18 January, 2019

थोर युवा नेत्या पूनमताई महाजन


ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर पटदिशी त्यांचं नाव आठवण्याऐवजी, 'प्रमोद महाजनांची मुलगी', असं सर्वात आधी मनात येतं, त्या थोर युवा नेत्या पूनमताई महाजन यांच्याबद्दल फार आधीपासूनच माझ्या मनात सहानुभूती आहे. ही सहानुभूती अर्थात त्यांच्या अगाध ज्ञानाबद्दल आणि वैचारिक प्रगल्भतेबद्दल आहे. कारण त्यांचे ज्ञान आणि वैचारिक प्रगल्भता महान भाजपीय परंपरेला साजेशी अशीच आहे.
 
प्रभू रामचंद्र हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय आहेत, या त्यांच्या नव्या संशोधनात्मक-विधानाची सोशल मीडियावर टिंगल होताना दिसली. खरेतर तशी टिंगल व्हायला नको. याचे कारण थोर युवा नेत्या पूनमताई महाजन यांच्या ज्ञानाची कवाडे कुट्ट अंधाराच्या दिशेने उघडतात, त्यामुळे त्यात त्यांचा काही दोष नाही. मात्र, त्यांच्या या अगाध ज्ञानाबद्दल चिंतित होण्याचे कारण म्हणजे, त्यांनी आपले हे ज्ञान सार्वजनिक न करता, लपवून ठेवून, त्यातील एक्सक्लूझिव्हनेस जपला पाहिजे. कारण त्यात अखंड हिंदू राष्ट्राचे हित आणि जगविख्यात पक्षोपयोगी स्वार्थ सामावलेले आहे.
 
या ताईंचे गेल्या वर्षीचे एक विधान असेच अति-प्रचंड ज्ञानाच्या अवकाशातून आले होते. मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चातील शेतकऱ्यांना त्यांनी माओवादी म्हटले होते. अर्थात, इथेही ताईंचा काहीच दोष नव्हता. कारण आधी म्हटले ना, की या ताईंच्या ज्ञानाची कवाडे कुट्ट अंधाराच्या दिशेने उघडतात. सो, देअर इज अ प्रॉब्लेम.
 
मकरंद अनासपुरे यांच्या कुठल्याशा कार्यक्रमात पंकजा ताई आणि या महशय ताई आल्या होत्या. त्यावेळीही राहुल गांधी यांच्यावर उथळ टीका यांनी केली होती. मला तेव्हाही आश्चर्य वाटले नव्हते. उलट हसू आले की, ज्यांना एखादी लाट आल्याशिवाय निवडून येण्याची खात्री देता येत नाही, त्यांनी एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यावर, ज्याने स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले आहे, त्याच्यावर उथळ टीका करावी?!
 
घराणेशाहीचे समर्थन करताना एक मुद्दा मांडला जातो, तो म्हणजे, आपलं नेतृत्व सिद्ध करत असाल, तर घराणेशाहीची टीका थोडी बोथट होते. राहुल गांधी यांनी ते केले. या पूनमताईंनी काय केले? प्रमोद महाजन यांच्या सारख्या पहाडी नेतृत्वाला साजेसा एकतरी गुण यांच्यात आहे का? उथळ आणि असबंध बडबडत राहण्यापलिकडे काय आहे यांच्यात? जरी असे असंबंध बडबडणे पक्षीय संस्कृती असेल तरी.
   
माहीत नाही, पण या ताईंच्या बोलण्यात मला कायम अहंकार दिसतो. आमचं कुणी काही बिघडवू शकत नाही, असा टोन बोलण्यात जाणवतो. असो. खरंतर एवढ्या प्रतिभावान, प्रगल्भ आणि ज्ञानसंपन्न थोर युवा नेत्यावर बोलण्याएवढे आपले कर्तृत्व नाही, तरी थोडे धाडस केलेच.

12 January, 2019

कोट्याबहाद्दर राऊत


'ठाकरे' सिनेमाचा म्युझिक लॉन्चिंग सोहळा सुरु होता. संजय राऊत तिथे होते. ते निर्माते असले, तरी निर्माते म्हणून ते 'टेम्पररी' आहेत. राजकीय नेते हा त्यांचा 'पूर्णवेळ व्यवसाय' आहे. त्यामुळे सहाजिक तेथे उपस्थित पत्रकाराने संजय राऊतांना गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरु असलेल्या 'बेस्ट'च्या संपावर प्रश्न विचारला.

शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेने बेस्टची पुरती वाट लावलीय. वर्षानुवर्षे यांचे नेते बेस्टच्या समितीचे अध्यक्ष असून बेस्टला डबघाईत नेली. त्याच सेनेच्या खासदाराने म्हणजेच संजय राऊतांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर काय द्याव? तर हे संजय राऊत म्हणतात, "ठाकरे सिनेमा 'बेस्ट' आहे. सिनेमातील म्युझिकही 'बेस्ट' आहे."

'सामना'च्या अग्रलेखातून फुकट्या कोट्या करण्याची सवय जडलेल्या या माणसाला कुठला विषय गंभीर आणि कुठला विषय हलका-फुलका हेही समजेनासे झालेलं दिसतंय. हे केवळ यांच्या खासदारापुरता विषय मर्यादित नाही. यांच्या नेतृत्त्वाचीही हीच गत.

दोन-दोन आकडी आमदार आणि खासदार मिरवणाऱ्या पक्षाचा नेता अर्थात उद्धव ठाकरे हे सलग 7 तास महापौर बंगल्यावर बसूनही बेस्ट संपावर तोडगा काढू शकत नाहीत. हे काय राज्य चालवणार? यांना महापालिकेचा बेस्ट नावाचा एक उपक्रम नीट चालवता येईना.

25 वर्षे मुंबई महापालिकेवर आणि पर्यायाने बेस्टवर सत्ता असूनही मुंबईची याच लोकांनी वाट लावलीय, हे जळजळीत सत्य आहे. उगाच इथे असलेल्या सेना समर्थकांनी सेनेचे फुकाचे समर्थन करु नका. जे चूक ते चूक म्हणायला शिका. असल्या उथळसम्राटांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी.

आता त्या शशांक राव यांना धारेवर धरायला लागलेत हे. मुंबईकरांचे हाल करातायत म्हणे. अरे शशांक राव गेले चुलीत. तुम्ही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काय म्हणताय बोला. शशांक राव नावाला पुढे आहेत आणि ते पुढे असण्याला त्यांच्या मागे हजारो कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित मागण्यांवर काय म्हणणं आहे, ते सांगावं सेनेच्या लोकांनी. बाकी फुकाच्या बाता नि फुकाच्या कोट्या बंद कराव्यात. बोगस लेकाचे.

पाहा संजय राऊत यांच्या उथळ कोट्यांचा व्हिडीओ :


07 January, 2019

कलाकारांनो, तुम्हाला का सपोर्ट करायचं?



मराठी सिनेसृष्टीतील अनेकांचा प्रॉब्लेम असा आहे की, त्यांना त्यांच्या सिनेमाला थिएटर मिळाला नाही की आवाज उठवतात. म्हणजे, यांची अडचण झाली की बोंब ठोकणार आणि आमच्यावर अन्याय झालाय, आमची कोंडी केली जातेय, असे ओरडत मदतीची याचना करणार.

अन्याय झाला असेल किंवा मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसेल, तर ते चूकच आहे. आणि त्यांना थिएटर मिळायला हवा, यात दुमत नाही.

प्रश्न असा आहे की, तुम्ही जसे सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांनी तुमच्यासाठी आवाज उठवण्याची अपेक्षा करता, त्याचवेळी हेही ध्यानात ठेवायला हवे की, जो प्रेक्षक असतो म्हणजे इतरवेळी सर्वसामान्य माणूस असतो, त्या सर्वसामान्य माणसांच्या अडी-अडचणींच्या काळात तुम्ही त्याच्यासाठी येता का धावून? जाहीरपणे भूमिका घेता का?

काही सन्मानिय अपवाद वगळता कलाकार मंडळी बोटचेपी भूमिका घेण्यात किंवा सोईची भूमिका घेण्यात पटाईत असतात. कलाकारांचा दबाव हा नक्कीच प्रभावी असतो. व्यवस्थेत बुलंद आवाज कलाकारांचा मानला जातो. असे असताना आतापर्यंत कितीतरी मुद्द्यांवर, जेव्हा गरज असते, तेव्हा हे कलाकार बोलले? आपण बोललो तर आपल्याला ट्रोल केले जाईल किंवा आपल्याला विशिष्ट विचारधारेचे ठरवले जाईल, असल्या शंकेत वावरुन भित्रे का बनतात?

