23 August, 2018

नय्यर साब


कुलदीप नय्यर काय करायचे की, वाघा-अटारी सीमेवर जायचे. दरवर्षी १४ किंवा १५ ऑगास्टला. आणि तिथे जाऊन मेणबत्त्या लावायचे. हे गेली पंधरा - सोळा वर्षे सुरू होते. यामागे उद्देश एकच - भारत आणि पाकिस्तान या दोन देशात शांतता प्रस्थापित व्हावी. किती छोटीशी कृती, पण किती उदात्त अर्थाचा संदेश!
आज कुलदीप नय्यर यांचं निधन झालं. आता यापुढे सीमेवर जाऊन मेणबत्त्या पेटवून शांततेचा संदेश कोण देईल की नाही, ते माहित नाही. पण १४ आणि १५ ऑगस्टला वाघा अटारी सीमा 'कुलदीप नय्यर' नावाच्या शांतीदूताची वाट पाहत राहील, एवढं नक्की.
स्वातंत्र्यपूर्व भारतात जन्म. आता पाकिस्तानात असलेलं सियालकोट हे जन्मगाव. वयाच्या पंचविशी-तिशीत फाळणी झाली. त्यामुळे फाळणीच्या जखमा झाल्या, त्यावेळी ते जाणते होते. दोन्हीकडील लोकांचे अश्रू त्यांनी पाहिले होते. कदाचित म्हणूनच या दोन देशांनी शांततेत राहावे, यासाठी मरेपर्यंत त्यांचा जीव तुटत राहिला.
दोन वर्षांपूर्वी अरुण शेवते सरांच्या ऋतुरंग दिवाळी अंकात फाळणीचा अनुभव कुलदीप नय्यर यांनी कथन केला आहे. वाचताना अंगावर काटा येतो. काय तो थरार!!!
कितीतरी ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होता हा माणूस. फाळणी असो वा भारत - पाकिस्तान युद्ध, आणीबाणी असो वा देशाच्या खासगी रणनीती.
लाल बहादुर शास्त्री यांचे ते माध्यम सल्लागार होते. शास्त्रींचे निधन झाले, त्यावेळी ते त्यांच्यासोबत होते. शास्त्रींच्या निधनाच्या कारणाबाबत अजूनही दबक्या आवाजात संशय घेतला जातो. या विषयावरही अधिकाराने आणि नेमके बोलणारे नय्यर हेच होते. ते अनेकदा बोललेही. नाही असे नाही.
भारत पाकिस्तान यांची फाळणी ज्या इंग्रज अधिकाऱ्याने केली. म्हणजे ज्याने पाहणी करून सीमा रेषा आखून दिली, त्या रेडक्लिफ या अधिकाऱ्याची लंडनमध्ये जाऊन नय्यर यांनी भेट घेतली आणि फाळणी नक्की कशी झाली, याची माहिती घेतली. नकाशा होता का, किती शहरे इकडे, किती शहरे तिकडे असे काही ठरले होते का, हे नय्यर यांनी त्याला विचारले होते. त्याचा दस्तऐवज सुद्धा त्यांच्याकडे होता.
स्वातंत्र्योत्तर भारताची वाटचाल, धोरणे, चुकीचे निर्णय वगैरे गोष्टींवर अधिकाराने बोलणारा, माहिती देणारा माणूस आपण आज गमावला.
८० हून अधिक वृत्तपत्र, १४ विविध भाषांमधून लेखन, अनेक पुस्तके, व्याख्याने... विचारविश्व किती मोठे होते या माणसाचे!!
कुलदीप नय्यर आज गेले. ९५ वर्षांचे होते. वय झालेच होते. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता नांदावी म्हणून आपल्या पत्रकारितेच्या पलिकडे जात प्रयत्न करणारा सच्चा मानवतावादी आज हरपला.
खरं सांगतो, आज भारत - पाकिस्तानच्या सीमेवरील तीक्ष्ण काटेरी कुंपण सुद्धा भावूक झालं असेल. नय्यर साब, तुम्हाला आदरांजली.

नामदेव अंजना | www.namdevanjana.com

22 August, 2018

गुरुदास कामत : विद्यार्थी नेता ते केंद्रीय मंत्री


ऑफिसमधून घरी येताना शेअर टॅक्सीने येत होतो. अंधेरीहून निघाल्यानंतर पुढे गोरेगावपर्यंत बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील स्ट्रिट लाईट पोलवर बॅनर अडकवले होते. राजीव गांधींचा मोठा फोटो आणि खाली उजव्या कोपऱ्यात गुरुदास कामत यांचा छोटासा फोटो.
टॅक्सीत असल्याने बॅनरवरील मजकूर नीट वाचता येत नव्हते. बॅनरवर काय लिहिले होते ते, कळत नव्हते. पण आजच गुरुदास कामत यांचं निधन झाल्याची बातमी करुन आलो होतो. त्यामुळे मनात अंदाज लावला, गुरुदास कामत यांना श्रद्धांजली अर्पण करणारे पोस्टर असतील. पण विचार आला, मग राजीव गांधी का पोस्टरवर? स्थानिक कुणीतरी कार्यकर्ते असायला हवे होते.
पुढे एका ठिकाणी ट्राफिकमध्ये अडकलो, तेव्हा बॅनरवरील मजकूर वाचला. तर ते बॅनर राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त (20 ऑगस्ट) आदरांजली अर्पण करणारे होते. गुरुदास कामत यांनीच लावलेले.
गुरुदास कामत हे राजीव गांधी यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. असे म्हटले जाते की, गुरुदास कामत युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना राजीव गांधी मुंबईत दौऱ्यानिमित्त आले की, त्यांची गाडी चालवण्यापासून सर्व पाहत असत. (या पोस्टसोबत जोडलेला फोटो पाहू शकता. यातही युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना गुरुदास कामत गाडी चालवत आहेत, आणि मागे राजीव गांधी बसलेत.) पक्षाचा वरिष्ठ म्हणूनच नव्हे, तर वैयक्तिकरित्या ते राजीव गांधींच्या प्रभावात होते. त्याच राजीव गांधी यांना जयंतीदिनी आदरांजील अर्पण करणारे लावलेले बॅनरही उतरले नाहीत, तोच गुरुदास कामत यांचं निधन झालं. आता त्याच ठिकाणी उद्या त्यांचे बॅनर लागतील. हा विचार करुनच काळजात थोडसं धस्स झालं.
गांधी घरण्याचे ते कायमच एकनिष्ठ राहिले. पक्ष सोडण्यापर्यंत पावलं नेली असताना, केवळ गांधी कुटुंबीयांच्या आदराखातर ते शांत बसले.

