Showing posts with label साहित्य. Show all posts
Showing posts with label साहित्य. Show all posts

22 June, 2020

द मॅन फ्रॉम बलिया

Image may contain: 1 person, beard and close-up


भारतात पंतप्रधानपदावर विराजमान झालेली व्यक्ती साधारणत: आधी कुठल्या ना कुठल्या मंत्रिपदावर विराजमान होऊन आलेली असते. आजही आणि आधीही, अप्रत्यक्षपणे हा प्रघात राहिलाच आहे. किंवा वरच्या पदाच्या त्या पायऱ्याच म्हणूया. (राजीव गांधी अपवाद. पण ते पंतप्रधान होण्याला वेगळी कारणं होती)

पण चंद्रशेखर हे असे नेते होऊन गेले, जे खासदार राहिले आणि थेट देशाचे पंतप्रधान... अधेमधे ना कुठलं मुख्यमंत्रिपद, ना कुठलं केंद्रीय मंत्रिपद. त्या पदावरून उतरल्यावरही पुढे ते कधीच कुठल्या मंत्रिपदावर गेले नाहीत. जणूकाही सरकारमधील 'पंतप्रधानपद' या एकाच पदासाठी ते बनले होते.

'द मॅन फ्रॉम बलिया' म्हणून देश ज्यांना ओळखतो त्या चंद्रशेखर यांची 'जीवन जैसा जिया' आत्मकथा वाचली. त्याआधी चंद्रशेखर यांच्याबद्दल फारच जुजबी माहिती होती. मात्र, राजकमलनं प्रकाशित केलेली ही त्यांची आत्मकथा त्यांच्या अनेक चढ-उतारांची विस्तृत माहिती देणारी आहे. तीही स्वत: चंद्रशेखर यांच्या शब्दात.

राजनितीने देश के एक साहित्यिक को छिन लिया... असं चंद्रशेखर यांच्याबद्दल हिंदी साहित्य वर्तुळात म्हटलं जाई. हिंदी भाषेवर त्यांचं कमालीचं प्रभुत्व होतं. त्यांच्या आत्मकथेतील भाषा शैलीतून ते लक्षातही येतं.

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील इब्राहिमपट्टीचा राहणारा हा समाजवादी आंदोलनातील धडाडीचा कार्यकर्ता पुढे काँग्रेसमध्ये गेला आणि तिथूनही पुढे बाहेर पडला. या माणसाचं संपूर्ण आयुष्य विस्मयचकित करणारं राहिलंय.

कर नाही त्याला डर कसली, या उक्तीनं जगलेला हा माणूस. एक प्रसंग यात आहे. राम मनोहर लोहियांसारख्या पहाडी व्यक्तीला आपल्या गावात बोलावून, 'आप खाना खा के निकल जाइए' असं बेधडकपणे बोलणारा हा माणूस काय निडरवृत्तीचा असेल, याची कल्पना केलेली बरी.

त्याचं झालं असं की, गावाजवळील वार्षिक कार्यक्रमात आचार्य नरेंद्र देव यांना बोलावण्याचं ठरलं होतं. पण त्यांना ते शक्य नव्हतं म्हणजे आचार्यंनी राम मनोहर लोहियांना जाण्यास सांगितलं. लोहियांना कोलकत्त्यात काही काम होतं, म्हणून ते जाण्यास उत्सुक नव्हते. पण आचार्यंची विनंती टाळणं शक्य नव्हतं. पण कोलकात्याला जाण्यासाठी बलियातून सर्व नियोजन करावं, अशी अट घालून ते बलियात आले. पण येईपर्यंत ते कुरकूर करत राहिले. परत जाण्याचं कुठलंच नियोजन केली नसल्याची तक्रार-कम-आरोप लोहियांनी चंद्रशेखर यांच्यावर केला आणि चंद्रशेखर भडकले.

लोहिया त्यावेळी प्रचंड लोकप्रिय होते. मात्र, आपल्या प्रामाणिक हेतूंवर संशय घेणाऱ्या लोहियांना चंद्रशेखर म्हणाले, 'हमारे कार्यक्रम में आपकी जरूरत नहीं, आप खाना खा के निकल सकते हो' पुढे लोहियांना आपली चूक कळली आणि त्यांनी कार्यक्रम करून जाण्याचा निर्णय घेतला.

चंद्रशेखर यांच्याबद्दलचा हा एकच प्रसंग नाही. देशात ज्यावेळी इंदिरा गांधी यांची प्रतिमा 'आयर्न लेडी' म्हणून प्रस्थापित झाली होती, ज्यावेळी अनेक बडे नेते इंदिरा गांधींसमोर बोलायला बिथरत असत, त्यावेळी चंद्रशेखर हे इंदिरा गांधी यांच्यासमोर परखडपणे बोलण्याचं धाडस बाळगून होते. असाच प्रसंग ते मोरारजी देसाईंबाबत घडलेला सांगतात.

मोरारजी देसाईंशी काहीशा कारणावरून भांडण झालं. लोकसभेतच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. चंद्रशेखर त्यावेळी काँग्रेसमध्येच होते. इंदिरा गांधींनी चंद्रशेखर यांना वैयक्तिकरित्या गाठत सांगितलं, "मोरारजी भाई बडे है. मैं नहीं चाहती आप पार्टी से बाहर हो. आप माफी माँग लिजिए." क्षणाचा विलंब न करता, चंद्रशेखर इंदिरा गांधी यांना म्हणाले, "मैं कोई हिंदू रमणी नहीं हूँ, जो मरते वक्त तक पती का साथ निभाए. स्वाभिमान के साथ जिता हूँ" हे सांग त्यांनी पक्षालाही राम राम ठोकण्याचा गर्भित इशारा दिला. असे होते चंद्रशेखर.

चंद्रशेखर यांच्या समाजवादी ते काँग्रेस या प्रवासावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यावेळीही आणि आताही घेतला जातो. पण समाजवादी असो किंवा कुठे, जिथे चंद्रशेखर गेले, तिथे त्यांनी समाजवाद रुजवण्याचा प्रयत्न केला. राजकारणाचे डावपेच खेळले, पण समाजावादाच्या मुलभूत विचारांशी ते ठाम राहिले.

एकदा स्वत: इंदिरा गांधींनी विचारलं, आप काँग्रेस को समाजवादी मानते हैं क्या? त्यावर चंद्रशेखर म्हणाले, "थोडा मानता हूँ, थोडा मनवाना चाहता हूँ" इंदिरा गांधींना हे काही कळलं नाही. इंदिरा गांधींनी आणखी विचारल्यावर चंद्रशेखर म्हणाले, "अगर काँग्रेस को समाजवाद के तरफ नहीं ले सका, तो काँग्रेस को ही तोड दुँगा" --- इतके स्पष्ट होते चंद्रशेखर.

आणीबाणीनंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांना पंतप्रधानपद मिळेल अशी आशा होती. पण त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. ते न मिळाल्याने चंद्रशेखर नाराज असल्याच्या बातम्या सुद्धा त्यावेळी आल्या. मोराराजींच्या मंत्रिमंडळात त्यांच्या कुठलेच मंत्रिपद न घेण्याच्या निर्णयानं त्या बातम्यांना आणखीच खतपाणी घातलं.

पुढे नोव्हेंबर 1990 ते जून 1991 दरम्यान भारताचे पंतप्रधान झाले. सातच महिने त्यांना कार्यकाळ मिळाला. राजीव गांधींच्या पाठिंब्यावर हे सरकार होतं. खूप टीका झाली या सरकारवर. अर्थसंकल्पही मांडता आला नाही, इतकं अस्थिर सरकार होतं हे. पण ज्यावेळी राजीव गांधी पाठिंबा काढतायेत, अशी कुणकुण लागली, पाठिंबा काढण्याआधीच चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला.