एक गोष्ट स्पष्ट असायला हवी, थिएटर मिळत नाहीत म्हणून इतरांनी तुमच्यासाठी आवाज उठवावा, अशी अपेक्षा असेल, तर इतरांसाठी सुद्धा तुम्ही विविध मुद्द्यांवर आवाज उठवायला हवा. एकमार्गी अपेक्षा कशी चालेल?

समाजातील इतर प्रांतातील सोडून द्या, किती कलाकारांनी नसीर यांच्या मुद्द्यावर एकत्रित येऊन, विवेकी आणि समतोल साधणारी भूमिका मांडली? एरवी हागल्या - मुतल्याचे ट्विट करणारे कितीजण नसीरच्या बाजूने किंवा विरोधात बोलले?

आता म्हणाल, बोललेच पाहिजे का? हा अट्टाहास का? तर होय, बोलले पाहिजे. कलाकार म्हणून येणारी जबाबदारी सुद्धा तुम्ही सांभाळली पाहिजे. केवळ तुमचे सिनेमे किंवा इतर कला जनतेने पाहावी, एवढी अपेक्षा ठेवू नये. प्रसंगी जनतेला भेडसावणाऱ्या गोष्टींवर जाहीर बोलले पाहिजे आणि कृती केली पाहिजे. आणि हा अट्टाहास नाही, कर्तव्य आहे. कारण ज्यावेळी तुम्हाला हक्क मिळतात, त्यावेळी त्यासोबत येणारी जबाबदारी तुम्हाला झटकता येणार नाही.

'भाई' सिनेमाच्या निमित्ताने महेश मांजरेकर हे एक उदाहरण आहे. या निमित्ताने सर्वच कलाकार, सिनेमे आणि संबंधितांना हे लागू होते. कारण जर हे गांभीर्याने घेतले, तर यापुढे थिएटर मिळत नाही म्हणून राजकीय नेत्यांची उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, तर जनताच तुमच्यासाठी रस्त्यावर येईल. कारण तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहिलेले असाल.

मी पुन्हा नमूद करतो, यात सन्मानिय अपवाद वगळतो आहे. कारण अनेक कलाकार सोशल मीडिया किंवा रस्त्यावर उतरुन भूमिका घेतात, अनेक कलाकार सढळ हाताने मदत करतात. त्यांचा आदर आणि सन्मान माझ्या मनात आहे. म्हणून ते अपवाद.

04 January, 2019

कोण पुलं?




आज एकजण तावातावाने सांगत होता, 'पु. ल. देशपांडे म्हणजे तमाम मराठी माणसांच्या गळ्यातले ताईत', 'असा एकही मराठी माणूस सापडणार नाही, ज्याला पुलं माहीत नाहीत'. पुढे आणखी काय काय म्हणत होता. महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न वगैरे. मी थोडे थोडे ऐकून घेतले आणि न राहून बोलूच लागलो.


पु. ल. देशपांडे हे उत्कृष्ट साहित्यिक होते, यात कुठलाच वाद नाही. माझ्यासारख्या वाचकाने तर हे नाकारणे म्हणजे मूर्खपणा ठरेल किंवा पुलंचे लेखन वाचले नाही असा त्याचा अर्थ होईल. मात्र, पुलं माहीत नसलेला एकही मराठी माणूस शोधून सापडणार नाही, हे विधान जरा अतीच होतं राव. आणि आता 'भाई : व्यक्ती की वल्ली'निमित्त अनेकजण हे विधान करत सुटलेत.


पुलंच काय, तुमची कितीतरी लेखक मंडळी आमच्या गावापर्यंत कधी पोहोचलीच नाहीत. हा त्या लेखकांचा दोष की तिथवर शिक्षण पोहोचवणाऱ्या सरकारचा दोष हे खरंच माहीत नाही. पण हे सत्य आहे. मुंबई, पुणे, नागपूर किंवा तत्सम शहरं आणि काही निमशहरी भाग वगळला तर या लेखकांचे लेखन गाव-खेड्यांपर्यंत पोहोचले नाही, हे वास्तव आहे.


दूर कशाला, माझ्या शाळेत अभ्यासबाह्य केवळ एकच पुस्तक होते. तेही मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये खिडकीवर पडलेले असायचे. शिपायांना बोलवण्यासाठी बेल ठेवण्यासाठी त्या पुस्तकाचा नंतर नंतर वापर होऊ लागला, हेही आठवते आहे. ते पुस्तक म्हणजे - श्यामची आई. त्यातल्या सुरुवातीच्या चार - पाच रात्री वाचल्या होत्या.


