासमोर तर राज ठाकरेंना नुसतं 'राज ठाकरे' म्हटलं तरी तो कॉलर पकडायचा. एकदम कट्टर. 'राजसाहेब'च म्हणायचं असा त्याचा आग्रह असायचा. असे ते दिवस होते. राज ठाकरे नावाचं भूत अक्षरश: मानगुटीवर बसलं होतं. रोजच्या पेपरमधले राज ठाकरेंचे फोटो कोरुन वहीत चिटकवणं काय किंवा भाषण लाईव्ह असेल तर कामावरुन लवकर येणं काय... राज ठाकरेंसाठी कुछ भी... पुढे पत्रकारिता शिकण्यासाठी बारावीनंतर डहाणूकर कॉलेजमधून समोरील साठ्ये कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. तरी काही दिवस डहाणूकरमध्ये येणं-जाणं सुरु असायचं. डहाणूकर आणि साठ्ये ही दोन्ही कॉलेज समोरासमोरच आहेत. पण नंतर नंतर कॉलेज आणि पार्ट टाईम जॉब, यात वेळ मिळेनासा झाला आणि मनसे-बिनसे बंद केलं. विशेष म्हणजे साठ्ये कॉलेजला गेल्यावर पार्ट टाईम जॉब करणं सुरु केलं. तेव्हा पहिला जॉब मालाडच्या लिबर्टी गार्डनजवळील 'तिवारी अँड कं.' या सीए फर्ममध्ये मिळाला. म्हणजेच बॉस उत्तर भारतीय. साला नशीब असं असतंय. कधीकाळी भैय्यांना हव्या तेवढ्या शिव्या द्यायचो आणि गरजेच्या काळात याच तिवारी सरांनी मोठी मदत केली. दरम्यानच्या काळात वाचन वाढलं. नरहर कुरुंदकर, अवचट, मार्क्स वगैरे डोक्यात घुसू लागले. मग राज ठाकरे खूपच बोगस वाटू लागले. हळूहळू राज, मनसे सर्व डोक्यातून साफ निघूनच गेले. उलट भावनिक मुद्द्यावरुन मारहाण वगैरे करण्याचा रागच येऊ लागला. अगदी तीनशे साठ अंशात बदललो. काही महिन्यांपूर्वी कळलं की, ज्या अशुतोषमुळे हे राज ठाकरे नावाचं फॅड डोक्यात घुसलं होतं, तोही मनसे-बिनसेतून बाहेर पडलाय. त्यालाही राज ठाकरेंच्या लक्झरियस पॉलिटिक्सचा कंटाळा आला. तर दुसरीकडे, 'राजसाहेबच' असं बोलण्याचा अट्टाहास करणारा सौरभ नावाचा मित्रही यातून बाहेर पडला. सौरभ मध्यंतरी भेटला, तेव्हा सांगत होता की, हे राजकारण वगैरे आपली ऐपत नाही. ते आपला वापर करतात वगैरे. एकंदरीत सौरभही पार बदललाय. तो पार्ल्यात 'पुरेपूर कोल्हापूर' चालवत होता. आता कुठे असतो माहित नाही. कधीकाळी डहाणूकर कॉलेजमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेच्या पोरांना आव्हान देत पहिली युनियन आम्ही ज्या मित्रांनी सुरु केली होती, ते सगळेच मित्र राज ठाकरेंच्या विचारांपासून दुरावलेत, हे विशेष. तर राज ठाकरेंना 'राजसाब' म्हणण्याचाही एक काळ होता. हा फोटोही त्याच काळातला. फेसबुकच्या 'आन धीस डे'मुळे हा फोटो पुन्हा समोर आला आणि काही वर्षे मागे गेलो.

20 March, 2017

संघर्ष जारी रहेगा !

(दिवसभर अन्नत्याग केल्यानंतर संध्याकाळी मुंबईतील मनोरा आमदार निवाससमोरील हिरवळीवर उपोषण सोडलं.)


शेताच्या बांधावर घाम गाळून त्याच मातीत गुडूप झालेला बाप आणि सालभर राब राब राबून पिकाला भाव मिळत नाही म्हणून उजाड माथ्याने आसवं गाळत शेताच्या बांधावर धैर्य एकवटत कणखर बनू पाहणारी माय....तुमच्यासाठी होता कालचा दिवस.

मातीत झिजलेल्या अन् घामाने भिजलेल्या हर एका पोशिंद्यासाठी काल एक दिवस अन्नत्याग केला. १९ मार्च निमित्त ठरलं, सहवेदना आणि तळमळ दिस-रात असतेच. शेवटी जगवतोय तो मला. झगमगाटी मुंबईत चेहरा लखाखती राहत असला, तरी काळजाला चिटकलेली माती आजन्म तशीच राहील.
(मुंबईतील उपोषणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा मित्र ब्रम्हा चट्टे ज्यूस पित उपोषण सोडताना. गालाला हात टेकून ब्रम्हाकडे पाहणारा कृष्णा वर्पे आणि काळ्या कुर्त्यावर मी स्वत:)

दिवसभर उपाशीपोटी काम करत उपोषणात सहभाग घेतला. यातून काय साध्य झालं, हा मुद्दा नाही. मनात खदखद आहे, ती जिवंत आहे ना, हे चाचपडून पाहिलं. बस्स. वेळीच लक्ष घाला राजेहो, खदखद फार तग धरुन ठेवता येत नाही. आमचा बा शेतकरी जगला पाहिजे राजेहो.
(मुंबईतील किसानपुत्र)

एका दिवसाच्या अन्नत्यागाने कितीसा फरक पडेल, माहित नाही. पण दिवसातल्या प्रत्येक क्षणाने जी खदखद वाढवलीय, तिच्याने नक्कीच फरक पडेल, एवढं निश्चित.