पुढेही ते संसदेत खासदार म्हणून जात राहिले. पण कुठल्याच मंत्रिपदाला पुन्हा स्पर्श केला नाही. आपला जन्म केवळ पंतप्रधानपदासाठीच झालाय, हेच कदाचित ते सांगू पाहत होते की काय, असं वाटून जातं.

जवळपास चार-पाच दशकं राजकारणात राहूनही ते आर्थिकदृष्ट्या कफल्लकच राहिले. एक दिवस त्यांच्या पत्नीनं विचारलं, "आप ने बच्चों के लिए कुछ भी किया नहीं." चंद्रशेखर सांगतात, पत्नीचं ते वाक्य ऐकून मन भरून आलं, काहीच उत्तर देऊ शकलो नाही.

नवी दिल्ली ते कन्याकुमारी असा चार हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून भारत समजून घेणारा, पक्षाचा कार्यकर्ता ते अध्यक्ष होऊनही कुठल्याच मंत्रिपदावर न गेलेला, थेट पंतप्रधानपदावर पोहोचलेला आणि कुणीही पाठिंबा काढण्याआधी देशाच्या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिलेला, उत्तरप्रदेशातील छोट्याशा गावातून आलेला शेतकऱ्याचा पोरगा, राजकारणातल्या भल्याभल्यांना तोंडावर सुनावणारा....हा नेता समजून घेण्यासाठी 'जीवन जैसा जिया' वाचायलाच हवं. वाचताना तुमचा ताबा घेतो हा माणूस - इतकं सुंदर लेखन आहे.

22 August, 2019

‘रॉ’ची गूढ आणि चित्तथरारक गाथा




काश्मीरप्रश्न ऐन भरात असताना आणि त्यावरून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धाडसाबद्दल, एक घाव दोन तुकडे’टाईप निर्णयक्षमतेबद्दल देशभर चर्चा सुरु असताना आणि त्यातच ‘गेल्या 70 वर्षात काय झालं?’ या प्रश्नाची अपार चलती असताना, रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ हे पुस्तक हाती आलं.

वाचताना खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकांबाबत बोलायचं झाल्यास याआधी लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे, अनुराधा पुनर्वसु अनुवादित ‘अमृता-इमरोज’, सारंग दर्शने अनुवादित ‘शोध राजीव गांधी हत्येचा’ आणि अवधुत डोंगरे अनुवादित ‘राजीव गांधी हत्या : एक अंतर्गत कट’ ही तीन पुस्तकं मी वेड्यासारखी वाचली होती. त्यानंतर बहुधा ‘रॉ’वरील हे पुस्तकच त्या वाचन-वेडानं वाचलवं असावं. पुढल्या पानावर काय आहे, याची भयंकर उत्सुकता मनात सातत्याने बाळदग अगदी भान हरपून हे पुस्तक पूर्ण केलं.

जवळपास तीनशे पानांचं पुस्तक आणि चोवीस प्रकरणं अशा या पुस्तकाचं तांत्रिक स्वरूप आहे. झपाटल्यासारखं वाचल्यास दोन किंवा तीन दिवसात पूर्ण होऊन जातं.

कौटिल्याच्या व्यूहनिती इथपासून भारतीय राजवटीदरम्यान असलेल्या ब्रिटिशांच्या गुप्तचरसंस्था, त्यानंतर स्वातंत्र्योतत्तर भारतातील गुप्तचरसंस्था, मग शेजारी देशांमुळे निर्माण झालेल्या सुरक्षेच्या प्रश्नामुळे भारताला आवश्यकता भासू लागलेली पूर्णवेळ गुप्तचरसंस्था आणि त्यातून स्थापन झालेली ‘रॉ’ अर्थात रिसर्च अँड अनालिसिस विंग.

असा सारा प्रवास मांडत असताना रवी आमले सर ज्या उदाहरणांद्वारे भारताच्या गुप्तचरसंस्थेचा इतिहास सांगत सुटतात. ते वाचताना तल्लीन व्हायला होतं आणि अभिमानाने उर भरून येताना काही क्षणी दचकायलाही होतं, काही क्षणी काळजाचा ठोकाही चुकतो, काही ठिकाणी तत्कालीन राजकीय नेतृत्त्वाच्या निर्णयक्षमतेची आदरयुक्त नि अभिमानयुक्त कमालही वाटते.
अमेरिकेची ‘सीआयए’, रशियाची ‘केजीबी’ आणि इस्रायलची ‘मोसाद’ यांसारख्या जगभरात नावाजलेल्या गुप्तचरसंस्थांच्या गौरवगाथा आपण नेहमीच ऐकत आलोय. मात्र, आपल्याला आपल्याच माणसांची कदर नसते’ हे विधान जसे आपण नेहमीच्या आपल्या आयुष्यात वापरतो, तसंचत ते ‘रॉ’साठी लागू होतं. कारण आपल्याच गुप्तचरसंस्थेची कदर आपल्याला नाही की काय, असा प्रश्न विशेषत: आजच्या घडीला ठळकपणे मला पडतो. याचं कारण विद्यमान सरकारने एअरस्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईकचे निर्णय घेतल्यानंतर आधीचे सरकार कसे थंड पडलेले होते, याचं चर्वितचवण करत बसतो. मात्र, एकदा आपण आपला इतिहास नीट डोळ्यांखालून घातला पाहिजे. हा मुद्दा जेव्हा देशाच्या सुरक्षेसंदर्भात येतो, त्यावेळी हे पुस्तक या चर्वितचवणाला सडेतोड उत्तर ठरेल.

रॉ’चा इतिहास आणि गौरवशाली कामगिरी सांगत असताना लेखक केवळ काही प्रसंग किंवा घटनांमध्येच रमत नाहीत. तर या निमित्ताने गुप्तचर प्रांतातील भारताच्या अनुशंघाने काही इतिहिसातील दाखलेही देतात. वेदांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कशाप्रकारे त्या त्या काळात कशाप्रकारे गुप्तहेरांचं अनन्यसाधारण महत्त्व राहिलं, ते लेखक संदर्भासहित सांगतात.

कौटिल्याचा उल्लेख आपल्याकडे आजही सातत्याने होतो. ‘कौटिलीयम् अर्थशास्त्रम्’ या त्याच्या राजनीतीशास्त्रावरील ग्रंथात त्याने गुप्तचर यंत्रणांचाही विशेष उल्लेख केला आहे. त्यात त्याने कापटिक, उदास्थित, गृहपतिकव्यंजन, वैदेहकव्यंजन, तापसव्यंजन, सत्री, तीक्षण, रसद आणि भिक्षुकी असे गुप्तहेरांचे नऊ प्रकार सांगितलेत. भारतीय गुप्तचरसंस्थेच्या स्थापनेत कौटिल्याच्या मांडणीचा मोठा प्रभाव दिसून येतो.

गुप्तचरसंस्थांचं महत्त्वं केवळ कौटिल्याला कळलं होतं अशातला भाग नाही. मधल्या काही काळातही जगाच्या विविध भूभूागावर तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या आवश्यकतेनुसार या यंत्रणांची उभारणी झाली. आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत बोलायचं झाल्यास, छत्रपती शिवाजी महाराजांनी गुप्तहेरांचा योग्य आणि चाणाक्ष बुद्धीने वापर केला.