दहावी होईपर्यंत अभ्यास सोडून कुठलेच पुस्तक आमच्या नशिबी नव्हते. हा माझा व्यक्तिगत अनुभव म्हणून माझ्यापुरता मर्यादित आहे, असे नाही. खरेतर माझा हा अनुभव प्रातिनिधिक आहे, असे मी म्हणेन. कारण अशीच स्थिती कमी - अधिक प्रमाणात ग्रामीण भागात आहे.


आम्हाला तर जगातील सर्व विनोद आपला लक्ष्या, अशोक सराफ, गोविंदा, जॉनी लिव्हर हेच लिहितात की काय, असेच वाटत होते. पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार वगैरे आमच्या गावीही नव्हती. शहराशी संपर्क आला, ग्रंथालयांच्या पायऱ्या चढू लागलो, तेव्हा कुठे पुलं वगैरे काही गोष्ट जगात आहेत, हे कळू लागलं. अर्थात, यात पुलंचा कमीपणा नाही, पण आमच्यापर्यंत त्यांचे लेखन या कधी पोहोचलेच नाही. आजही शंभरतील फार फार तर तीस लोकांना पुलं माहीत असतील. जर सरासरी काढायची तर. अशी स्थितीत असताना आपण किती धाडसी विधाने करतो की, पुलं माहीत नसलेला एकही मराठी माणूस सापडणार नाही वगैरे.


आणि हो, या लिहिण्यातून पुलंना कमी लेखण्याचा प्रयत्न नाही. तर आपल्या शिक्षण व्यवस्थेने म्हणा किंवा वाचक - लेखक किंवा एकंदरीत साहित्यविश्वाने आमच्यापर्यंत हे लेखन कधीच पोहचवले नव्हते. आजही अशीच स्थिती आहे. हे वास्तव आपण स्वीकारून साहित्य गावापर्यंत पोहचवले पाहिजे. तरच या लेखकांवर सिनेमे निघाले तर प्रेक्षक येतील.


बाकी मुंबई - पुणे किंवा तत्सम शहरांमध्ये ज्या गोष्टी घडतात, त्या प्रमाण मानून अवघ्या राज्याला किंवा कधी कधी जगाला पण लागू होतात, असले अवाजवी धाडस काहीजण करतात ना, त्यांची फारच कमाल वाटते. या शहरी डबक्यातून बाहेर पडून पाहण्याची गरज आहे. हे बाहेरचे जग खूप गोष्टींपासून अद्याप अनभिज्ञ आहे. अर्थात, ते अनभिज्ञ राहू नये, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.


खूप विस्कळीत लिहिले आहे. पण इन शॉर्ट, अनेक साहित्यिक नि त्यांचे साहित्य शहरांच्या वेशी ओलांडून शेताच्या बांधावर कधी पोहोचलेच नाही. ते पोहोचायला हवे.

आपला तो बाब्या...



आपला पक्ष काय विचारधारेचा आहे, पक्षाचा नेता काय विचारधारेचा आहे, याची किमान माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे बाळगायला काय हरकत आहे मी म्हणतो? म्हणजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार असलेल्या व्यंगचित्रात अधिक सातत्य राखून असलेल्या राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी टीका सहन न झाल्याने काल परवा कुणा व्यक्तीला उठाबशा काढायला लावल्या. यावरुन हे तोंड वाजवायला लागतं आहे. अन्यथा, मनसेच्या ऑनलाईन दादागिरीला मी तर कंटाळलो आहे.


फेसबुक की अन्य कुठल्याशा सोशल मीडियावर कुणा व्यक्तीने राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केली, म्हणून मनसैनिकांनी त्याला उठा बशा काढायला लावल्या - अशी बातमी आहे.


काय कमालीची विसंगती आहे पहा. ज्या पक्षाचा नेता व्यंगचित्रकार म्हणून देशाचे पंतप्रधान, मोठमोठे राजकीय नेते इत्यादींवर हवे तसे तोंडसुख घेण्याचे स्वातंत्र्य बाळगून आहे, त्या नेत्याच्या पक्षाने एखाद्या व्यक्तीला विरोधी मत मांडण्याचा अधिकार देऊ नये? आक्षेपार्ह कमेंट असेल, तर स्वीकारायला नकोच. पण मग कायदेशीर तक्रार करा ना, उठाबशा काढायला लावणे, ही दादागिरी का? की ही पद्धत पक्षीय विचारसरणीचा भाग मानायचा? किती काळ असल्या गुंडगिरीच्या पद्धती राज ठाकरे अवलंबत बसणार आहेत?