गुरुदास कामत शांत स्वभावाचे होते. पार्ल्यात असताना कृष्णा हेगडे यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांची दोन भाषण ऐकलीयेत. शांतपणे बोलणं, हे वैशिष्ट्य. उगाच अकांडतांडव नव्हता. संजय निरुपम यांच्यासारख्या काहीशा आक्रमक नेत्याशी त्यांचं कधीच पटलं नाही, ते बहुधा त्यांच्या या शांत स्वभावामुळेच असावे.
गुरुदास कामत यांना घरातून कोणताच राजकीय वारसा नव्हता. वडील खासगी क्षेत्रात होते. कुर्ल्यात लहानाचे मोठे झालेले गुरुदास कामत यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेपासून आपला प्रवास सुरु केला. म्हणजे ग्राऊंडपासून.
गुरुदास कामत यांना राजकारणात जे काही मिळाले, ते आयतं मिळालं नाही. मेहनत, एकनिष्ठपणा आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी सर्व पदं मिळवली. पोद्दार कॉलेजचा विद्यार्थी संघटनेचा सेक्रेटरी ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष, त्यानंतर काँग्रेसचा सदस्य ते युवक काँग्रेसचा अध्यक्ष, पुढे आपल्या गुणांच्या जोरावर ते अगदी केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचले.

मुंबई काँग्रेस आणि गुरुदास कामत हे एक समीकरण बनले. मुंबईतल्या पहिल्या पाच नेत्यांमधील गुरुदास कामत होते. मुरली देवराही होते. मात्र मुरली देवरा हे कायमच उच्चभ्रूंचे नेते वाटायचे. ते कधीच कार्यकर्त्यांसोबत मिसळले नाहीत, असे जाणकार सांगतात. गुरुदास कामत तसे छोट्य-मोठ्या आंदोलनातही रस्त्यावर उतरत. म्हणून तर संजय निरुपम यांच्याशी वादानंतर मुंबई काँग्रेस आरपार दुंभगल्यासारखी झाली होती. आणि हाय-कमांडला हस्तक्षेप करावं लागलं होतं.
गुरुदास कामत यांच्या जाण्याने राज्यात किंवा देशात काँग्रेसला मतांच्या दृष्टीने फारसा फरक पडणार नाही, हे स्पष्ट आहे. मात्र केवळ तिकिटांसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या नेत्यांच्या काळात गुरुदास कामत यांच्यासारखा कमालीचा एकनिष्ठ नेता काँग्रेसने आज गमावला, एवढं निश्चित.
उद्या ऑफिसमधून येताना, हायवेवरील त्याच बॅनरच्या जागी गुरुदास कामत यांना आदरांजली वाहणारे बॅनर पाहताना, कामतांचा हा प्रवास पुन्हा आठवेल, एवढं नक्की. गुरुदास कामत यांना मनापासून आदरांजली.