रवी आमले जसं सांगतात की, दुर्दैवाने शिवरायांच्या गुप्तहेरसंस्थेविषयी आपल्याला फार माहितीच नाही. आणि माहिती असायला तेव्हाची कागदपत्र किंवा काही आज उपलब्धच नाहीत. बखरी किंवा इतर माध्यमातूनच त्यावेळच्या गुप्तहेरसंस्थेविषयी माहिती मिळते.

बहिर्जी नाईक हे शिवरायांच्या हेरखात्याचे प्रमुख होते, एवढेच काय ते आपल्याला माहिती आहे. तेही कशावरून, तर सभासदांच्या बखरीमुळं. ते बखरीत लिहितात, ‘दर हजारी, पंच हजारी, सरनोबत यांजवळून वाकनिसीचे कारकून व हरकारे व जासूद ठेवावे. सरनोबताजवळ बहिरजी जाधव नाईक, मोठा शाहाणा, जासुदांचा नाईक केला. तो बहूत हुशार चौक करून ठेविला’ मात्र, हेर म्हणून बहिर्जी नाईकांबद्दलही आपल्याकडे पुरेशी माहिती नाही. त्यानंतर अगदी सुरतेच्या लुटीप्रकरणातील त्यांची कामगिरी. आपल्याकडे गुप्तहेरांच्या अंगाने इतिहासाकडे पाहिलंच नाही. असो.

तर ‘रॉ’बद्दल लिहिताना रवी आमले इतिहासातही शिरतात. कौटिल्यपासून दाखल देत ते ‘रॉ’च्या स्थापनेपर्यंत पोहोचतात. त्यामुळे केवळ ‘रॉ’चा इतिहास नव्हे, तर एकूण भारतीय गुप्तहेरसंस्थांचा इतिहास कळायला आपल्याला मदत होते.

पंडित नेहरू, लालबहादुर शास्त्री यांसारख्या पंतप्रधानांपासून खरंतर ‘रॉ’सारख्या अस्साल भारतीय गुप्तहरसंस्थेची नितांत आवश्यकता असताना, म्हणजेच देशाच्या बांधणीपासूनच गरज असताना, त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. कदाचित तेव्हाची गुप्तचरस संस्था पुरेशी आहे, असंच गृहित धरलं गेलं. मात्र, त्याचे परिणाम आपल्याला तेव्हा तेव्हा भोगावे लागलेच.

रॉ’सारखी संस्था उभारायची म्हणजे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणातील आपला दूरदृष्टीकोन, आपलं स्थान, देशाच्या सुरक्षाप्रश्नांची नीट माहिती, त्यावर काय करायचंय, याची जाण अशा सर्वच गोष्टींची राजकीय नेतृत्त्वाला माहिती असायला हवी. सोबत अफाट निर्णयक्षमता आणि कुठल्याही कामगिरीसाठी प्रचंड धाडसाचीही गरज असते. या सर्व गोष्टींचा मिलाफ झाला, तो इंदिरा गांधी यांच्या निमित्ताने.

रॉ’च्या अनेक यशांचं किंवा अशी संस्था उभारून तिचा पाया मजबूत करण्याचं श्रेय जसं इंदिरा गांधी यांना जातं, तसंच ते रामेश्वरनाथ काव यांनाही जातं. रामेश्वरनाथ काव यांच्याबद्दल अनेकांना अनेक ठिकाणी वाचलंही असेल. स्वातंत्र्योत्तर भारतातील गुप्तचरसंस्थेचा आणि त्यांच्या पुढील यशोगाथांचा कण म्हणजे रामेश्वरनाथ काव.

भारतातील हेरगिरीचा इतिहास, ‘रॉ’ची स्थापना हे सांगत असताना आणि पुस्तकाला पुढे नेत असताना लेखक भारताच्या जडण-घडणीतले एक-एक प्रसंग आपल्यासमोर मांडतात आणि ‘रॉ’चा गौरवशाली इतिहास सांगतात.

विशेषत: पाकिस्तानच्या फाळणीकडे, मुक्तियुद्ध, मिशन सिक्कीम, ऑपरेशन काहुटा, ऑपरेशन लाल दोरा, खलिस्तानचा खेळ, ऑपरेशन मेघदूत, काश्मीरकथा, लंकाककांड, मिशन नेपाळ या प्रकरणांमधून ‘रॉ’चं महत्त्वं आपल्याला कळून येतं. हे वाचत असताना ‘गेल्या 70 वर्षात तुम्ही काय केलं?’ असं आपल्या आधीच्या सत्ताधाऱ्यांना किमान सुरक्षेच्या प्रांताबाबत तरी विचारण्याचं धाडस होणार नाही. काही ठिकाणी ‘रॉ’ किंवा इतर गुप्तहेरसंस्थाही कमी पडल्या. नाही असे नाही. मात्र, आपण देश म्हणून सुरक्षेबाबत काहीच केले नाही, असं म्हणणं जर अतिशोयोक्तीच ठरावी.

रॉ’सारख्या गुप्तचर संस्थांच्या कारवाया त्या घडत असताना कधीच बाहेर येत नाहीत. त्या पूर्णपणे गुप्त असतात. त्या येतात नंतर. अशा पुस्तकांमधून किंवा कुठल्यातरी संदर्भांनी. कारण गुप्तहेरांची कामगिरी ही काही मर्यादित काळापुरती नसते. अविरत चालणारी प्रक्रिया असते. अशावेळी रॉ’सारख्या संस्थेची कामगिरी, काही घटनांमधील महत्त्वपूर्ण भूमिका वाचयाला मिळाल्यास नक्कीच कुणालाही आवडतं. तेच या पुस्तकाने साधलंय. ‘रॉ’ची माहिती देत असताना वाचकांना खिळवून ठेवतं हे पुस्तक. अर्थात, भारताच्या या गुप्तचरसंस्थेचा इतिहासही तसाच आहे म्हणा, भान हरपून खिळवून ठेवणारा.

आपल्या गुप्तचरसंस्थेने काय केलंय आणि विशेषत: गेल्या 70 वर्षात काय झालंय?’ या प्रश्नांची काहीप्रमाणात उत्तरं मिळवण्यसाठी तरी हे पुस्तक नक्कीच वाचा.

नामदेव अंजना
(प्रतिक्रियेसाठी ईमेल : namdev.anjana@gmail.com)

30 May, 2019

राजीव गांधी हत्या : तपास, कट, प्रश्न आणि पुस्तक

 
राजीव गांधी दूरदृष्टी असलेले नेते होते. देखणा, हुशार आणि मृदू स्वभावाचा हा माणूस. त्यात पंडित नेहरूंचा नातू आणि कणखर शब्दाचं दुसरं रूप असलेल्या इंदिरेचा मुलगा. त्यामुळे अर्थात, राजकारणात आल्यानंतर राजीव यांच्याबद्दल आकर्षण, कुतूहल वगैरे अनेक गोष्टी घेऊन असंख्य भारतीय वावरत होते.

राजकारणात सक्रिय होण्याचे कोणतेही संकेत राजीव यांनी इंदिरा यांच्या मृत्यूआधी दिले नव्हते. त्यामुळे इंदिरा यांची हत्या झाली आणि पक्षीय दबावाला बळी पडत म्हणा किंवा आणखी काही, राजीव राजकारणात आले. ते आले, रुळले आणि देशाला सर्वोत्तम बनवण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले. ते प्रयत्न अर्ध्यात राहिले. काळाने त्यांना जगू दिले नाही.