एका झटक्यात आलेले १३ आमदार, नाशिकमधील जवळपास ४० नगरसेवक, मुंबईतील ७ पैकी ६ नगरसेवक गमावल्यानंतर सुद्धा आपल्या राजकीय पद्धतीवर फेरविचार करावा, अशी कधी चर्चाही कृष्णकुंजवर होत नसेल का?


आज 'एकला चलो रे' या भूमिकेतून राज ठाकरे यांचा पक्ष जातो आहे. युती, आघाडी, वंचित आघाडी वगैरे तडजोडयुक्त लोंढणे गळ्यात न बांधता जाणारा हा पक्ष तेवढ्यासाठी कौतुकास्पद ठरतो, विविध मुद्द्यांवर थेट, ठाम आणि रोखठोक भूमिका घेतल्याने सुद्धा मनसेचे कौतुक करावे वाटते. मात्र आपल्या पक्षीय क्रिया आणि विचारसरणीचा काहीतरी ताळमेळ कधी बांधला जातो की नाही? की तशी शिकवण कार्यकर्त्यांना दिली जात नाही? की तीच शिकवण आहे? असो.


मूळ मुद्दा मनसेच्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीचा आहे. हे रोज दिवसागणिक वाढत जाणारे फॅड थांबले पाहिजे. यांच्या नेत्याने जाहीर सभेतून 'गांडू'पासून सगळे शब्द वापरावे, हवे तसे व्यंगचित्र काढावे, मात्र यांच्या विरोधात कुणी काहीच बोलू नये, असल्या अपेक्षा ठेवता? स्वतःही तसे वागायला, बोलायला शिका की.


ज्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुणा व्यक्तीला उठाबशा काढायला लावल्या, त्यांनी माझ्या 'गंडलेले नवनिर्माण' या पोस्टवरील मनसेच्या कार्यकर्त्याच्या कमेंट वाचाव्यात. मग उठाबशा काढण्यासाठी शिवाजी पार्क बुक करायला लागेल, इतके अपशब्द वापरणारे खोऱ्याने कार्यकर्ते पक्षातच आहेत, हे कळून येईल. असो.


राज ठाकरे अनेकदा आपल्या भाषणात विविध संदर्भावेळी एक म्हण वापरत असतात, ती म्हणजे, 'आपला तो बाब्या, अन् दुसऱ्याचा तो कार्टा'. हेच आज राज ठाकरेंना सांगावे वाटते.


गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांच्या काही भूमिका पटल्या होत्या. त्यावरुन त्यांच्या बदलत्या राजकीय वाटचालीवर अंदाज बांधावा, भाष्य करावे, तर नेमके हे असले प्रकार करुन आपल्या मूळ पदावर कार्यकर्ते येतात. असो.


राजसाहेब, कार्यकर्त्यांना खरंच समजवा. सर्वसामान्य माणूस भित्रा असतो. मात्र, त्याला एका मर्यादेच्या पलिकडे दादागिरी सहन होत नाही. मग तो जमेल त्या गोष्टीतून विरोध करतो. तुम्हाला मतांमधून तो विरोध दाखवण्यात आला आहे. इतका जालीम अनुभव गाठीशी असताना सुद्धा कार्यकर्त्यांना पाठीशी घालता, हे फारच धाडसाचे आहे. काही विधायक गोष्टी लावून धरा, म्हणजे धरता, पण मध्येच हे प्रकार करता आणि विधायक गोष्टी विसरुन तुमच्या पक्षीय दादागिरीच्या गुणांचीच जास्त चर्चा होते. विधायक गोष्टी मागे पडून जातात. विचार करा जमलं तर.

14 December, 2018

...म्हणून गहलोत-कमलनाथ निवड योग्यच!



मोजून चार महिन्यांवर लोकसभा निवडणुका आहेत. राजस्थानात २५ आणि मध्य प्रदेशात २९ जागा लोकसभेच्या आहेत. म्हणजे सर्वाधिक खासदार असलेल्या राज्यांच्या यादीत हे राज्य येतात. या दोन राज्यात लोकसभेच्या अधिकाधिक जागा जिंकणे हे कुठल्याही पक्षासाठी फायदेशीर ठरेल.