नामदेव अंजना | www.namdevanjana.com

17 August, 2018

स्पायडर आणि मसणजोगी

ढसाळ लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये सविता प्रशांत यांची ‘मसणवाटा’ डॉक्युमेंट्री पहिली होती. त्यानंतर आणखी माहितीसाठी शोधाशोध केली होती, त्यावेळी प्रशांत पवार यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख वाचला. आमच्या गावाकडं (रोहा-रायगड) मसणजोगी समाज नाही, त्यामुळे ते भयंकर अन् विदारक जीणं कधी पाहिलं नव्हतं, त्याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे डॉक्युमेंट्री पाहिल्यावर आणि नंतर प्रशांत पवारांचा लेख वाचल्यानंतर अधिक अस्वस्थ वाटलं होतं.
“आम्ही लोकांच्या मरणाची वाट पाहत असतो. कारण कुणीतरी मेला, तर आमच्या पोटाला अन्न मिळण्याची तजवीज होणार असते”, अशा आशयाचे संवाद त्या डॉक्युमेंट्रीमध्ये ऐकल्याचे आठवते.
मसणजोगी हा भटक्या जमातींपैकी समाज. गावकुसाबाहेर पालावरचं त्यांचं जगणं. अंत्यविधीसाठी लाकडं पुरवण्यापासून सरण रचण्यापर्यंतची कामं हा समाज करतो. स्मशाणातच झोपडी बांधून, मसणवट्याची राखण करतो. मेलेल्या व्यक्तीचे कपडे, वस्तू हक्काने मागून ते वापरतात. त्यांना त्यात काहीही वावगं किंवा भितीदायक वाटत नाही. कारण तेच मसणजोगी समाजाचं जगणं बनलंय. एकंदरीत जिथे इतर माणसांचा मृत्यू होऊन शेवट होतो, तिथून मसणजोगी समाजातील लोकांच्या जगण्याची सुरुवात होते.
किती भयंकर आहे हे! पण हे वास्तव आहे. आजही महाराष्ट्रात हा समाज आहे. कुणाच्यातरी मरणाची वाट पाहत, रोज सकाळी उठतो. कारण त्याचे जगणे कुणाच्यातरी मरणावर अवलंबून असते. असले विदारक जगणे आपल्याच राज्यात, आपल्यापासून काही भौगोलिक अंतरावर असताना आपण विकास आणि प्रगतीच्या गप्पा मारतो, हे किती विसंगत आहे!
मसणजोगी समाजाशी संबंध सांगणारा ‘स्पायडर’ हा सिनेमा २०१७ साली तामिळ, तेलुगू भाषेत प्रसिद्ध झाला होता. आता तो हिंदीत सुद्धा डब करण्यात आलाय. त्यामुळे पाहण्याची संधी मिळाली. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबू ‘स्पायडर’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. थ्रिलरपट असणारा हा सिनेमा समाजातील अत्यंत महत्वाच्या विषयाला अप्रत्यक्षपणे हात घालतो. मात्र आपल्याकडे फक्त तो थ्रिलर म्हणूनच पाहिला जाईल. मला त्या सिनेमातल्या खलनायकाच्या आयुष्याचा धांडोळा घेण्यात आणि त्यावर बोलण्यात स्वारस्य आहे. त्यावरच या ब्लॉगमधून बोलणार आहे.
‘स्पायडर’ सिनेमा पाहताना मला मसणजोगी समजावरील सविता प्रशांत यांच्या 'मसणवाटा' डॉक्युमेंट्रीची लख्खपणे आठवण झाली. कारण या सिनेमातील खलनायक मसणजोगी कुटुंबातून आलेला असतो. एवढाच संबंध नाही, तर खलनायक होण्याला सुद्धा त्याचे मसणजोगी कुटुंबातील असणे कारणीभूत असते. खलनायक म्हणून त्याच्याबद्दल चीड सिनेमा संपेपर्यंत निर्माण करण्यात दिग्दर्शक-लेखक वगैरे यशस्वी होतात. त्यासाठी मास-मर्डरचा वगैरे आधार घेतला गेलाय. मात्र तरीही काळजाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात खलनायकाबद्दल आस्था सुद्धा टिकून राहते.
थांबा.. तुमचा गोंधळ होईल, म्हणून इथे सिनेमाची स्टोरी थोडक्यात सांगतो. जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल.
शिवा (महेशबाबू) आयबी ऑफिसमध्ये फोन टॅपिंग विभागात काम करत असतो. त्याच्या कामाच्या अन् बुद्धीच्या हिशेबाने त्याला कमी पगार असतो. महिना केवळ ४० हजार रुपये. मात्र तो त्याच्या कामाचा विधायक वापर करत असतो. त्यामुळे त्याला त्यात रस असतो.
खरतर वरिष्ठांच्या आदेशाशिवाय टॅपिंग केलेले फोन कॉल ऐकायचे नसतात. पण शिवा ऐकतो आणि कुणी अडचणीत असेल, तर त्याला वाचवतो. हे सारे नियम विरोधी असते, पण शिवा विधायक वापर करु इच्छित असतो. कारण त्याला वाटते की, गुन्हा घडून गेल्यानंतर तपास, कोर्ट, शिक्षा वगैरे गोष्टी मुर्खपणाच्या आहेत. गुन्हा आधीच रोखता आला पाहिजे आणि आपण नियमबाह्य जाऊन तसे काम करायचे. गुन्हे रोखायचे. आणि तो तसे करण्यास सुरुवात करतो.
असेच एक दिवस एक मुलगी अडचणीत असल्याचे शिवाला तिच्या कॉलवरुन कळतं. तो तातडीने जवळच राहणाऱ्या त्याच्या पोलीस मैत्रिणीला तिच्या घरी जायला सांगतो. दुसऱ्या दिवशी बातमी असते की, शिवाची पोलीस मैत्रीण आणि अडचणीत असलेली मैत्रीण दोघींचीही हत्या झालीय. याचा शिवाला जबर धक्का बसतो. या धक्क्यात शिवा असताना, पोलीस आयुक्तांच्या फोन कॉलवरुन शिवाला कळते की, हा कुणीतरी सिरीयल किलर आहे, जो माणसांना मारत सुटलाय. इथेच सुरु होते सिनेमाची कथा.
खलनायक कोण आहे, तो लोकांना का मारत सुटला आहे, याचा शोध घेत शिवा खलनायकाच्या मुळापर्यंत पोहोचतो. ‘भैरव’ असे खलनायकाचे नाव असते. भैरव, त्याचा भाऊ भारथ, त्याची आई आणि वडील, असे चौघेजण स्मशानात राहत असतात. आजूबाजूच्या गावातील कुणी मेला, तर त्याचे अंत्यविधी करुन हे कुटुंब आपल्या जगण्याचं रहाटगाडं हाकत असतात. गावात कुणी मेला, की भैरवला प्रचंड आनंद होत असे. लोकांचं रडणं पाहून त्याला हसू येत असे. ते हसू विकृत म्हणायचं की, जगण्याची अपरिहार्यता, हा प्रश्न सिनेमा संपेपर्यंत माझ्या मनात कायम होता आणि अजूनही आहे.
एक वेळ अशी येते की, महिनाभर आजूबाजूच्या गावात कुणीच मरत नाही. त्यामुळे घरात प्रचंड अस्वस्थाता निर्माण होते. भैरव थोडा वेगळ्या स्वभावाचा असतो. कुणी मेला तरच आपलं आयुष्य चालणार, इतर वेळी भीक मागून जगायचं. या जगण्याची त्याच्या मनात तीव्र चीड असते.
याच रागातून भैरव गावातील चौघांची वेगवेगळ्या प्रकारे हत्या करतो. पाचवी हत्या करताना भैरव गावातील एकजण पाहतो आणि मग तो गावकऱ्यांना सांगतो. यातून गावकरी भैरवचं स्मशाणातील झोपडी जाळतात. त्यात भैरवची आई आणि वडील जळून खाक होतात. भैरव आणि भारथ हे दोघेच भाऊ वाचतात. आणि हेच पुढे खलनायक होतात.
एखाद्या सायको-सिरियल किलरसारखे हत्या करत सुटतात. हत्या झाल्यानंतर तिथल्या रडणाऱ्या लोकांचा आवाज ऐकण्यात दोघांना आनंद मिळत जातो. लोकांचं रडणं आवडण्याचं हे वेड लोकांच्या हत्या करण्यात परावर्तीत होतं आणि यातून शेकडो हत्या भैरव करत सुटतो.
मग एकेदिवशी भैरवचा भाऊ भारथ महेशबाबूच्या हाती लागतो आणि नंतर एका स्ट्रॅटेजिक प्लान करुन महेशबाबू भैरवलाही पकडतो. आणि दोघांनाही ठार करतो. वगैरे वगैरे. सिनेमा संपतो.
सिनेमा संपल्यानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतातच की. मसणजोगी समाज हा काही गुन्हेगारी समाज नाही. मात्र तरीही त्यांच्या समस्या, त्यांच्या मनात येत असणारे विचार या सगळ्याचा ज्यावेळी आपल्या मनात काहूर माजतो, त्यावेळी खलनायकाबद्दल अधिक विचार डोक्यात घोळू लागतात. तसे माझ्याही झाले.
भैरव सायको-सिरियल किलर बनून हत्या करत सुटला होता, हे चूकच. मात्र तो त्याकडे का वळला, याचा विचार सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून सिनेमा पाहताना आपण करत नाही, तो करावा असेही कमर्शियल हेतूसाठी सिनेमा बनवणाऱ्यांना नाही. मात्र समाजातील संवेदनशील घटक म्हणून तो विचार आपल्या मनात यायला हवा.
केवळ एक थ्रिलरपट तयार करुन पैसे कमावण्याच्या हेतूने ‘स्पायडर’ केला गेलाय. मात्र त्या सिनेमात खोलवर सामाजिक संदर्भ आहेत. अर्थात ते सिनेमातील खलनायकाशी जोडून मसणजोगी समाजाचं नाकारात्मक चित्रण केलंय. मात्र आपण त्यावर दिशादर्शक चर्चा करणं गरजेचं आहे. कारण ‘सर्वांगीण विकास’ हे शब्द आपण ज्यावेळी वापरतो, त्यावेळी त्यात मसणजोगी समाज सुद्धा येतो. मात्र मसणजोगी असो किंवा त्यासारखे अन्य समाज, ज्यांना वगळूनच आपला सर्वांगीण विकास सुरु असल्याचे दिसते, हे दुर्दैव आहे. या सर्वाच्या मूळापर्यंत गेलो, तर ‘स्पायडर’ सिनेमातील भैरव खलनायक का बनला, याचेही मूळ सापडेल आणि आपण माणूस म्हणून किती संकुचित प्रवास करत आहोत, याचीही खोऱ्याने उदाहरणे सापडतील.
नामदेव अंजना | www.namdevanjana.com