दिवसभर काम करता करता केलेल्या उपोषणानंतर मनोरा आमदार निवासासमोरील हिरवळीच्या साक्षीने उपोषण सोडलं. समविचारी समवीयन आणि ज्येष्ठांच्या सोबतीने. मुंबईतील किसानपुत्रांनीही अमर हबीब सरांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत पुढाकार घेतला. आणखी सहभाग अपेक्षित होता. पण ठीकंय. निराशावादी सहभाग नक्कीच नव्हता. चित्र आशादायी आहे. संघर्ष जारी रहेगा !

19 January, 2017

आठवणीतला प्रवास अन् प्रवासातल्या आठवणी



रुळलेल्या वाटेवरुन न जाता वेगळी वाट चोखाळत पत्रकारिता हे क्षेत्र निवडलं. पंचक्रोशीत आतापर्यंत या क्षेत्रात येण्याचं कुणी धाडस केलं नव्हतं. याला दोन कारण होती. एक म्हणजे- या क्षेत्रात कसं यायचं, पत्राकारितेत येण्यासाठी शिक्षण काय घ्यावं लागतं, याबद्दल मार्गदर्शन करणारं कुणीच नसायचं आणि दुसरं म्हणजे- कुणी मार्गदर्शन केलं तरी नोकरी मिळेल का, नोकरी मिळाली तर नोकरीची हमी आहे का वगैरे प्रश्न आ वासून उभे असायचे. त्यामुळे 'ये अपने बस की बात नहीं' म्हणत सगळेच या क्षेत्रापासून लांब राहायचे.

मला या क्षेत्राची माहिती होती, अशातला भाग नाही. पण ज्यावेळी विलेपार्लेतील म. ल. डहाणूकर काॅलेजसारख्या नामांकित कॉलेजमध्ये कॉमर्स शिकत होतो. त्यावेळी तिथे नाट्य मंडळात काम करत असताना वेगळं क्षेत्र निवडायचं ठरवलं आणि डहाणूकर कॉलेजच्याच समोर असलेल्या साठ्ये कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ मास मीडियाला अॅडमिशन घेतलं. फायनान्शियल बॅकग्राऊंड पाहता खरंतर मोठी रिस्क होती. पण मुंबईत आलोय तर काहीतरी वेगळं करायचंच, हे ठरवलेलं. डॉ. नरेंद्र जाधवांच्या वडिलांनी नाही का त्यांना सांगितलेलं, 'ज्यात जाणार त्यात टॉपला जायचं'. तसंच काहीतरी मी स्वत:लाच सांगितलं.

बीएमएम पूर्ण केलं. शेवटच्या वर्षाला पत्रकारिता निवडून पदवी मिळवली. पण नोकरीचा प्रश्न होताच. तो दिपक करंजीकरांनी सोडवला. अर्थक्रांतीमध्ये अनिल बोकील, दिपक करंजीकर, प्रसन्ना चौधरी, अनिल शिंदे यांसारख्या दिग्गजांसोबत काम करु लागलो. दरम्यान दोन महिने 'सकाळ'मध्येही गेलो. पण नोकरीची शक्यता न दिसल्याने काढता पाय घेतला. कारण महिन्याकाठी पगार महत्त्वाचा होता. नाहीतर मुंबईतनाच काढता पाय घ्यावा लागला असता.

'सकाळ'मध्ये दोन-अडीच महिने काढल्यानंतर पुन्हा अर्थक्रांतीत घुसलो. दिपक करंजीकरांचा सपोर्ट खूप मोठा ठरला.

'सकाळ' सोडल्यानंतर अर्थक्रांतीत पुन्हा काम सुरु केल्यानंतर मीडिया सोडण्याचाच विचार केला. मग 'रुरल डेव्हलपमेंट'चा कोर्स करुन समाजसेवेत पूर्णवेळ देण्याचा विचार मनात डोकावला. मग त्यासाठी धावधाव केली. चर्चगेटला जाऊन निर्मला निकेतनमध्ये चौकशी केली, IGNOU ची अॅडमिशन प्रोसेस शोधली वगैरे वगैरे.

दरम्यान, पनवेल-पेण रस्त्यावरील ताराजवळील युसुफ मेहेरअली सेंटरमध्ये गेलो होतो. जीजी पारेख आणि सुधा वर्देंच्या हस्ते 'बा कुटी'चं उद्घाटन होतं. तेव्हा मदन मराठे, अरुण शिवकर, जीजी, सुधाताई यांसारख्या सेवा दलातील माणसांना समोरासमोर भेटल्यावर आणि त्यांच्याशी बोलल्यावर समाजसेवा क्षेत्रात अॅक्टिव्हली उतरण्याचं ठरलं.