हे लक्षात घेता राहुल गांधी यांनी या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री निवडताना विचार करायला घेतलेला अवधी तुलनेने कमीच आहे. मी तर म्हणतो, उलट खूप वेगात निर्णय घेतला.

एखादे राज्य जिंकणे आणि लोकसभा जिंकून देशाची सत्ता हातात घेणे, यात मोठा फरक आहे. विधानसभा विजयाचा फायदा जर लोकसभा निवडणुकीत होत नसेल, तर काय उपयोग? त्यामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात लोकसभा नजरेसमोर ठेवूनच मुख्यमंत्री निवडला जाणार, हे ओघाने आलेच. किंबहुना, काँग्रेसची आजची स्थिती लक्षात घेता, ती पक्षीय गरज आहे.

राजस्थान आणि मध्य प्रदेशात अनुक्रमे अशोक गहलोत आणि कमलनाथ यांना मुख्यमंत्री करणे, हाच योग्य निर्णय असेल. कारण चार महिन्यांवर लोकसभा निवडणुका असताना, सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असणाऱ्या राज्याचं नेतृत्व अनुभवी नेत्याकडे असणे आवश्यक आहे. कारण राज्यात या चार महिन्यात भरीव काम, प्रशासकीय वचक, पक्षांतर्गत नेते, आमदार यांच्यावर वचक, इतर पक्षांतील नेत्यांना भुरळ घालणे इत्यादी गोष्टींसाठी अनुभव आणि ज्येष्ठत्व गरजेचे आहे. सुदैवाने, काँग्रेसला राजस्थान आणि मध्य प्रदेश अशा दोन्ही राज्यात गहलोत आणि कमलनाथ यांच्या रूपाने असे नेते लाभले आहेत. त्यामुळे त्यांची निवड सुयोग्य म्हणावयास हवी.
 राहता राहिला मुद्दा, सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचा. मुळात या दोन नेत्यांना राज्यातील आमदार किती ऐकतील, हा मुद्दा होता. आणि सद्यस्थितीत काँग्रेसला ते महत्त्वाचे होते. राज्यातील नेत्यांना काबूत ठेवणे गरजेचे आहे. भाजपवाले इतर पक्षांतील नेत्यांना लालसा दाखवण्यात वाकबगार आहे. अशा स्थितीत पायलट आणि शिंदे कमी पडण्याची जास्त शक्यता होती. त्याचवेळी कमलनाथ आणि गहलोत हे अधिक चोख हे काम पार पाडू शकतात .
बाकी नाराजी असणारच. नेमके दोन्ही राज्यात दोन दोन महत्त्वाचे नेते आहेत. त्यात एक तरुण नि एक ज्येष्ठ आहे. त्यामुळे साहजिक आदर्शवादी विचाराने तरुण नेत्याकडे नेतृत्व द्या, ही मागणी जोर धरणारच. पण राजकीय गणिते या आदर्शवादी विचारापेक्षा वेगळी असतात, हे आपण जाणले पाहिजे.

थोडे सकारात्मक अंगाने पाहिले, तर असेही लक्षात येईल की, ज्येष्ठ, बुजुर्ग, वयस्कर नेत्यांना राज्यात ठेवून, राहुल गांधी राष्ट्रीय स्तरावर सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, राजीव सातव इत्यादी तरुण नेत्यांना आणत आहेत. लोकसभेचा प्रचार करताना, या तरुण नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे राहुल गांधींना अधिक सोपे जाईल.

राहुल समंजस वाटतात. विचार करुन, समजून-उमजून निर्णय घेणारे वाटतात. त्यामुळे गहलोत आणि कमलनाथ यांच्या निवडीमागे लोकसभेचा विचार निश्चितपणे केला असेल, यात मला शंका वाटत नाही.

नामदेव अंजना | namdevanjana.com

21 November, 2018

माझं नाव ढोंगीपणा!