18 July, 2018

वारी : काही आठवणी आणि काही प्रश्न

फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी
मूळ नाव ज्ञानेश्वर, शाळेत दाखल करताना आजोबांनी ज्ञानदेव सांगितलं, लिहिणाऱ्याने नामदेव लिहिलं...असा माझ्या नावाचा प्रवास. पण ज्ञानेश्वर असो, ज्ञानदेव असो, वा नामदेव. तिन्ही नावं वारकरी संप्रदायाशी संबंधित आहेत. नाव ठेवण्यामागे अर्थात आजोबांचं वारकरी संप्रदायातील असणं कारणीभूत आहे. लहानपणापासून घरात - गावात - पंचक्रोशीत वारकरी संप्रदायाबद्दल प्रमाणिक श्रद्धा आहे.
आधी केवळ देव-धर्म म्हणून वारकरी संप्रदायाबद्दल आदर होता, मात्र पुढे तुकोबा वाचल्यानंतर विचारानेही या परंपरेशी जोडला गेलो. तमाम संतांच्या जीवनातून बंधुभावाचीच शिकवण दिली गेलीय. आपण किती अंगीकारली हा पुढचा वादाचा मुद्दा. पण संतपरंपरा ही एकता आणि बंधुभावावर आधारलेली आहे, एवढे निश्चित.
चौथीत असताना माझ्या हट्टामुळे आणि सहावीत असताना आजोबांनी स्वत:हून - अशा दोनवेळा आजोबांनी पंढरीची वारी घडवली. वारीशी संबंधित एक रंजक आठवण आहे. आजोबांचं बोट धरुन पंढरीच्या डेपोत एसटीतून उतरल्यावर घोषणा ऐकायला आली - "यात्रेचा काळ आहे. चोरांचा सुळसुळाट आहे. आपापल्या बॅगांवर लक्ष ठेवा." घोषणा ऐकून आजोबा कुजबुजले, "आम्हीही चोरीच करायला आलोय - बा पांडुरंगाच्या आशीर्वादाची चोरी करायला."
आमच्या गावाकडं वारकरी संप्रदाय चांगला रुजला आहे. मुळात शेतकरी समाज असल्याने वारकरी संप्रदायासारखं तळातल्या माणसांचं जगणं सांगणारा संप्रदाय रुजण्यास सुपिक वातावरण होतं. आणि तसेच झाले. आजही सगळ्या एकादशा नित्यनेमाने साजऱ्या केल्या जातात. दिवंगत सोनब अण्णा कदम यांनी बंधुभावाचा संदेश देणारे किर्तन गावा--गावात केले. लोकांना वारकरी संप्रदायाशी जोडले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रवीण दादा हा वारसा सक्षमपणे पुढे नेत आहे. एकंदरीत मनाने-तनाने वारकरी परंपरेशी जोडला गेलेला आमचा परिसर आहे.
पुढे मुंबईत आल्यानंतर वाचनाकडे वळलो. एका दिवशी तात्यांचं म्हणजे आदरणीय डॉ. आ. ह. साळुंखे यांचं 'विद्रोही तुकाराम' हाती आलं. वैचारिकतेनेही संतपरंपरेशी अधिक घट्टपणे जोडला गेलो. वारकरी संप्रदायाशी जोडला गेलो असलो तरी, काही गोष्टी कायम प्रश्नांकित करत आल्यात. त्यावर आता बोलावं वाटतंय. किंवा वरील सारा लेखनप्रपंच त्या प्रश्नांसाठीच केलाय.
चंद्रभागेच्या वाळवंटी नाना जाती-धर्माची माणसं एकरुप होतात. जाती-धर्माची लेबलं पंढरीच्या बाहेर सोडतात आणि पंढरीच्या विठ्ठलाच्या नामात दंग होतात. कुणीही स्पृश्य-अस्पृश्य राहत नाही. वारीतला प्रत्येकजण केवळ 'वारकरी' असतो. मात्र हेच वारकरी जेव्हा पंढरीची वारी करुन आपापल्या गावात पोहोचतात, तेव्हा पुन्हा आपल्या जाती-धर्मात का शिरतात? (अर्थात अपवाद आहेत. नाही असे नाही.) संतपरंपरेनी विश्वबंधुभावाचा संदेश दिला, तो पंढरीत आपण अंमलात आणतो, मग परतल्यावर का विसरतो? आजूबाजूला जाती-धर्मात विघातक तेढ निर्माण होत असताना, आपल्याला याचे उत्तर नक्कीच शोधायला हवे.
फ्रेंच राज्यक्रांतीने स्वतंत्र्य, एकता बंधुता ही मूल्य दिली असे म्हणतात. मात्र आपल्या वारकरी संप्रदायाने फ्रेंच राज्यक्रांतीच्या साडेसातशे वर्षांपूर्वीच एकता आणि बंधुभावाची शिकवण दिली. ते आपण किती लवकर विसरलो.
ज्या संतपरंपरेने आपल्या वारकरी संप्रदायाच्या चळवळीचं नेतृत्त्व संत सोयराबाई, संत जनाबाई यांसारख्यांच्या खांद्यावर सोपवलं. त्याच परंपरेतील आपण स्त्रियांना का दुय्यम वागणूक देत असून, स्त्रियांकडे कमकुवत म्हणून का पाहतो?
असे अनेक प्रश्न आज मनात घिरट्या घालतात. वारकरी संप्रदायाबद्दल आस्था असल्याने या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपण घेतला पाहिजे आणि आपली परंपरा अधिक सक्षम बनवली पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय हा या भूमीतल्या आधुनिकतेचा अविष्कार आहे. आपण परंपरा जपली पाहिजे. कारण अशी परंपरा जगातल्या खूप कमी समूहांच्या वाट्याला आली आहे. आपण त्यात नशीबवान आहोत.