या काळात थोडं डिप्रेशन आलेलं. कारण पत्रकारितेत करिअर करण्याचं मनापासून ठरवलं होतं. पण इथे काहीच निभाव लागत नसल्याचं लक्षात आलं होतं. म्हणून मीडियाचा विचार सोडलेला. तर इकडे युसुफ मेहेरअली सेंटरहून आल्यानंतर समाजसेवेत उतरण्याचं पक्क झालं होतं. आॅक्टोबर महिना होता. म्हटलं आता पुढल्या वर्षीच अॅडमिशन घेऊ. तोपर्यंत अर्थक्रांती कन्टिन्यू करु.

दिवस उलटत गेले. ऑक्टोबर सरला, मागोमाग नोव्हेबरही गेला. डिसेंबरही सरत आला आणि नवीन वर्ष येणार तोच नवीन संधीही समोर आली. एबीपी माझात जाॅब लागला. मीडियाचा विचार डोक्यातून काढून टाकायचा ठरला असला, तरी तो निघणारा नव्हता. कारण याच क्षेत्रात यायचं होतं. कारण इथून अनेक गोष्टींमध्ये काम करु शकतो. मग एबीपीचं काम सुरु केलं.

असा मानसिक चढ-उतारांचा प्रवास आहे. माझाच नव्हे, बीएमएम करुन मीडियात नोकरीच्या आशेने ताटकळत असलेली अनेकजण आजही आहेत. त्यांचाही प्रवास असाच काहीसा आहे. मोठ्या उत्साहाने मुलं-मुली पत्रकारिता करतात. मात्र वास्तवात जॉब मिळत नाहीत. मग डिप्रेशनमध्ये जातात.

कट टू......

आठवडाभरापूर्वी पंचक्रोशीतील जी मंडळी मुंबईत राहतात, त्यांनी छोटासा सत्कार केला. तेव्हा उपस्थितांशी संवादही साधण्याची संधी मिळाली. सात-आठ वाक्य बोलून धन्यवाद म्हणून थांबलो. स्टेजवरुन उतरलो आणि खुर्चीत बसलो. विचार करताना डोळ्यांसमोरुन वरील सर्व प्रवास सरकू लागला.

कार्यक्रमात भाषण करताना गावातील एका दादाने फोटो क्लिक केला. दोनच दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवर फोटो पाठवला त्याने. म्हटलं शेअर करुया.


दहा-पंधरा ओळी लिहिण्याचं ठरवलं होतं. पण खूपच लांबलचक लिहिलंय. असो. आठवणींचा प्रवास मांडताना आणि प्रवासातल्या आठवणी मांडताना मन हलकं होतं. मग शब्द कितीही वाढत जावो.

06 January, 2017

धावरकुट्या



तथाकथित प्रमाण वगैरे भाषेत लोहार. पण आमच्या गावाकडं धावरकुट्या. शेतीच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा अंग. कोयता-विळी पाजवण्यासाठी धावरकुट्याला पर्याय नाही. नितीन मोकल यांच्या पोस्टसोबत गणेश बागल यांनी टिपलेला हा फोटो पाहिला आणि धावरकुट्याची जिंदगी डोळ्यासमोरुन सरकू लागली.

सप्टेंबर महिना उजाडला की पाऊस परतीच्या मार्गाला निघतो. महिना संपेस्तोव निघून जातो अन् लागोलग थंडी येते. हिकडं भाताच्या काड्या हातभर वर आलेल्या असतात. पंधरा-वीस दिसात कोंबड्या पिल्लाचा निवद दाखवून कापणीला सुरुवात केली, तरी चालतंय. असे हे दिवस.

कापणी जवळ आली, मग कोयत्या, विळ्या, कुऱ्हाडी पाजवून घ्यायला पायजे. मग ढोरांशी जाणा-यांची रानावनात, पाणी भरणाऱ्या बायकांची विहिरीवर अन् म्हातारी-कोतारी भर दुपारी कुणाच्यातरी पडवीत बसून तांदूळ निवडताना....सगळीकडे एकच चिंता- ह्यो औंदा धावरकुट्या आला नाय तो. मेला राह्यला कुठं? भाता कापायला झालीत. आता धावरकुट्याला बोलावणं धाडण्याची यळ आली की काय म्हणायची कुणब्यावर?

चर्चांचं फड ठिकठिकाणी सुरु असताना कधीतरी दुपार टळून सूर्य मावळतीला निघताना एक बैलगाडी गावात शिरते. दोन पांढरे शुभ्र बैल, त्यांच्या शिंगांना भगवा रंग, भारदस्त आणि आडदांड...बैलांची मिजास काय! अहाहा!

बैलगाडीत एक छोटंसं बिऱ्हाड. दोन चिमुरड्या पोरी, एक पोरगा, पोरांची माय अन् दस्तुरखुद्द धावरकुट्या. बैलांचा कासरा वढतच म्हणतो, आरं थांब की रं फुकणीच्या. लय जोर कराय लागलाय व्हय. बैल जाग्यास थांबतात. चिमुरड्या बैलगाडीतना उड्या टाकतात, मंग हळूच त्यांची माय उतते. अन् सर्वात शेवटी धावरकुट्या. तेव्हा कुठं बैलांना जरा हायसं वाटतं. डोंगराच्या मध्यावर गाव असल्याने चढणीने आले व्हते. पार कंबरडं मोडलं असावं. त्यात या बिऱ्हाडाचं ओझं.