संध्याकाळचा किस्सा आहे. दोन सहकाऱ्यांसोबत लोकलने घरी परतत होतो. पत्रकारिता, राजकारण वगैरे चर्चा सुरु असताना, सेना-भाजपच्या कारभाराबाबत चर्चा सुरु होती. तेवढ्यात एकजण म्हणाला, "सेना-भाजप युतीच्या 1995 च्या सत्तेवेळी मी 5-6 वर्षांचा होतो. त्यामुळे त्यावेळी जनतेच्या मनात शिवसेनेबद्दल नेमके काय मत होते आणि त्यावेळीही असाच गदारोळ सुरु असायचा का, सेनेचा असाच दुटप्पीपणा असायचा का, ते माहित नाही. पण त्यानंतर जनतेने पुढे 15 वर्षे यांना का सत्ता दिली नाही, ते मात्र गेल्या साडेतीन-चार वर्षांच्या यांच्या वागण्यातून कळलंय."

किस्सा तसा बोलता-बोलता सांगितलेला असला, तरी यात खरंच आजची जनभावना आहे. येणाऱ्या-जाणाऱ्याशी बोलल्यावर ते कळूनही येतं. इतका दुटप्पीपणा सत्तेचा गाडा हाकण्यातून दिसून येतो. विशेषत: शिवसेनेचा दुटप्पीपणा. आता आपण सेनेबाबत बोलतोय म्हणून विस्तृत बोलायलाच हवे. आता दुटप्पीपणाढोंगीपणा आणि शिवसेना हे शब्द एव्हाना समानार्थी झालेत. त्यामुळे किती आणि काय काय बोलावे, हा प्रश्न असला, तरी बोलायला हवे. शेवटी लोकांपुढे आपण यांचं रुपडं मांडलं पाहिजेच.

फार मागे नको जाऊया. अगदी कालचीच घटना घेऊ आणि मग पुढे बोलत जाऊ. काल नवी मुंबईतील एमआयडीसीच्या 30 एकर जागेवर अनधिकृतरित्या उभारलेलं बावखळेश्वर मंदिर पाडण्यात आलं. बावखळेश्वर, श्रीगणेश आणि लक्ष्मीमाता असे तीन मंदिरांचं एक बावखळेश्वर मंदिर बनलं होतं. खरंतर ते अनधिकृत होतं, त्यात सुप्रीम कोर्टाचा आदेश होता, त्यामुळे तोडकाम हे स्वागतार्हच आहे. मात्र, इथे अनधिकृत मंदिराला समर्थन करण्याचा उद्देश नाही, पण इथेही पाहा कसं शिवसेनेचं ढोंगीपण उघड होतं.

बावखळेश्वर मंदिर हे नवी मुंबई एमआयडीसीत बांधलं गेलं होतं. एमआयडीसीवरील नियंत्रण उद्योग मंत्रालयाकडे असते. उद्योगमंत्री सुभाष देसाई आहेत. सुभाष देसाई हे शिवसेनेचे नेते आहेत.

जोश जगा दो हिंदू में... राम खडे है तंबू में..! असे म्हणत अयोध्येकडे कूच करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना घराशेजारील मंदिर तुटत असताना कुठल्या तंबूत बसली होती? बरं ज्या एमआयडीसीच्या जागेवर हे बावखळेश्वर उभं होतं, त्या एमआयडीसीचे सर्वेसर्वा असलेल्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री यांच्याच पक्षाचे नेते आहेत. मग तिथं जोश नव्हता का दाटून आलाइतकीच मंदिरांची ओढ आहे, तर मग सुभाष देसाईंना सांगून बावखळेश्वर नियमित का केले नाही? बावखळेश्वर या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेने पाडू का दिलंप्रश्न मंदिर अनधिकृत असताना, ते नियमित करण्याचा नाहीय. प्रश्न आहे, यांच्या दुटप्पी आणि ढोंगी राजकारणाचा. मतांसाठी वाट्टेल त्या थराला जाण्याचा यांचा इतिहास आहे.

हे मी दुपारीच एका शिवसैनिकाला सांगत असताना, तो म्हणे, अरे पण बावखळेश्वरचं प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं आणि तिथूनच आदेश होते. या शिवसैनिकांच्या बुद्धीचं पण लई अवघड असतं. अरे बाबांनो, जर बावखळेश्वर मंदिराचं प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं, म्हणून तिथे सेनेचा मंत्री असून काही करु शकत नाही, मग बाबरीचं प्रकरण तर दोन दशकं सुप्रीम कोर्टात आहे, तिथे कुठल्या अत्युच्च आशेने राम मंदिर बांधायला जाता आहात?