नामदेव अंजना

02 June, 2018

जगण्याचा प्रश्न



जात, धर्म इत्यादी भावनिक मुद्देच बहुतांशवेळा आपल्याकडील निवडणुकांच्या केंद्रस्थानी पाहायला मिळतात. विकास हा मुद्दा तोंडी लावण्यापुरता राहतो. जगण्याची तारांबळ असताना, आपल्याला जाती-धर्मात विभागले जाते आणि आपण विभागलो जातो - असे का होते? हे एक न सुटणारे कोडे आहे. किंबहुना मानसिक संशोधनाचा हा विषय आहे. असो.

आज 'आरोग्य' या विषयावर बोलू. किती किचकट शब्द वापरला ना - 'आरोग्य'. जात किंवा धर्मावर बोलू म्हटले असते, तर मांड्या सरसावून आणि बाह्य थोपटून पुढे आला असतात, तेही डोळ्याचे कान आणि कानाचे डोळे करुन. आपली गरज काय नि आपण करतो काय, हे न समजल्यामुळेच आपली ही हालअपेष्टा झालीय आणि यापुढे होणार आहे.

ज्यांना शक्य आहे, त्यांनी माझ्या या लेखाच्या शेवटच्या शब्दापर्यंत सोबत राहा. काहीतरी महत्त्वाचे माझे सांगणे आहे.

दहा-एक दिवसांपूर्वी 'लॅन्सेट' या जगप्रसिद्ध मासिकात अरोग्यासंदर्भात एक यादी प्रसिद्ध झाली. खरंतर अशा कित्येक मासिकांमध्ये कित्येक विषयांवरील याद्या प्रसिद्ध होत असतात. पण लॅन्सेट या मासिकाचे आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. 1923 पासून हे मासिक केवळ आरोग्य क्षेत्रासंबंधी माहिती प्रसिद्ध करतं. भारतीय परिप्रेक्षात सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ही यादी सुद्धा महत्त्वाची आहे. या यादीत काय आहे आणि त्यात इतके महत्त्वाचे काय आहे, त्यासंबंधी पुढील चर्चा आहे.

'लॅन्सेट' मासिक आरोग्यासंदर्भात माहिती, आकडेवारी, बातम्या, सर्वेक्षणं इत्यादी गोष्टी करत असतं. आरोग्य क्षेत्राला वाहून घेतलेले हे मासिक आहे. यात वैद्यकीय सेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता यासंबंधी एक 195 देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आलीय. सर्वात उत्तम वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता असणारा देश पहिल्या स्थानावर, तर सर्वात वाईट गुणवत्ता आणि उपलब्धता असणारा देश 195 व्या स्थानावर अशा उतरत्या क्रमाने ही यादी आहे. हे थोडे सविस्तर यासाठी सांगितले, कारण यातील भारत देशाचे स्थान धक्कादायक ठिकाणी आहे.

'लॅन्सेट'ने प्रसिद्ध केलेल्या यादीत भारताचे स्थान 145 वे आहे. म्हणजे वैद्यकीय सेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता इतकी ढासळली आणि खालावली आहे. थोडे तुलनातमकदृष्ट्या आपण याकडे पाहू. याच यादीतील आपल्या आजूबाजूच्या देशांचे स्थान पाहू. म्हणजे आपल्याला लक्षात येईल. या यादीत चीन (48), श्रीलंका (71), बांगलादेश (133), भुतान (134), नेपाळ (149), पाकिस्तान (154) आहेत. आपण महासत्ता वगैरे होण्याचे स्वप्न पाहत असताना आरोग्य क्षेत्राची ही हेळसांड गंभीर आणि भयंकर आहे.