राजीव यांच्याबद्दल केवळ ऐकून होतो. लिटरली फक्त ऐकून. आपण जसे रामायण, महाभारत केवळ ऐकून असतो ना तसेच. कधीच पूर्ण माहितीपट किंवा एखादे पुस्तक वाचले नव्हते. शाळेत किंवा नंतर मोठ्यांकडून राजीव यांच्याबद्दल ऐकले, एवढीच काय ती माहिती.

पंडित नेहरू यांचा नातू आणि इंदिरा गांधी यांचा मुलगा हीच ओळख किती मोठी...मग कशाला हवं आणखी वाचायला? असा साहजिक प्रश्न अनेकांसारखा माझ्याही मनात होता. झालेही तसेच. मी राजीव यांचे एकाही चरित्र वाचले नव्हते. अद्याप नाही.

राजीव यांच्याबद्दल सर्वप्रथम काय वाचले असेन, तर थेट त्यांच्या हत्येचा शोध घेणाऱ्या आयपीएस डी आर कार्तिकेयन आणि आयपीएस राधाविनोद राजू यांनी लिहिलेले 'शोध राजीव गांधी हत्येचा' हे पुस्तक.

एखाद्या माणसाचा जीवनप्रवास आधी न वाचता थेट हत्येच्या शोधाचा प्रवास वाचला. जेव्हा हे पुस्तक वाचले तेव्हा हादरे बसले होते. कसलं भयंकर कटकारस्थान रचून राजीव यांची नियोजित हत्या केली गेली. प्रभाकरन शिवरासान, नलिनी, धानु, शुभा, पायस इत्यादी कित्येक नावांनी भांबावून सोडलं.

राजीव यांची हत्या एलटीटीई या दहशतवादी संघटनेने केली, हे पुस्तकाच्या दहाव्या - बाराव्या पानापासून लेखक कार्तिकेयन सांगत राहतात. ते वारंवार हेच का सांगत राहतात, याची शंका मलाही आली. पण कदाचित राजीव हत्येचे केंद्र तेच असावे, म्हणून असेल, असेच गृहीत धरले.

ऐन निवडणुकीत राजीव यांची हत्या झाली. १९९१ सली २१ मे रोजी. निवडणूक जिंकून राजीव पुन्हा सत्तेत येतील आणि आपल्या ध्येयाला अडथळे निर्माण होतील, असे समजून प्रभाकरन आणि त्याच्या एलटीटीई या संघटनेने राजीव यांना नियोजित कट रचून संपवले. असे एकूण या पुस्तकात सांगितले आहे. तसे अनेक संदर्भ आणि दुवे सुद्धा दिले आहेत. तपासाची एक विशिष्ट प्रक्रिया पुस्तकात आहे. मात्र तरी अनेक प्रश्न. अनुत्तरित राहतात.

इतर अनेक आरोपी गळ्यात अडकवलेली गोळी खाऊन आत्महत्या करतात, शिवरासनच कसा बंदुकीच्या गोळीने मारला जातो, इथपासून ते डी आर कार्तिकेयन अख्ख्या पुस्तकभर राजीव हत्येचे दुसरे कुठलेच कारण तपासून पाहत नाहीत, त्यांचा रोख केवळ एलटीटीई राहिला आहे. श्रीलंका करार आणि शंतीसेनेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा रोख योग्य असला, तरी इतर शक्यता त्यांनी तपासून पहिल्याच नाही का? काहीसे प्रश्नात बुडवून टाकणारे हे पुस्तक आहे.

हे पुस्तक वाचून झाले आणि काही दिवसांच्या अंतराने 'राजीव गांधी हत्या... एक अंतर्गत कट?' हे फराझ अहमद या क्राईम रिपोर्टरचे पुस्तक हाती लागले. धडाधड वाचत गेलो आणि त्याचं वेगाने हादरे सोसत गेलो. पहिल्या पानापासून हादरे, धक्के, खळबळजनक दावे.

विशेष म्हणजे, राजीव हत्येच्या तपासाचे प्रमुख आयपीएस डी आर कार्तिकेयन यांच्या पुस्तकातील दावे सुद्धा खोडून काढण्याचा प्रयत्न फराझ अहमद यांनी केला आहे. त्यापुढे चंद्रशेखर, पी व्ही नरसिंहराव यांची नावं येतात आणि जागच्या जागी उडायला होतं. इतके धक्के. या पुस्तकाबद्दल अधिक सांगणार नाही. ते तुम्हीच वाचा. कारण अधिक खोलवर कळेल. मी अर्ध्यात सांगून, पुस्तक वाचण्याची तुमची ओढ कमी होईल.

फराझ अहमद यांनी उपस्थित केलेल्या सर्वच प्रश्नांना ठोस संदर्भ नसले, तरी त्यांनी उपस्थित केलेलं प्रश्न, सांगितलेली स्थिती, मांडलेला क्रम आपल्याला चक्रावून टाकतो आणि अनेक ठिकाणी आपणही राजीव हत्येबाबत आणि पुढील तपासाबाबत सुद्धा साशंक होत जातो. राजीव हत्येच्या तपासाचे पुस्तक वाचल्यानंतर आठवणीने हेही पुस्तक न विसरता वाचा.

बाकी काही असो... राजीव यांच्या सारखा दूरदृष्टी असलेल्या उमद्या नेत्याला आणि तंत्रज्ञानसंपन्न आधुनिक भारताचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण नेतृत्वाला भारत मुकला हे खरंय. राजीव असते, तर आजची भारतीय प्रगतीची शिखरे वेगळी असती, हे वेगळे सांगायला नको. आणि अर्थात, राजकीय चित्र सुद्धा वेगळे असते.

नामदेव अंजना

15 April, 2019

वाचनेबल 'पॉलिक्लिक'




पॉलिक्लिक...उण्यापुऱ्या ११० पानांचे पुस्तक. तीन विभागांमध्ये मिळून एकूण १४ लेख. सध्याच्या ट्वेंटी-ट्वेंटीच्या सुपरफास्ट वातावरणात वाचनेबल ठरेल, असे हे छोटेखानी पुस्तक आहे. पण त्यातील माहिती, आकडेवारी, नोंदी, अनुभव एक सुंदर दस्तऐवज आहे. त्यासाठी सर्वप्रथम सोनाली शिंदे या लेखिका-पत्रकार मैत्रिणीचे मनापासून अभिनंदन!
 
आधी म्हटल्याप्रमाणे तीन भागात पुस्तक विभागले आहे. 'उत्सव लोकशाहीचा', 'अण्णा ते मोदी व्हाया निर्भया' आणि 'सोशल मीडियाचे विश्वरूप दर्शन' अशा तीन भागात अनुक्रमे सात, तीन आणि चार लेख आहेत. प्रत्येक विभागाला अनुसरून योग्य विभागणी केलेली दिसते. ही झाली तांत्रिक माहिती. आता पुस्तकातील आशायाकडे वळूया. 

'सोचना तो पडेगा बॉस' या डायलॉगने या पुस्तकाचा शेवट होतो. पुस्तक वाचत असताना आणि वाचून पूर्ण झाल्यावर शेवटचा हा डायलॉग किती समर्पक आहे, हे लक्षात येतं.

निवडणूक आणि एकंदरीत राजकीय पटावर मध्यामांचा उगम, त्यांचा वाढता वापर ते अगदी हा राजकीय पट व्यापून टाकण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकातून लेखिकेने मांडला आहे. हे मांडत असताना स्वानुभव, त्यातून विश्लेषण, तसेच माध्यमांच्या अंगाने देशातील आणि परदेशातील प्रभावशाली आणि दखलपात्र घटनाही यात नोंदवल्या आहेत. त्यामुळे जसे पुस्तकाचे महत्व अधिक वाढते, तसे लेखिकेची संशोधक वृत्ती सुद्धा दिसते. 