आडदांड शरीर, चांगला साडेसहा-सात फुटी उंच, कोळश्यानं माखलेला धोतर अन् वर गंजी... धावरकुट्या नाव जरी कानी पडलं तरी हे असं डेळ्यासमोर येतं. त्यात परत त्याची पोरं अन् बायको हायच. दोन पोरी. दोघीबी लहानच. कायम भोंगा सुरुच. पण धावरकुट्याच्या कामात अडथळा नाय. चुकून तापलेल्या निखा-यांकडे सरकल्या तरी धावरकुट्या फक्त पोरींकडे बघायचा, त्याच्या एका भेदक नजरेत पोरी चराचरा थरतरायच्या. पोरगा कामात हुशार व्हता. शाळेचे उंबरठे पाहिले सुद्धा नव्हते. पायाला भिंगरी लाऊन बिऱ्हाड फिरतं. कुठली आलीय शाळा अन् कुठलं काय. पण पोराला जाणीव होती बापाच्या कष्टाची. ऐन थंडीत अंगातना घाम गळेस्तोव ऐरणीवर एकामागोमाग एक हातोडे हाणायचा. त्याची माय बी ह्योच काम करायची.

धावरकुट्याचा बि-हाड असाच या गावातून त्या गावात फिरता. एका ठिकाणी म्हणून नाही. फिरत्या पायांवर पोटांचं चक्र सुरुय, हेही खरंच. पण यातली घुसमट जीवघेणी होती.

तर धावरकुट्या वेशीवरच बैलगाडी थांबवायचा. मग सारा सामानसुमान घेऊन दोन घरं पालटून एका बोळात बसायचा. दोन दिस मग त्याच बोळात मुक्काम. रातच्याला झोपायला फक्त कुणाचीतरी पडवी शोधायचा. बाकी घर उघड्यावरच. निळ्या छताखाली. सुरक्षित. आणि तसंही जिंदगीच उघडी पडलीय, तिथं घर अन् त्या सामानाचं काय घेऊन बसायचं म्हणा.

धावरकुट्या नेहमीच्या जागी थोडा विसावतो न विसावतोय, तोच कोयता, विळी, कुऱ्हाडींची रांग लागते, तर कुणी नवी कोयती उलटी सुलटी करुन पाहत बसतो. गेल्यावेळीपेक्षा विळा-कोयती पाजवण्याचा भाव वाढवला म्हणून हुज्जत घालणारी साळू आक्का आठवतेय. "मेल्या एवढं कमवून कुठं उरावर नेणारेस?" असं म्हणणाऱ्या साळू आक्काला धावरकुट्या काळजाला भिडावं अशा स्वरात म्हणायचा, 'उरावर नेण्याएवढं कमावलं आसतं तर कशाला या तीन पोरास्नी घेऊन गावोगाव हिंडलो असतो गं माय?" मग साळू आक्काही नरमून म्हणायची, "कर...कर... तू काय ऐकायचा नाहीस. रातच्याला पोरांना घरी पाठव. दोन भाक-या देती".. मग धावरकुट्याचं काम पुन्हा सुरु.

दोन दिवसाची वस्ती, पण त्याचं जगणं कळून जायचं. दिवसभर काम करुन रात्री थोडा आराम. तिन्ही पोरांना गावभर हिंडून जेवण गोळा करायला सांगायचा, तेव्हा कुठं रात्रीच्या जेवणाची सोय व्हायची.

धावरकुट्याचं काम तासं-तास उभं राहून पाहायचो. कदाचित तेव्हा तेवढी समज नव्हती म्हणून असेल, धावरकुट्याच्या बायकोच्या सतत पाणावलेल्या डोळ्यांचा अर्थ कळायचा नाही. सोबत जेवताना दगडासारखी कडक भाकरी चावणारी चिमुरडी आठवतायेत. त्याचा पोरगा आमच्यासोबत खेळायला यायचा. दोनच दिस असायचे, पण त्याचा पोरगा आमचा दोस्त झाला होता. रवी त्याचं नाव. एकदा घरी जेवायला नेल्याचंही आठवतंय. रवी भारी दोस्तार होता. हुशार होता. आता कुठं आसल माहित नाय... कदाचित बापासारखंच नशिबाच्या ऐरणीवर हातोडे मारत असेल.

धावरकुट्याचं जिणं हे असं असतंय. सगळीच हेळसांड. जगणंच विस्कळीत. पोरांचं शिक्षण नाही की काही नाही. आता तर शेती करणारेही फार कमी झालेत. त्यामुळे धावरकुट्याच्या हातालाही काम नसतं. जेव्हा काम होतं तेव्हा पोरांना शिकवलं नाही. आताच्या चक्रात पार कोलमडून निघतो हा समाज. घुसमट सारी.