हे झालं मंदिरांच्या भावनात्मक राजकारणाबाबत. थोडं ग्राऊंडला यायचं म्हटलं, तरी यांचा ढोंगीपणा काही कमी नाही. राज्यात कमालीचा दुष्काळ आहे. यंदाच्या दुष्काळाची तुलना 1972 च्या भीषण दुष्काळाशी केली जाते आहे. हल्ली पाहतोय, रोज शेतकरी आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. अशा काळात राज्याचा दौरा करण्याचं सोडून हे उद्धव महाराज शेकडो किलोमीटर दूर असलेल्या उत्तर प्रदेशात जाऊन मंदिराचं राजकारण करु पाहत आहेत. राज्याचा दौरा करुन, जनतेच्या खांद्यावर हात ठेवून, आम्ही तुमच्या सोबत आहोत, इतका दिलासा यांच्याकडून अपेक्षित असतो. शासनकर्ते आपल्यासोबत आहेत, आपण कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे किमान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटलं असतं. मात्र, ते सोडून हे महाशय भावनेचं राजकारण करत बसलेत. राज्यात स्थिती काय, आपण करतोय काय, याची कल्पना यांना नसावी? खरंतर असेल कल्पना, मात्र ती कल्पना असतानाही असले भावनेचं राजकारण करण्यात गुंतलेल्या शिवसेनेचा ढोंगीपणा जनतेने आता जाणून घ्यायला हवा.

त्याचं असंय की, उठता-बसता-फिरता-दौरे करता करता-सभा घेता घेता-उठ-सूठ सत्तेला लाथ मारण्याची भाषा करणारी आणि आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो या राणा भीमदेवी थाटात फुशारक्या मारणारी शिवसेना आता बावचाळलीय. याचं कारण स्पष्ट आहे. गेली साडेतीन-चार वर्षे दुटप्पीपणाची हद्द यांनी पार केली. सत्तेतून बाहेर पडण्याची वेळही सरुन गेली. सत्तेतून बाहेर पडण्यासाठी अनेकदा संधी आल्या. त्यावेळी त्या त्या मुद्द्यावर सेना सत्तेतून बाहेर पडली असती, तर एक सहानुभूती गोळा करता आली असती. तीही आता मिळणार नाही. कारण आता सत्तेतून बाहेर पडली, तर निवडणुका वर्षभरात असताना, खाऊन-पिऊन बाहेर पडले, असे चित्र निर्माण होईल. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे सेना बावचाळलीय. मग आता लोकांसमोर कसं जायचं, तर मग राम मंदिर असो किंवा इतर भावनेचं राजकारण करत जायचं. कारण भावनेच्या राजकारणाला इथली जनता सहज (दुर्दैवाने!) बळी पडते, हे यांना चांगले ठाऊक आहे. मात्र, आता जनतेनेही समजून-उमजून यांच्याकडे पाहिले पाहिजे.

जनतेला गृहित धरणे, हे सेनेचे आता तत्व झाले आहे. एरवी आशिष शेलारांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि रावसाहेब दानवेंपासून अमित शाह आणि नरेंद्र मोदींपर्यंत कधी 'समाना'तून, तर कधी कथित विराट सभेतून, टीकेची झोड उठवणारे हे उद्धव ठाकरे अटीतटीच्या वेळी मात्र तलवार म्यान करुन लपून बसतात. हेच अविश्वासाच्या ठरावावेळी आणि त्याआधी व त्यानंतरही अनेकदा या महाराष्ट्राने पाहिले आहे.

सत्तेला विरोध करणं, ही केवळ विरोधकांचीच मालकी आहे, अशातला भाग नाही. सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांच्या कोणत्या निर्णयाला विरोधच करायचा नाही, असेही नाही. पण त्यात दुटप्पीपणा नसावा. सेनेच्या बोलण्यात आणि चालण्यात अंतर दिसतो. दुटप्पीपणा दिसतो. ढोंगीपणा दिसतो.

2014 साली सत्तेत येण्यासाठी सेनेच्या जाहिरातीत तुझं नाव काय?’ या प्रश्नाला उत्तर देताना माझं नाव शिवसेना असं उत्तर येत होतं. आता सेनेने प्रश्न तोच ठेवून, उत्तरात फक्त बदल करुन, माझं नाव ढोंगीपणा’ असं म्हणावं. म्हणजे उत्तराला परिपूर्णता प्राप्त होईल.

नामदेव अंजना www.namdevanjana.com

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...