'उत्सव लोकशाहीचा' या पहिल्या भागातील सातही लेख भारतातील निवडणुका आणि राजकीय प्रक्रिया यांच्यावर आधारित आहेत.
निवडणुका जाहीर होण्याआधीच माहौल, निवडणुका जाहीर झाल्यावर माध्यमांच्या नजरेतून हा लोकशाहीचा उत्सव आणि उत्साह, हे मांडत असताना लेखिका सोशल मीडिया चे या सगळ्या प्रक्रियेतील शिरकाव सांगते. त्यानंतर अशा आल्या वृत्तवाहिन्या या लेखात माध्यमांचा भारतातील आगमन, प्रवास मांडते. सर्वसामान्य माणसांचे हक्क, अधिकार सांगताना, या माध्यमांचे कसे लोकशाहीकरण झाले, हेही लेखिका सांगते. 

पहिल्या भागात लेखिकेची संशोधक वृत्ती प्रकर्षाने जाणवते. माहितीचा ऐवज देत असताना, तारीख, साल, आकडेवारी यांचा लेखाजोखा आपले ज्ञान वाढवण्यास प्रचंड उपयुक्त ठरेल, असे आहे. भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर आजवरचा निवडणुका आणि त्यातील माध्यमांचा वापर हा वर्षगणिक मांडलेला लेखाजोखा अत्यंत कौतुकास्पद आहे. यातल्या काही लेखात मूळ मथळ्याशी लिंक तुटलेली दिसते. पण माहिती, आकडेवारीने तुडुंब भरलेल्या लेखांमुळे तेवढी कमतरता मोडीत काढतात.

भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजवरच्या निवडणुकांचा इतिहास थोडक्यात मांडताना लेखिकेनी प्रत्येक निवडणुकीचे वैशिष्ट्य सांगितले आहेत. ती सारी वैशिष्ट्य इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे, स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक 4 ते 5 महिने चालली, ही बाब असो वा रामायण मालिकेतील सीतेने जशी लोकसभा निवडणूक लढून जिंकली, तशीच रावणानेही जिंकली. अशा महत्त्वाच्या घटना यात नोंदवल्या आहेत. पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत भारतीय निवडणुकीच्या प्रवासाचा सारा पट मोजक्या शब्दात लेखिकेने मांडला आहे.

दुसऱ्या भागात केस स्टडी टाईप लेख असले, तरी त्यातील लेखात लेखिकेचे पत्रकार असणे ठळकपणे दिसते. अण्णा हजारे आंदोलन, निर्भया केस, मोदींचा उगम या तीन गोष्टींचा पट मांडताना, लेखिकेने माध्यमांच्या अंगाने तिन्ही गोष्टी पडतळल्या आहेत. या तिन्ही लेखात विशेष माहिती नसली, तरी लेखिकेचा व्ह्यू कळून येतो. 

तिसऱ्या आणि शेवटच्या भागात लेखिकेने माध्यम हाच लेखांचा गाभा ठेवून जागतिक स्तरावरील उदाहरणे सांगितली आहेत. अरब स्प्रिंग, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक ही त्यातील दोन महत्त्वाची उदाहरणे. अरब स्प्रिंग वर लिहिलेला लेख विशेष वाचनीय आहे. माध्यमांचा कसा वापर या मध्या आशियातील क्रांत्यांसाठी झाला, याचा लेखाजोखा यात आहे. यातील अरब स्प्रिंगवरील लेख वाचताना जसे आपण तल्लीन होत जातो, तेवढाच इंटरेस्टिंग लेख ओबामा यांच्या उदयावरील आहे.

तिसऱ्या भागातील शेवटचे दोन लेख जागतिक स्तराशी तसे संबंधित नाहीत. मात्र दोन्ही लेख जाता जाता जे डोस वाचकांना पाजले पाहिजे, विशेषतः आजच्या काळातील वाचकांना, ते नेमकेपणानं पाजले आहेत. विशेषतः शेवटच्या लेखात विचार करण्याजोगी मांडणी आहे. मत तुमचं, मेंदू कुणाचा? असा या शेवटच्या लेखाचे नाव आहे. 


सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, माध्यम हा केंद्रबिंदू ठेवून पुस्तकाची गुंफण आहे. भारतातील राजकीय वातावरण, निवडणुका, महत्वच्या घटना, जगातील क्रांतिकारी घटना इत्यादींचा धावता आढावा आणि प्रसंगी सखोल माहिती, आकडेवारी या पुस्तकात वाचायला मिळते. 

माध्यामांनी कसा हा भोवताल हळूहळू व्यापून टाकला आहे, याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. या भोवतालाचे बरे वाईट पडसाद आहेत. काही या पुस्तकात उल्लेख केले आहेत. बाकी पुस्तक वाचताना आपल्या आपसूक लक्षात येतात.

कुठेही एकांगी न होता, तस्थपणे आपल्याकडील अनुभव, माहिती, आकडेवारी इत्यादी वाचकांच्या हाती लेखिकेने सोपवले आहे. लेखिकेचे हे पहिले पुस्तक आहे. त्यामुळं काही बारीक सारीक गोष्टी माफ होतात. म्हणजे, काही लेख घाईने संपवले गेल्यासारखे वाटते. त्यात अजून लिहिता आले असते, असेही वाटून जाते. किंवा उदाहरणे कमी पडतात, प्रसंग आणि व्यक्तिमत्व आणखी फुलवता आले असते, असेही वाटले. पण फार न लांबवता थोडक्यात मोजके आणि नेमके मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखिकेने केला आहे. हा प्रयत्न कौतुकास्पद आणि स्तुत्य आहे. सोनाली शिंदे या लेखिका-पत्रकार मैत्रिणीस पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!!

नामदेव अंजना - namdevanjana.com

31 January, 2019

गांधी हत्येनंतरची 'वावटळ'



वावटळ कादंबरी वाचून पूर्ण झाली. एकर आणि माणदेशी माणसं आणि हे तिसरं पुस्तक. व्यंकटेश माडगूळकर हा माणूस भयंकर पछाडत जातोय. उगाच किचकट किंवा बोजड शब्द न वापरता, हलके फुलके शब्द आणि समजणारी भाषा. काही ठिकाणी त्या त्या स्थितीनुसार अस्सल गावाकडील शब्द येतात. पण पुढचा मागचा संदर्भ लागून, कळून जातं तेही.

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी या माणसाची हत्या झाली. त्या दिवसापासून या कादंबरीच्या कथेला सुरुवात होते. गांधी हत्येनंतर जो काही हल्लकल्लोळ मजला, गोंधळ - गदारोळ झाला, अफराफर मजली अशी सगळी पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. मुंबई-पुण्यातील हिंसेची वावटळ तुफान वेगाने गाव-खेड्यांपर्यंत पोहोचली. ब्राम्हणांची घरं जाळली गेली, शेजारी - पाजारी अचानक जाती शोधून, नामानिराळी झाली, ओळखीनाशी झाली. गांधी हत्येनंतर निर्माण झालेल्या या दंगलीत शेकडो वर्षांपासून जोपासलेली नाती सुद्धा कशी होरपळली, हे या कादंबरीत मांडलं आहे.