जिंदगीवर किती काळ हातोडा मारणार आहोत, या अनुत्तरीत प्रश्नाशी दिस-रात झगडत आजही धावरकुट्या गावोगाव हिंडतो.

22 August, 2016

ब्लॉगचं अर्धशतक !

55 ब्लॉग झाले. अर्धशतक पूर्ण केलंय. अजून सुरुवात आहे. पण या अर्धशतकी खेळीत खूप वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला. सर्वच जमलंय अशातला भाग नाही. पण कोणताही प्रकार वर्ज्य मानला नाही. पुस्तक परीक्षणापासून कथालेखनापर्यंत, ललितलेखापासून प्रवासवर्णनापर्यंत आणि विश्लेषणापासू अनुभव आणि आत्मपर लेखांपर्यंत.... बहुतेक विषयांना दुरून स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय.

19 फेब्रुवारी 2013 ला 'एक अनावृत्त पत्र' हा पाहिला ब्लॉग लिहिला. त्यानंतर काही दिवस सातत्य होतं लेखनात. मात्र, मध्यंतरी फार बरगळलं. मग गेल्या दीड वर्षांपासून लेखनात अधिक सातत्य आणण्याचा प्रयत्न केलाय. सातत्य नसण्याला दुसरं-तिसरं कारण नसून, माझा आळशीपणा आहे.


पहिला ब्लॉग वाचल्यावर मलाच माझ्या लेखनावर हसू येतं. इतकं वाईट लिहिलंय. पण असो.. ती सुरुवात होती. त्यानंतर प्रत्येक ब्लॉगगणिक लेखनशैली सुधारत गेलीय, असं मला स्वत:ला वाटतंय. कारण 19 फेब्रुवारी 2013 रोजीचा पहिला ब्लॉग आणि काल परवाचा ब्लॉग यात प्रचंड इम्प्रूव्हमेंट झाल्याचं माझं मलाच वाटतंय.

दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या लेखांना अनेक मोठमोठ्या माणसांनी दादही दिली. लेखनाची तारिफ केली. शिवाय, सातत्याने उत्कृष्ट शैलीत ब्लॉग लिहिणाऱ्यांनी मार्गदर्शनही केलंय. अजूनही करत आहेत.

Sachin Parab यांच्या ब्लॉगमधून इन्स्पायर होऊन माझा ब्लॉग सुरु केला. सचिन सरांचं लेखनही प्रचंड आवडतं. त्यानंतर Navnath Sakunde गुरुजींसारखं लिहिण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काही जमलं नाही. नवनाथ गुरुजी अफाट लिहितात. डेन्जरच. त्यानंतर Praveen Bardapurkar सरांचे ब्लॉग वाचून लेखनाला वेगळं वळण मिळालं. ‪#‎एकरेघ‬सारखा ब्लॉग वाचून लेखनाला संदर्भ दिल्यास ब्लॉग पोस्टचं वजन वाढतं, हे कळलं. लेखन डीपमध्ये कसं लिहायचं हेही 'एक रेघ'मधून कळलं. असे खूप ब्लॉग आहेत. सर्वांचीच नावं इथं घेणं शक्य नाही.

ब्लॉगसंख्या 50 पार केली असली, तरी ही सुरुवात आहे. अजून स्वत:ची अशी लेखनशैली नाही. लेखाचा फ्लो अनेकदा गडबडतो. अनेकदा पूर्णच्या पूर्ण लेखच गंडतो. विशेष म्हणजे, असं लेखन गंडलं, तरी वाचणाऱ्यातले अनेकजण स्वत: काय चुकलंय, हे सांगतात. त्यानुसार ब्लॉगगणिक मी तशी सुधारणा करण्याचा प्रयत्न केलाय.

लेखन करताना वाचन महत्त्वाचं असतं. ते वाढवलंच आहे. शिवाय, अनेक दिग्गज नेहमीच वेगवेगळी पुस्तकं सूचवतात. हे वाच-ते वाच.. असं सांगत असतात. काहीजण थेट पुस्तकचं पुढ्यात आणून ठेवतात. एकंदरीत काय तर, अधिक वाचन केलं तरच लेखनशैली अधिक चांगली होत जाईल. हे मलाही पटतं. कारण अधिक वाचलं, तर नवनवीन शब्द, संदर्भ वगैरे कळत जातील. तरच ते माझ्याही लेखनात येईल. शिवाय, प्रत्येक लेखकाची स्वत:ची एक लेखनशैली असते, तीही वाचनातून कळत जाईल. म्हणून वाचनही वाढवलंय.

सरतेशेवटी तेच...... ही सुरुवात आहे. अजून खूप लिहायचंय. वाचायचंय. ब्लॉग खूप वाचकांपर्यंत पोहोचू लागलं आहे. ब्लॉग अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यास झुक्यादाद, ट्विटरकर आणि व्हॉट्सअपवाल्यांचा मोठा हातभार लागला आहे. त्यांचेही विशेष आभार!

जे काही तोडकं-मोडकं लिहितो, ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचतंय, ते लेखन वाचलं जातंय, त्यावर प्रश्न उपस्थित केले जातायेत, चूक-बरोबर आवर्जून सांगितलं जातंय, याचा अर्थ मी अधिक जबाबदारीने लिहायला हवं. आणि याची मला जाणीव आहे. त्याच जाणीवेतून पुढे लिहित राहीन.
               