भारतात गोवा आणि केरळ असे दोन राज्य सोडले, तर इतर राज्यांमध्ये आरोग्य क्षेत्राची पार धुळधाण झालीय. त्यात उत्तर प्रदेश तर सर्वात खालच्या स्थानी आहे. एक विशेष नोंद यामध्ये सापडते, ती म्हणजे 1980 नंतर भारतातील आरोग्य क्षेत्राला उतरती कळा लागली. याचवेळी आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, याच काळात आरोग्य क्षेत्रात खासगीकरणाने पाय ठेवायला सुरुवात केली आणि पुढे अजस्त्र विळख्यात ही जीवनावश्यक सेवा अडकली गेली. त्यात सरकारचेही वारंवर दुर्लक्ष होत आहे. आरोग्यावरील खर्च केवळ 1.2 टक्के आहे.

शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रातील खासगीकरण देशहिताचा नसतो. कारण हे दोन्ही क्षेत्र त्या त्या देशाचं भविष्य ठरवत असतात. मात्र भारतात नेमके हेच दोन क्षेत्र भयंकररित्या खासगी क्षेत्राच्या कचाट्यात अडकले आहेत. आजही ग्रामीण भागात 50-100 किमी अंतर पार केल्याशिवाय सर्व सोई-सुविधायुक्त असे रुग्णालय नसतो. तिथेही खर्च परवडणारा नसतो.

आरोग्य चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अरुण गद्रे यांनी आजच्या (2 जून 2018) 'सकाळ' वृत्तपत्रातील लेखात एक छान कल्पना सूचवली आहे. अर्थात ती खूप आधीपासूनची आहे. पण त्यांनी अधोरेखित केली आहे. खरंच त्यावर विचार करण्याची नितांत गरज आजच्या घडीला आहे. कॅनरडा, यरोप, ब्राझील यांसारख्या देशांमध्ये 'यूनिव्हर्सल हेल्थ केअर' पॉलिसी आहे. म्हणजे काय, तर वैद्यकीय सेवेसाठी कुणाला पैसे द्यावे लागत नाही, तर सर्व खर्च सरकारतर्फे करातून केला जातो. ही इतकी मोठी पॉलिसी जरी आपल्याकडे आणता आली नाही, तरी किमान सुरुवात म्हणून सरकारी रुग्णालयात तरी औषधं मोफत देणारं 'तामिळनाडू मॉडेल' आपण देशभर राबवायला हवे.

आरोग्य हा जगण्याचा प्रश्न आहे. मात्र आपल्या चर्चांचे विश्व भावनिक मुद्द्यांनी इतके व्यापलं आहे की, आपण जगण्याच्या प्रश्नांवर बोलणंच टाकलं आहे. आपण ते बोलायला हवे. तरच जगण्याचा प्रश्न सुटेल.

नामदेव अंजना - namdev.anjana@gmail.com

07 May, 2018

मोदी आणि त्यांचे कुत्रे



राहुल गांधी यांनी कुत्र्यांकडून देशभक्तीचे धडे शिकायला हवेत, असे कर्नाटकातील बगलकोटमध्ये मोदी बोलतात आणि भाजपचे बगलबच्चे टाळ्या वाजवतात. वाह... काय ती देशाच्या पंतप्रधानाची भाषा आणि काय तो देशाच्या जनतेचा प्रतिसाद!

एकीकडे संस्कृतीचा ठेका घेतल्यासारखे टेंभा मिरवायचा आणि दुसरीकडे वैफल्यग्रस्तासारखे विकृत वागायचे, अशा दोन दगडावरील मोदींची सर्कस ज्या चमत्कारिकरित्या वर्तमानात सुरु आहे, ते पाहता 2024 काय 2050 पर्यंत त्यांची सत्ता अबाधित राहील, यात शंका नाही. पण प्रश्न सत्तेचा नाही, प्रश्न आहे नैतिकतेचा, खऱ्या संस्कृतीचा आणि खरेपणाचा. दुर्दैवाने, नेमकी याच गोष्टींची मोदींच्या संस्कृतीत कमतरता दिसून येते.

विकास वगैरे गोष्टी होत राहतात. कुठल्याही देशाची ओळख फक्त त्या देशाच्या जमिनीवरील चकाकी पाहून ठरत नसते, तर तिथलं समाजकारण, राजकारण, संस्कृती इत्यादी गोष्टींचा मिलाफ म्हणजे त्या देशाची ओळख असते. याच गोष्टींचा भुस्काट करुन विकासाच्या गोष्टी करणार असाल, तर त्या केवळ बाताच ठरतात.

अर्थात, मोदी आणि कंपनीची देशभक्तीची व्याख्याच वेगळी आहे म्हणा. त्यामुळे प्रश्न खरेतर तिथेच निकालात निघतो. मोदींचा कुत्र्यांकडून देशभक्ती शिकण्याचा सल्ला कधी कधी योग्यच वाटतो. मागे एका भाषणात मोदी म्हणाले होते, "सैनिकांपेक्षा जास्त धाडस व्यापाऱ्यांमध्ये आहे". आता असे म्हणणाऱ्या नेत्याला देशभक्ती ही किती उथळ गोष्ट वाटत असावी, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे अर्थात व्यापाऱ्यांसमोर सैनिकाला कमी लेखणारी देशभक्ती राहुल गांधी यांनी शिकली नसेल, हा मोदींचा अंदाज तसा खरा आहे.