गोपू, यशवंता आणि शंकर या तीन ब्राम्हण मित्रांची ही गोष्ट. शंकर ही कथा सांगत कादंबरी पुढे सरकवत नेतो. पुण्यात शिक्षणासाठी - कामासाठी रहात असलेल्या या तिघांना गांधी हत्येनंतर जे पहावे लागले, सोसावे लागले, त्याची ही गोष्ट. जातीने ब्राम्हण असलेल्या गोडसे नामक व्यक्तीने गांधींना मारल्याने, पुण्यात हाहाकार माजला.

पुण्यातील स्थिती दंगलींमुळे भयंकर होत असल्याचे पाहून, तिघेही आपापल्या गावी जाण्यासाठी निघतात. या मार्गात जे अनुभव येतात, ते थरारक आहेत. ब्राम्हण असल्याने आपल्यावर केव्हाही हल्ला होऊ शकतो, हे भय मनात ठेवून वाट चालणारी ही तीन मुलं आपल्याला त्यावेळच्या स्थितीचं भयंकर रूप दाखवू पाहतात.

गावात पोहचेपर्यंत घरात कुणी वाचला असेल की नाही, याची चिंता असते, गावात माणसं ठीक आहेत, पण घरदार जाळून खाक झाले असल्याचे दिसते. रातोरात दंगलखोरांचे गटच्या गट गावावर हल्ले करायला येतात काय, घरदार जाळतात काय, घरातील वस्तू चोरून नेतात काय... हे सगळं गांधींच्या हत्येच्या निषेधार्थ सुरू असते. गांधी महाराज की जय, भारत माता की जय, अशा घोषणा देत, लुटालुट आणि हिंसेचे तांडव गावोगावी झाले, त्याचे हे चित्रण या कादंबरीत आहे. ज्या गांधीने आयुष्यभर अहिंसेचा प्रचार केला, विचार मांडला, त्याच गांधीच्या हत्येनंतर शहरं आणि गावं पेटवली गेली, हिंसेचे रौद्ररूप पाहायला मिळाले, त्या अनुषंगाने या कादंबरीचा विषय आहे.

या कादंबरीचा नायक शंकर आहे. तो विवेकी आहे. गांधी हत्या झाली हे वाईट आणि त्या हत्येमुळे कुणाचा दोष नसलेल्यांची दंगलीत राखरांगोळी झाली, हेही वाईट, हे शंकरला कळत होते. लेखकाने शंकरच्या तोंडून केवळ गांधी हत्येनंतर ब्राम्हणांची झालेली तारांबळ मांडली नाही, तर या काळातही ब्राम्हणांनी आपले वर्चस्ववादी विचार कसे सोडले नाहीत, हेही दाखवून दिले आहे.

शंकरच्या घराला आग लावली गेली म्हणून त्याच्या घरचे गावातील पाटलाच्या घरी आश्रय घेतात. तेव्हाही शंकरची आई तिथे वेगळी चूळ, वेगळे जेवण करते. शंकर विचारतो, आई, अशा स्थितीत सुद्धा तुला हा भेद आठवतो? त्यावर आई म्हणते, आपण आपले सोवळे - कोवळे सोडायचे नाहीत, आता आपल्यासोबत हे जाणार. म्हणजे, कितीही अंगावर आले, कितीही जीवावर आले, तरी जात सोडायची नाही, ही मानसिकता यातून लेखकाने दाखवली आहे. असे सारे एकीकडे असताना, शंकर आणि त्याचे कुटुंब गाव सोडण्याचा निर्णय घेतात, तेव्हा मात्र मन हेलावून जातं.

पेंशन घेऊन उर्वरित आयुष्य गावात घालवण्याचे हेतूने शंकरचे आबा गावात राहायला आलेले असतात. मात्र, गांधी हत्येनंतर उद्भवलेल्या या स्थितीत गावात रहावे त्यांना वाटत नव्हते, ब्राम्हण असल्याने झालेला त्रास त्यांच्या मनावर मोठा आघात करणारा होता, कधीच कुणाच्या वाट्याला न गेलेल्या आबांना फार दुःख झाले, म्हणून गाव सोडण्याचा निर्णय घेऊन, पोराबाळासह शहराच्या दिशेने निघतात, त्यावेळचे संवाद वाचताना आपणही आरपार तुटत जातो.

गांधी हत्या वाईट होती. मात्र त्यानंतर झालेल्या दंगलीत किती नाती दुरावली, जात विसरुन घराला घर चिकटून जगलेली माणसं तुटली, शहरं या ना त्या कारणावरून कोलमडत असतात, मात्र एकीने जगणारे गाव सुद्धा विस्कटले, याचे भयंकर रेखाटन या कादंबरीत आहे. माडगूळकरांनी खूप भिडणारे लिहिले आहे. शक्य झाल्यास कादंबरी नक्की वाचा.

04 January, 2019

कोण पुलं?




आज एकजण तावातावाने सांगत होता, 'पु. ल. देशपांडे म्हणजे तमाम मराठी माणसांच्या गळ्यातले ताईत', 'असा एकही मराठी माणूस सापडणार नाही, ज्याला पुलं माहीत नाहीत'. पुढे आणखी काय काय म्हणत होता. महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न वगैरे. मी थोडे थोडे ऐकून घेतले आणि न राहून बोलूच लागलो.


पु. ल. देशपांडे हे उत्कृष्ट साहित्यिक होते, यात कुठलाच वाद नाही. माझ्यासारख्या वाचकाने तर हे नाकारणे म्हणजे मूर्खपणा ठरेल किंवा पुलंचे लेखन वाचले नाही असा त्याचा अर्थ होईल. मात्र, पुलं माहीत नसलेला एकही मराठी माणूस शोधून सापडणार नाही, हे विधान जरा अतीच होतं राव. आणि आता 'भाई : व्यक्ती की वल्ली'निमित्त अनेकजण हे विधान करत सुटलेत.


पुलंच काय, तुमची कितीतरी लेखक मंडळी आमच्या गावापर्यंत कधी पोहोचलीच नाहीत. हा त्या लेखकांचा दोष की तिथवर शिक्षण पोहोचवणाऱ्या सरकारचा दोष हे खरंच माहीत नाही. पण हे सत्य आहे. मुंबई, पुणे, नागपूर किंवा तत्सम शहरं आणि काही निमशहरी भाग वगळला तर या लेखकांचे लेखन गाव-खेड्यांपर्यंत पोहोचले नाही, हे वास्तव आहे.


दूर कशाला, माझ्या शाळेत अभ्यासबाह्य केवळ एकच पुस्तक होते. तेही मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये खिडकीवर पडलेले असायचे. शिपायांना बोलवण्यासाठी बेल ठेवण्यासाठी त्या पुस्तकाचा नंतर नंतर वापर होऊ लागला, हेही आठवते आहे. ते पुस्तक म्हणजे - श्यामची आई. त्यातल्या सुरुवातीच्या चार - पाच रात्री वाचल्या होत्या.


दहावी होईपर्यंत अभ्यास सोडून कुठलेच पुस्तक आमच्या नशिबी नव्हते. हा माझा व्यक्तिगत अनुभव म्हणून माझ्यापुरता मर्यादित आहे, असे नाही. खरेतर माझा हा अनुभव प्रातिनिधिक आहे, असे मी म्हणेन. कारण अशीच स्थिती कमी - अधिक प्रमाणात ग्रामीण भागात आहे.