ब्लॉग वाचणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार..!!

08 August, 2016

पार्ट टाईम जॉब (भाग 1) : वडापावची गाडी



दहावीपर्यंत गावी शिकलो. पुढील शिक्षणासाठी मुंबईला यायचं, हे आधीच ठरलेलं. मुंबईत कुठं राहायचं, काय खायचं, कसं राहायचं, हा नंतरचा प्रश्न होता. पण शिकायचं मुंबईतच, हे पक्क होतं. तस्सच झालं. दहावी झालो आणि मुंबईत आलो. काकांच्या येथे राहण्याची व्यवस्था झाली. खाणं-पिणं सर्व तिथेच. त्यांच्या घरातला एक सदस्य बनून राहिलो. विलेपार्लेतील आंबेवडीतील झोपडपट्टीत. ते नाही विमानतळाशेजारी आहे. तेच. पण इथे राहून शिकायचं, तर कामही करावं लागणार. कारण हातात पैसा असल्याशिवाय इथे पानही हालत नाही. त्यात कॉलेज वगैरे होतंच. मग अर्धवेळ नोकरी करण्याचं ठरवलं. मुंबईत या संकल्पनेला पार्ट टाईम जॉब असं प्रतिष्ठित शब्द आहे. काम कोणतंही असो, पार्ट टाईम जॉब करतोय म्हटलं की, त्याला एक वेगळाच स्टँडर्ड यायचा. असो. तर म्हटलं पैसा आवश्यक आहे. पावलोपावली खर्च वाढतोय. किमान वरखर्चाचे तरी पैसे आपण जमा केले पाहिजेत. मग आयुष्यातील आणि मुंबईतलाही जॉब सुरु केला- वडापाव विकण्याचा.

तुम्ही कधी मुंबईत आला आहात का? आला असाल, तर तुम्हाला आता सांगेन, ते ठिकाण कळेल. ते म्हणजे- अंधेरीहून दादरच्या म्हणजेच शहराच्या दिशेने निघालो की, अंधेरी सोडताच उजव्या बाजूला एक भली मोठी झोपडपट्टी लागते. विमानतळाला वेढा घातलेली. याच झोपडपट्टीतून मुंबईनगरीच्या प्रवासाची सुरुवात केली. इथे संभाजीनगर आणि आंबेवाडी अशा दोन झोपडपट्ट्या एकमेकांशेजारी आहेत. त्यातल्या आंबेवाडीत काकांच्या घरी मी राहत असे. आणि शेजारील संभाजीनगर झोपडपट्टीत, मात्र हायवेशेजारी एका वडापावच्या दुकानात कामाला जात असे. आता विमानतळाच्या उन्नत मार्गासाठी इथल्या झोपडपट्ट्या हलवल्या गेल्यात. पण काही झोपड्या अजूनही आहेत.

तर संभाजीनगरमध्ये अगदी हायवेशेजारी एक वडापावचं दुकान आहे. आजही आहे. तुम्ही अंधेरीहून शहराच्या दिशेने निघालात की, ते उजव्या हाताला दिसतं. अगदी रस्त्याच्या कडेलाच आहे. (बरं, तुम्ही तिथे कधी गेलात, तर माझं नाव सांगून वडापाव खाऊही शकता. वडापावही चविष्ट आहे.) तिथे बने आडनावाची ताई आहे. तिचं ते दुकान. नवरा वारला. मग आता काय करायचं म्हणून आठ-दहा वर्षांपूर्वी तिने हे दुकान उघडलं. ती मूळची रत्नागिरीची. तर काकाचं कुटुंब जवळपास 30-35 वर्षे मुंबईत राहत होतं. त्यामुळे त्यांच्या ओळखीने मी त्या वडापावच्या दुकानात कामाला लागलो.

काम काय तर पाव अर्धे तोडायचे, त्यात तिखट, गोड आणि सुकी चटणी लावायची आणि वडा ठेवून गिऱ्हाईकांना द्यायचं. कटलेट असेल, तर तो व्यवस्थीत चार तुकड्यांमध्ये कापून, त्यावर चटणी टाकून द्यायचं. पार्सल असेल, तर ते नीट कागदात बांधून द्यायचं. बस्स. संध्याकाळी 6 ते रात्री 9.30 पर्यंत काम. पगार 450 रुपये. आयुष्यातील पहिला पगार घेतला तो याच वडापावच्या गाडीवर. जवळपास 10-11 महिने इथे काम केलं. सुरुवातीला 450 रुपये असलेला पगार तीन-चार महिन्यांनी थेट 800 रुपये झाला. कॉलेजमधील वरखर्चासाठी एवढे पैसे खूप व्हायचे. पुढे कॉलेजचा खर्च वाढला म्हणून दुसरा चांगला जॉब बघितला आणि 10-11 महिन्याने वडापावच्या गाडीवर जाणं सोडून दिलं.