आणि मुळात मोदींनी देशभक्ती कुणाला शिकवायची? तर ज्याच्या खापर पणजोबांनी आपले आयुष्य देशासाठी वाहिले, ज्याच्या पणजोबांनी देशासाठी आपले अवघे आयुष्य देऊन देशाची बांधणी केली, ज्याच्या आजीने देशासाठी जीवाची पर्वा केली नाही, ज्याच्या वडिलांनी देशासाठी बलिदान दिले... ज्यांचं कुटुंब हा भारत देश घडण्यासाठी आपापल्या काळात खारीचा वाटा उचलतो, त्याला मोदी देशभक्ती शिकवणार? वाह रे पट्ट्या! मानलं बुवा तुला.

देशाचे पंतप्रधानपद हे मानाचं आहे. त्यामुळे ते बिरुद मिरवणाऱ्या माणसाची भाषा पदाला साजेशी असायला हवी आणि पदाला शोभणारी सर्वसमावेशकताही त्याकडे असायला हवी. सध्या प्रत्यक्षात उलटे दिसते आहे. इतिहासात डोकावताना हा वर्तमान किती नकारात्मक आहे, याची तीव्र जाणीव होते.

श्यामा प्रसाद मुखर्जी यांना पहिल्या मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय असो किंवा अटल बिहारी वाजपेयींना काँग्रेसने संयुक्त राष्ट्र संघात देशाची बाजू मांडण्यासाठी निवड करणे असो... यात तत्कालीन पंतप्रधानांची सर्वसमावेशकता दिसते. मुखर्जी हे अपक्ष आहेत म्हणून त्यांना डावलणं तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना सहज शक्य होते आणि अटल बिहारी वाजपेयी हे विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना संयुक्त राष्ट्रात संघात पाठवल्या जाणाऱ्या डेलिगेशनमधून वगळणे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनाही सहज शक्य होते. पण दोघांनीही त्या त्या वेळी तसे केले नाही. कारण सर्वसमावेशकता आणि विरोधी विचारांचा मान राखण्याची संस्कृती त्यांच्यात शाबूत होती. या दोघांनीही किंवा त्यांच्या आगे-पिछे आलेल्या कुठल्याच पंतप्रधानांनी कधीच विरोधी पक्षाला कुत्रे-बित्रे म्हटले नव्हते.... असा सारा इतिहास माझ्या देशाचा असताना, जेव्हा माझ्या देशाचा पंतप्रधान विरोधी पक्षाच्या नेत्याला कुत्र्याकडून देशभक्ती शिकण्याची भाषा करतो, त्यावेळी देशाच्या संस्कृतीची पिछेहाट माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला ठळकपणे जाणवते आणि अस्वस्थ करते.

असो. सत्ता काही सर्वकाळ टिकणारी नसते. आज-ना-उद्या जाईल. पण असंय ना की, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो आहे. 

24 April, 2018

वाचनप्रवास


काही महिन्यांपूर्वीचा फोटो आहे हा. आता आणखी एक थर वर बांधला आहे. मी फार निवडक पुस्तकं खरेदी केली आहेत. कथा, लोककथा, प्रवासवर्णन, कादंबरी, कवितासंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, आत्मचरित्र इ. पुस्तकांनी भरलेला असा हा माझा किताबखाना आहे.

कुणाला नाटक पाहायला आवडतं, कुणाला सिनेमा, कुणाला मुशाफिरी, तर कुणाला आणखी काही. पोटा-पाण्याच्या धबाडग्यातून बाहेर पडून, आवडत्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तसाच माझाही. मला पुस्तकं वाचायला आवडतात. खूप खूप आवडतात. इतकं इतकं वाचायला आवडतं, की मॅक्झिम गॉर्कीची भलीमोठी ‘आई’ कादंबरी एका बैठकीत संपवलीय.

दहावीपर्यंत पाठ्यपुस्तकांपलिकडे ‘श्यामची आई’ वगळता फार काही वाचले नव्हते. तसेही गावी कथा-कादंबऱ्यांसारखी पुस्तके नसायची. आमच्या शाळेलाही लायब्ररी वगैरे नव्हती. आताही एका कपाटाची आहे. त्यामुळे अभ्यासापलिकडे वाचन व्हायचं नाही.

अकरावीपासून पुढील शिक्षणासाठी मुंबईत आलो आणि अर्थात पावलं कॉलेजच्या लायब्ररीकडे वळली. म. ल. डहाणूकर कॉलेजला असतानाही फार अवांतर वाचन झालं नाही. एकतर पार्ट टाईम जॉब, त्यात इंग्रजीतून सर्व विषय आणि नाट्य मंडळात जाणारा वेळ. या साऱ्या गोष्टींमुळे तिथेही वाचनाकडे फार वळलो नाही.

पुढे पत्रकारितेसाठी साठ्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इथे खऱ्या अर्थाने वाचनाला सुरुवात झाली. गोडी लागली. वर्षानुवर्षांचा अनुशेष भरुन काढावा अशा पद्धतीने वाचायला सुरुवात केली.

साठ्ये कॉलेजची लायब्ररीत हजारोंच्या पटीत पुस्तके आहेत. थेट लायब्ररीत जाऊन, हवे ते पुस्तक निवडून, घरी घेऊन जाऊन वाचण्याची मुभा होती. लायब्ररीचे सर्व काका तसे होते म्हणा. शिवाय इथे लाभलेले सर्व शिक्षकही वाचनाच्या आवडीला पुरक ठरले.

वादविवाद, वक्तृत्त्व, कथाकथन इ. स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागलो आणि त्यामुळे वाचनाला आणखी प्रोत्साहन मिळालं.

डॉ. कुंदा प्रमिळा निळकंठ, प्रा. गिरीजा गुप्ते, प्रा. गजेंद्र देवडा, प्रा. समीर जाधव यांच्यासारख्या शिक्षकांमुळे वाचनात आणखी भर घालत गेलो.