आम्हाला तर जगातील सर्व विनोद आपला लक्ष्या, अशोक सराफ, गोविंदा, जॉनी लिव्हर हेच लिहितात की काय, असेच वाटत होते. पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार वगैरे आमच्या गावीही नव्हती. शहराशी संपर्क आला, ग्रंथालयांच्या पायऱ्या चढू लागलो, तेव्हा कुठे पुलं वगैरे काही गोष्ट जगात आहेत, हे कळू लागलं. अर्थात, यात पुलंचा कमीपणा नाही, पण आमच्यापर्यंत त्यांचे लेखन या कधी पोहोचलेच नाही. आजही शंभरतील फार फार तर तीस लोकांना पुलं माहीत असतील. जर सरासरी काढायची तर. अशी स्थितीत असताना आपण किती धाडसी विधाने करतो की, पुलं माहीत नसलेला एकही मराठी माणूस सापडणार नाही वगैरे.


आणि हो, या लिहिण्यातून पुलंना कमी लेखण्याचा प्रयत्न नाही. तर आपल्या शिक्षण व्यवस्थेने म्हणा किंवा वाचक - लेखक किंवा एकंदरीत साहित्यविश्वाने आमच्यापर्यंत हे लेखन कधीच पोहचवले नव्हते. आजही अशीच स्थिती आहे. हे वास्तव आपण स्वीकारून साहित्य गावापर्यंत पोहचवले पाहिजे. तरच या लेखकांवर सिनेमे निघाले तर प्रेक्षक येतील.


बाकी मुंबई - पुणे किंवा तत्सम शहरांमध्ये ज्या गोष्टी घडतात, त्या प्रमाण मानून अवघ्या राज्याला किंवा कधी कधी जगाला पण लागू होतात, असले अवाजवी धाडस काहीजण करतात ना, त्यांची फारच कमाल वाटते. या शहरी डबक्यातून बाहेर पडून पाहण्याची गरज आहे. हे बाहेरचे जग खूप गोष्टींपासून अद्याप अनभिज्ञ आहे. अर्थात, ते अनभिज्ञ राहू नये, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.


खूप विस्कळीत लिहिले आहे. पण इन शॉर्ट, अनेक साहित्यिक नि त्यांचे साहित्य शहरांच्या वेशी ओलांडून शेताच्या बांधावर कधी पोहोचलेच नाही. ते पोहोचायला हवे.

24 April, 2018

वाचनप्रवास


काही महिन्यांपूर्वीचा फोटो आहे हा. आता आणखी एक थर वर बांधला आहे. मी फार निवडक पुस्तकं खरेदी केली आहेत. कथा, लोककथा, प्रवासवर्णन, कादंबरी, कवितासंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, आत्मचरित्र इ. पुस्तकांनी भरलेला असा हा माझा किताबखाना आहे.

कुणाला नाटक पाहायला आवडतं, कुणाला सिनेमा, कुणाला मुशाफिरी, तर कुणाला आणखी काही. पोटा-पाण्याच्या धबाडग्यातून बाहेर पडून, आवडत्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तसाच माझाही. मला पुस्तकं वाचायला आवडतात. खूप खूप आवडतात. इतकं इतकं वाचायला आवडतं, की मॅक्झिम गॉर्कीची भलीमोठी ‘आई’ कादंबरी एका बैठकीत संपवलीय.

दहावीपर्यंत पाठ्यपुस्तकांपलिकडे ‘श्यामची आई’ वगळता फार काही वाचले नव्हते. तसेही गावी कथा-कादंबऱ्यांसारखी पुस्तके नसायची. आमच्या शाळेलाही लायब्ररी वगैरे नव्हती. आताही एका कपाटाची आहे. त्यामुळे अभ्यासापलिकडे वाचन व्हायचं नाही.

अकरावीपासून पुढील शिक्षणासाठी मुंबईत आलो आणि अर्थात पावलं कॉलेजच्या लायब्ररीकडे वळली. म. ल. डहाणूकर कॉलेजला असतानाही फार अवांतर वाचन झालं नाही. एकतर पार्ट टाईम जॉब, त्यात इंग्रजीतून सर्व विषय आणि नाट्य मंडळात जाणारा वेळ. या साऱ्या गोष्टींमुळे तिथेही वाचनाकडे फार वळलो नाही.

पुढे पत्रकारितेसाठी साठ्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इथे खऱ्या अर्थाने वाचनाला सुरुवात झाली. गोडी लागली. वर्षानुवर्षांचा अनुशेष भरुन काढावा अशा पद्धतीने वाचायला सुरुवात केली.

साठ्ये कॉलेजची लायब्ररीत हजारोंच्या पटीत पुस्तके आहेत. थेट लायब्ररीत जाऊन, हवे ते पुस्तक निवडून, घरी घेऊन जाऊन वाचण्याची मुभा होती. लायब्ररीचे सर्व काका तसे होते म्हणा. शिवाय इथे लाभलेले सर्व शिक्षकही वाचनाच्या आवडीला पुरक ठरले.

वादविवाद, वक्तृत्त्व, कथाकथन इ. स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागलो आणि त्यामुळे वाचनाला आणखी प्रोत्साहन मिळालं.

डॉ. कुंदा प्रमिळा निळकंठ, प्रा. गिरीजा गुप्ते, प्रा. गजेंद्र देवडा, प्रा. समीर जाधव यांच्यासारख्या शिक्षकांमुळे वाचनात आणखी भर घालत गेलो.

कुंदा मॅडमच्या घरात तर स्वत:ची लायब्ररी आहे. तिथे जाऊन वाचता यायचं. शिवाय कुंदा मॅडमनी सूचवलेले प्रत्येक पुस्तक बौद्धिक खुराक असायचा. आजही असतो. गिरीजा गुप्ते मॅडमने सूचवलेली अनेक पुस्तके वाचली. देवडा सरांनाही वाचनाची प्रचंड आवड आहे. वादविवाद स्पर्धांच्या निमित्ताने विविध विषयांवर समीर सरांनी पुस्तके सूचवलेली. प्रा. केतन भोसले सरांशीही विविध विषयांवर कॉलेजच्या पॅसेजमध्येच उभे राहून चर्चा करायचो. वर्ल्ड इज फ्लॅटसारखं पुस्तक केतन सरांनी सूचवलं होतं. एकंदरीत शिक्षक मंडळीच वाचनाला प्रोत्साहन देणारी ठरली.

वाचनाची ही भूक प्रचंड वाढत गेली. साठ्ये कॉलेजची लायब्ररी, पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ, गोरेगावमधील केशव गोऱ्हे स्मारक ट्रस्टची लायब्ररी अशा तीन लायब्ररींनी वाचनाची भूक खूप भागवली. त्यांनतर पुस्तके विकत घेण्यासाठी पार्ल्यातील मॅजेस्टिक डेपो, दादरमधील साहित्य अकादमी, भूपेश गुप्ता भवन हे गाठायचो. केशव गोऱ्हे स्मारक आणि दादरचे संदर्भ ग्रंथालय इथे दिवस दिवस बसून वाचल्याचे प्रसंग आहेत.

नंतर एबीपी माझामध्ये कामाला लागलो आणि पार्ला किंवा दादरकडे जाणे कमी झाले. त्यात पार्ल्यातून मी दाहिसरला राहायला गेलो. ट्रेन कनेक्टिव्हिटीमुळे मुंबईत तसे काही जवळ-दूर हा प्रकार नसला तरी ट्रेनमधील गर्दीचा विचार करता दूरच गेलो म्हणायला हवे. पर्यायाने दादरला जाऊन पुस्तके खरेदी करणे कमी झाले. पण याची कमतरता बोरिवलीमधील येशू पाटील सरांच्या ‘शब्द’ गॅलरीने भरुन काढली.