इथे काम करतानाचा एक किस्सा आठवतोय. लय भारी आहे. पण त्यातून खूप शिकलो. त्याचा पुढे उपयोगही झाला. अजूनही होतोय. तर झालं असं होतं की-  इथे काम करत असताना मी डहाणूकर कॉलेजला शिकायला होतो. अकरावीत. खरंतर मुंबईच माझ्यासाठी नवीन होती. त्यामुळे ओळखीचे असे फार कुणी नव्हते. किंबहुना नव्हतेच. म्हणून वडापावच्या गाडीवर काम करायला कसलीच लाज वाटायची नाही. मात्र, कॉलेज सुरु झालं आणि आजूबाजूचे काहीजण ओळखीचे झाले. त्यात डहाणूकर कॉलेज पार्ले टिळक असोसिएशनचं. त्यामुळे पार्ले टिळकची अनेक मुलं डहाणूकरमध्ये अकरावीला होती. आणि पार्ले टिळकला अधिकाधिक मुलं-मुली विलेपार्ले, अंधेरी पूर्व भागातीलच. त्यामुळे सहाजिक मी जिथे वडापाव विकायला जायचो, त्या भागातही काही मुलं-मुली राहत होते.

कॉलेज सुरु झाल्यावर सुरुवातील कुणी ओळखीत नव्हतं. त्यात मी गावाकडून आल्याने शांत असायचो. सर्व मुलं मागच्या बेन्चवर बसण्यासाठी धावाधाव करायचे आणि मी पहिल्या. अगदीच हुशार वगैरे नव्हतो. तसा असण्याचं काही कारणही नव्हतं. कारण गावाल दहावीपर्यंत मराठीतून शिकून आलेलो आणि इथे हे कॉमर्सचं सर्व इंग्रजीत. काहीच कळत नव्हतं. म्हणून पहिल्या बेन्चवर बसून समजून घ्यायचो. अर्थात पुढे काही कॉमर्सही माझ्याने झेपलं नाही. म्हणून नाट्यमंडळात गेलो आणि अखेर बारावीनंतर स्ट्रिम चेंज केली आणि थेट समोरच असलेल्या साठ्ये कॉलेजमध्ये पत्रकारितेला प्रवेश घेतला. असो.

तर डहाणूकरमध्ये सुरुवातील एक महिना वगैरे कुणी ओळखीचं नव्हतं. पण नंतर ओळख व्हायला लागली. झाली. यातच जिथे वडापावच्या दुकानात कामाला होतो, तिथली मुलगी माझ्याच वर्गात होती. तेजस्वी नार्वेकर. कॉलेज चार-पाच वाजता सुटायचं. मग घरी जाऊन, थोडं फ्रेश होऊन, चहा प्यायल्यावर दुकानात जात असे. तेव्हा एकदा तेजस्वी वडा-पाव न्यायला आली होती, तेव्हा वडापावच्या दुकानाची जी मालकीन होती, त्या ताईला म्हटलं, ताई, मी आलोच पटकन. पाच मिनिटांत येतो.असे म्हणत तेवढ्यापुरती वेळ मारुन नेली.

खरंतर तिथून जाण्याची किंवा तेजस्वी आली म्हणून जाण्याची काहीच गरज नव्हती. कारण मी काही चुकीचं काम करत नव्हतो. पण तरीही वाटायचं की, हिला कळलं समजा की, मी वडापावच्या गाडीवर काम करतो, तर ती कॉलेजमध्ये सर्वांना सांगेल. म्हणून थोडी मनात भीती होती. कारण कुणाला कळलं की, मग विचारणार वगैरे. मग नको असलेली ती सहानुभूती.

अखेर त्या दिवशी तेजस्वीला टाळलं. पण एक दिवस खूप कामात होतो. कुणीतरी दहा-बारा वडापाव न्यायला आला होता. मग त्याचं पार्सल बांधणं सुरु होतं. तेवढ्यात तेजस्वी आली आणि मी तिला दिसलो. मग दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर, वाटलं की हिने सांगितलं असणार. पण तिने कुणालाच नव्हतं सांगितलं. फार बरं वाटलं. आपण वडापावच्या दुकानात काम करतो, हे कुणाला कळायला नको, असंच सारखं वाटायचं.

एक दिवस पेपर आणायला हायवेच्या पलिकडे गेलो. संत जनाबाई रोडवर. पार्ल्यातील हा प्रसिद्ध रोड आहे. अभिनेते मकरंद देशपांडे आणि अभिनेता केतन क्षीरसागर वगैरे राहतात या रस्त्यावर. किंबहुना मकरंद देशपांडे राहतात, त्या बिल्डिंगसमोरच्याच पेपर स्टॉलवर पेपर आणायला गेलो. वाचनाची आवड होतीच. जरी कॉमर्सला होतो तरी. त्यामुळे नेहमी पेपर आणायला जात असल्याने तिथले पेपरवाले ओळखीचे झाले होते. गणपत जाधव त्यांचं नाव. आता त्यांनी पेपरस्टॉल बंद केलाय. आता ते तिथे नसतात. ते मूळचे चिपळूणचे. म्हणजे तसे गाववालेच. कोकणातले म्हटल्यावर. म्हणून त्यांच्याशी अधिक ओळख झाली. तर एके दिवशी जस्ट मी त्यांच्याशी बोलता-बोलता शेअर केलं की, वडापावच्या दुकानात काम करतो. पण तिथे वर्गातील काही मुलं-मुली राहतात. लाज वाटते. कॉलेजमध्ये सांगतील वगैरे.