कुंदा मॅडमच्या घरात तर स्वत:ची लायब्ररी आहे. तिथे जाऊन वाचता यायचं. शिवाय कुंदा मॅडमनी सूचवलेले प्रत्येक पुस्तक बौद्धिक खुराक असायचा. आजही असतो. गिरीजा गुप्ते मॅडमने सूचवलेली अनेक पुस्तके वाचली. देवडा सरांनाही वाचनाची प्रचंड आवड आहे. वादविवाद स्पर्धांच्या निमित्ताने विविध विषयांवर समीर सरांनी पुस्तके सूचवलेली. प्रा. केतन भोसले सरांशीही विविध विषयांवर कॉलेजच्या पॅसेजमध्येच उभे राहून चर्चा करायचो. वर्ल्ड इज फ्लॅटसारखं पुस्तक केतन सरांनी सूचवलं होतं. एकंदरीत शिक्षक मंडळीच वाचनाला प्रोत्साहन देणारी ठरली.

वाचनाची ही भूक प्रचंड वाढत गेली. साठ्ये कॉलेजची लायब्ररी, पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ, गोरेगावमधील केशव गोऱ्हे स्मारक ट्रस्टची लायब्ररी अशा तीन लायब्ररींनी वाचनाची भूक खूप भागवली. त्यांनतर पुस्तके विकत घेण्यासाठी पार्ल्यातील मॅजेस्टिक डेपो, दादरमधील साहित्य अकादमी, भूपेश गुप्ता भवन हे गाठायचो. केशव गोऱ्हे स्मारक आणि दादरचे संदर्भ ग्रंथालय इथे दिवस दिवस बसून वाचल्याचे प्रसंग आहेत.

नंतर एबीपी माझामध्ये कामाला लागलो आणि पार्ला किंवा दादरकडे जाणे कमी झाले. त्यात पार्ल्यातून मी दाहिसरला राहायला गेलो. ट्रेन कनेक्टिव्हिटीमुळे मुंबईत तसे काही जवळ-दूर हा प्रकार नसला तरी ट्रेनमधील गर्दीचा विचार करता दूरच गेलो म्हणायला हवे. पर्यायाने दादरला जाऊन पुस्तके खरेदी करणे कमी झाले. पण याची कमतरता बोरिवलीमधील येशू पाटील सरांच्या ‘शब्द’ गॅलरीने भरुन काढली.

पुस्तकांसोबतच वाचनाची इतर माध्यमंही हाताळत असतो. चित्रलेखा, लोकप्रभा, साधना, इंडिया टुडे (हिंदी), डाऊन टू अर्थ यांसारखी मासिकं, सप्तरंग (सकाळ), लोकरंग (लोकसत्ता), संवाद (मटा), मंथन (लोकमत), लिटररी रिव्ह्यू (द हिंदू) यांसारखे वृत्तपत्रीय लेखन, राईट अँगल, एक रेघ, बिगुल, अक्षरनामा यांसारखी ऑनलाईन पोर्टल, कविता-शेरो-शायरी वाचनासाठी रेख्ता, आठवणीतली गाणी, कविताकोश या वेबसाईट्स, दिवाळी अंक, विशेषांक इत्यादी गोष्टी वाचनाची भूक भागवण्यास मोठी मदत करतात. याआधी युवराज मोहिते सरांचं ‘कलमनामा’ आणि शिरीष पारकरांचं ‘महाराष्ट्र माझा’ सुद्धा वाचायचो. आता बंद झालंय. पण बहुतांश अंक आजही संग्रहित आहेत.

आणखी एक गोष्ट म्हणजे काही खास पुस्तकेही माझ्या संग्रही आहेत. खास म्हणजे, प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. कुंदा मॅडम, सतीश काळसेकर, कोंकणी लेखक दामोदर मावजो इत्यादींनी स्वत:च्या स्वाक्षरीनिशी भेट दिलेली पुस्तके माझ्या किताबखान्यात आहेत. एकंदरीत पुस्तकांबाबत फारच सुखी माणूस आहे मी.

पुस्तकंच वाचतो म्हणून अनेकजण टोमणे मारतात, काहीजण विविध विषयांचे रेफरन्स मागतात, काहीजण पुस्तकं सूचव म्हणतात, काहीजण पुस्तकेच वाचण्यासाठी मागतात वगैरे वगैरे. मात्र या साऱ्या गोष्टी सांभाळत मी माझे वाचन नियमित सुरुच ठेवतो. कारण केवळ बौद्धिक भूक भागवणे हे या वाचनामागचा माझा हेतू नाही, तर वाचन माझी आवड आहे. मला त्यातून आनंद मिळतो. नवनव्या गोष्टी कळतात. विविध गोष्टींचे कुतुहल वाढवतात. आपल्याला अनेक गोष्टी माहित असाव्यात, या कुतुहलापोटी वाचनाचा प्रवास सुरु झाला होता, तो आता सवयीपर्यंत येऊन ठेपला आहे.

पुस्तक दिनाचं निमित्त साधत हे लिहिलं आहे. चार-पाच ओळीत काहीतरी लिहीन म्हटलं आणि हे असं लांबलचक झालं. तरी वाचनाच्या या प्रवासातील अनेक रंजक किस्सेही आहेत. ते लिहियाला घेतले तर आणखी लांबलचक होईल. म्हणून इथेच थांबतो. पण पुस्तकांचाच विषय आहे म्हणून नागराज मंजुळेंच्या पुस्तकावरील एका कवितेने समारोप करतो. मला ही कविता फार आवडते.
मी एकाकी आहे
आणि या निर्घृण जगात
एकट्या-दुकट्या माणसानं
स्वरक्षणार्थ काही बाळगावं
म्हणून पुस्तक बाळगतो
मी कुठेही असो
पुस्तक सोबत असतंच
मी ते वाचत नसलो
तरी पडून असतो
छातीवर घेऊन प्रेयसीसारखं
वेळीअवेळी
मला एकटा पाहून
धावून येणाऱ्या ओसाडावर
मी पुस्तकच परजतो... तलवारीसारखं.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...