पुस्तकांसोबतच वाचनाची इतर माध्यमंही हाताळत असतो. चित्रलेखा, लोकप्रभा, साधना, इंडिया टुडे (हिंदी), डाऊन टू अर्थ यांसारखी मासिकं, सप्तरंग (सकाळ), लोकरंग (लोकसत्ता), संवाद (मटा), मंथन (लोकमत), लिटररी रिव्ह्यू (द हिंदू) यांसारखे वृत्तपत्रीय लेखन, राईट अँगल, एक रेघ, बिगुल, अक्षरनामा यांसारखी ऑनलाईन पोर्टल, कविता-शेरो-शायरी वाचनासाठी रेख्ता, आठवणीतली गाणी, कविताकोश या वेबसाईट्स, दिवाळी अंक, विशेषांक इत्यादी गोष्टी वाचनाची भूक भागवण्यास मोठी मदत करतात. याआधी युवराज मोहिते सरांचं ‘कलमनामा’ आणि शिरीष पारकरांचं ‘महाराष्ट्र माझा’ सुद्धा वाचायचो. आता बंद झालंय. पण बहुतांश अंक आजही संग्रहित आहेत.

आणखी एक गोष्ट म्हणजे काही खास पुस्तकेही माझ्या संग्रही आहेत. खास म्हणजे, प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. कुंदा मॅडम, सतीश काळसेकर, कोंकणी लेखक दामोदर मावजो इत्यादींनी स्वत:च्या स्वाक्षरीनिशी भेट दिलेली पुस्तके माझ्या किताबखान्यात आहेत. एकंदरीत पुस्तकांबाबत फारच सुखी माणूस आहे मी.

पुस्तकंच वाचतो म्हणून अनेकजण टोमणे मारतात, काहीजण विविध विषयांचे रेफरन्स मागतात, काहीजण पुस्तकं सूचव म्हणतात, काहीजण पुस्तकेच वाचण्यासाठी मागतात वगैरे वगैरे. मात्र या साऱ्या गोष्टी सांभाळत मी माझे वाचन नियमित सुरुच ठेवतो. कारण केवळ बौद्धिक भूक भागवणे हे या वाचनामागचा माझा हेतू नाही, तर वाचन माझी आवड आहे. मला त्यातून आनंद मिळतो. नवनव्या गोष्टी कळतात. विविध गोष्टींचे कुतुहल वाढवतात. आपल्याला अनेक गोष्टी माहित असाव्यात, या कुतुहलापोटी वाचनाचा प्रवास सुरु झाला होता, तो आता सवयीपर्यंत येऊन ठेपला आहे.

पुस्तक दिनाचं निमित्त साधत हे लिहिलं आहे. चार-पाच ओळीत काहीतरी लिहीन म्हटलं आणि हे असं लांबलचक झालं. तरी वाचनाच्या या प्रवासातील अनेक रंजक किस्सेही आहेत. ते लिहियाला घेतले तर आणखी लांबलचक होईल. म्हणून इथेच थांबतो. पण पुस्तकांचाच विषय आहे म्हणून नागराज मंजुळेंच्या पुस्तकावरील एका कवितेने समारोप करतो. मला ही कविता फार आवडते.
मी एकाकी आहे
आणि या निर्घृण जगात
एकट्या-दुकट्या माणसानं
स्वरक्षणार्थ काही बाळगावं
म्हणून पुस्तक बाळगतो
मी कुठेही असो
पुस्तक सोबत असतंच
मी ते वाचत नसलो
तरी पडून असतो
छातीवर घेऊन प्रेयसीसारखं
वेळीअवेळी
मला एकटा पाहून
धावून येणाऱ्या ओसाडावर
मी पुस्तकच परजतो... तलवारीसारखं.

12 April, 2018

आँधी हमारे बस में नहीं, मगर...



फेसबुक, ब्लॉग यांसारख्या माध्यमांचा प्रभाव सर्वश्रुत आहे. तरी अनेकांना शंका असतेच. त्यामुळेच ते इथल्या लेखनाला दुय्यम समजतात. मला ते पटत नाही. मध्यामात काम करत असताना, एवढे नक्कीच लक्षात आले आहे की सोशल मीडियाचा प्रभाव दखल घेण्याजोगा झाला आहे. कारण महिन्याकाठी किमान चार ते पाच तरी बातम्या सोशल मीडियातून आलेल्या असतात. इन शॉर्ट.. या माध्यमाचा प्रभाव आहेच.

इन जनरल न बोलता स्पेसिफिक माझ्यापुरते बोलून, ते जनरालाईज् करतो. म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.

फेसबुक किंवा ब्लॉगवर लिहिताना मी कुठलेही विधान करताना उथळपणा टाळतो. एखादी पोस्ट लिहिल्यावर त्यातील एखाद्या मुद्द्यावर कुणी प्रश्न विचारला, तरी त्यावर स्पष्टीकरण देण्याची तयारी ठेवतो.

मागे मी रावते, पवार, मनसेवर लिहिलेले ब्लॉग हे कित्येक संदर्भ शोधून, चर्चा करुन लिहिले होते. कारण उद्या कुणी त्यातून आपल्याला खोडून काढू नये किंवा कुणी चूक दाखवली तर त्या मुद्द्याचा प्रतिवाद करता यावा.

माझी हुशारी वगैरे सांगण्याचा हेतू नाही. पण इथे गांभीर्याने लेखन केले जाते, हे कळावे म्हणून वरील उदाहरणे दिली. किंबहुना, मीच नव्हे, असे अनेकजण इथे सिरीयसली लेखन करतात. थोडक्यात या व्यासपीठावर सुद्धा जबाबदार लेखन केले जाते.

असे सारे असताना, सोशल मीडियावर (फेसबुक, ब्लॉग इ.) लिहिणारे वायफळ लिहितात, उथळ असते, त्यावर विश्वास ठेवू नये इत्यादी सरसकट विधाने जबाबदार लोकांनी टाळली पाहिजेत आणि या लेखनाकडे सुद्धा गांभीर्याने पाहिले पाहिजे.

मला या ठिकाणी आशुतोष जावडेकर यांचे एक विधान मुद्दाम नमूद करावे वाटते. ते म्हणतात, "सोशल मीडियातील लेखन म्हणजे साहित्याचे लोकशाहीकरण आहे." मला हे अगदी पटले आहे. इथे प्रत्येकजण व्यक्त होतो. ते चूक की बरोबर हा मुद्दा नंतर येतो. मुक्तपणे व्यक्त होता येणे, हे महत्त्वाचे. कदाचित आम्ही लिहितो ते 'अग्रलेखी' भाषेत नसेल, पण 'थेट' असते, एवढे नक्की.

सरते शेवटी तेच... व्यक्त होण्यासाठी प्रत्येक युगाचे, प्रत्येक पिढीचे एक माध्यम असते. आजच्या युगाचे, पिढीचे माध्यम सोशल मीडिया आहे, असे म्हणूया. ते स्वीकारले पाहिजे. त्यावर टीका करुन लिहिणाऱ्या मंडळींचे खच्चीकरण करु नये.

आणि हो, आमच्या लेखनाचा प्रभाव किती असेल माहित नाही. पण तरीही आम्ही लिहिणार, बोलणार आणि न पटलेल्या गोष्टींना धडका मारणारच. इथे शेवट करताना मला अझहर इनायती यांचा शेर आठवतो, त्यानेच शेवट करतो. या शेरमधून सोशल मीडियावरील लेखनामागची माझी किंवा माझ्यासारख्या अनेकांची भूमिका लक्षात येईल...
ये और बात कि आँधी हमारे बस में नहीं..
मगर चराग़ जलाना तो इख़्तियार में है..

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...