त्यावर जाधव म्हणाले. (ते वयाने साठीत होते. पण मी त्यांना काका वगैरे बोलत नसे. जाधवच म्हणे. फक्त आदराने. अरे-तुरे नाही.) तर जाधव म्हणाले, आतापर्यंत वडापावच्या गाडीवर किती चोरी केलीस?”
मी- अहो चोरी काय? मी चोरी नाही करत. वडापाव विकायला जातो तिथे. ती ताई रीतसर पगार देते मला.
जाधव- छे! चोरी केलीसच असशील.
मी- नाही ओ. चोरी वगैरे नाही करत. तुम्ही असे का बोलता आहात?
जाधव- मग तिथे कुठल्या पोरीला छेडलंस?
मी- अहो, काय बोलताय? पोरीला का छेडू? कामाला जातो मी तिथे..
जाधव- बरं.. म्हणजे तू चोरी नाही करत, कुठलं गैरकाम करत नाहीस....असं तुला म्हणायचंय?
मी- अर्थात. हो... माझ्या आईने मला चोऱ्यामाऱ्या करायला नाही शिकवलं.
जाधव- गाढवा, एवढं कळतं ना तुला? मग का लाज वाटते तुला काम करायची? मेहनत करतोस. मग लाजायचं का? तू कुठल्या देशीदारुच्या दुकानात कामाला नाहीस. वडापाव विकून पगार घेतोस. तिथे कॉलेजची पोरं येवो नाहीतर आणखी कुठली.. मेहनत करताना लाजायचं असेल, तर एक सांगतो, मुंबई सोडून गावी जा परत. कारण मेहनतीला लाजणाऱ्याच्या गांडीवर लाथ मारते ही मुंबई...

मी निशब्द झालो. जाधवांना काय सांगायचं होतं, हे मला कळलं. आपण आपल्या मेहनतीचा आदर केला पाहिजे. तेव्हापासून वडापाव विकताना कसलीही लाज वाटली नाही. जाधवांनी सांगितलेलं वाक्य नी वाक्य पटलं होतं. जाधवांकडून पुढेही खूप शिकायला मिळालं. या माणसाचं आणखी महत्त्व आहे माझ्या आयुष्यात, ते या ब्लॉग सीरीजच्या पुढील भागात लिहिणारच आहे.

आता जाधव बहुतेक विरारला राहतात. गेली दोन-एक वर्षे कुठे दिसले नाहीत. त्यांनी पेपरचा धंदाही सोडलाय. एकुलता एक पोरगा दारु पितो. बायको कायम आजारी. जाधव एकटेच कमावते. साठी पार केल्यानंतरही जाधव खूप काम करतात. जीवतोड मेहनत. मध्यंतरी कुठल्याशा पॉलिसी कंपनीत एजंट म्हणून होते. पॅनकार्ड की आरएमपी, असं काहीतरी. चार वर्षात डबल पैसे वगैरे. त्यात अनेकांच्या त्यांनी पॉलिसी काढल्या आणि ती कंपनी बंद झाली. ज्यांच्या पॉलिसी काढल्या, ते लोक जाधवांकडे पैसे मागू लागले. कधी कधी धमक्याही देत. नंतर घरातलं काहीतरी विकून त्यांनी ते पैसे चुकते केल्याचंही मला कुणीतरी सांगितलं. असो. तर असा हा जाधव माणूस. मनाने दिलदार. प्रामाणिक. पण आयुष्याच्या कचाट्यात असा अडकला की, साला आयुष्य नकोसं व्हावं. पण तरीही मेहनत करुन जगतोय. असो.

तर जाधवांशी बोलल्यानंतर वडापावच्या गाडीवर काम करायलाही काही वाटायचं नाही. त्यामुळे जाधवांचं माझ्यासाठी महत्त्व मोठंय. तर पहिला जॉब असा सुरु झाला.

अगदी मोजून 10-11 महिने काम केलं आणि वडापावचं काम सोडलं. त्याला दोन कारणं होती- एक म्हणजे 6-9.30 अशी साडेतीन तास काम करुनही मिळणारा पगार कमी वाटला आणि दुसरं कारण म्हणजे याच काळात MS-CIT करण्याचं ठरवलं. दोन दोन कारण मिळाल्यानंतर वडापावच्या गाडीवर जाणं बंद केलं. अर्थात त्या ताईला आधी सांगितलं. तीही खूप मानते मला. आजही कधी पार्ल्यात गेलो, तर ताईच्या वडापावच्या गाडीशी जाऊन एखादा वडापाव खाल्ल्याशिवाय परतत नाही.

वडापावची गाडी... हा माझा आयुष्यातील आणि मुंबईतील पहिला जॉब. मेहनत करताना लाजायचं नाही, हे इथे शिकलो. कोणतंच काम लहान-मोठं नसतं. पडेल ते काम करायचं, हे मला इथेच कळलं. त्यामुळे या पहिल्या-वाहिल्या कामाचं मला अजूनही विशेष कौतुक आणि आदर आहे.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...