03 May, 2017

असाही पाकिस्तान


निस्बेट रोड. थांबा... फक्त नावावरुन मत ठरवण्याची अस्सलभारतीय चूककरु नका. हा काही लंडन, न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन वगैरेमधील रोड नाही. तुम्हाला आतापर्यंत तसंच काहीसं वाटलं असेल. त्यात नवल नाही. आपण भारतीय आहोत म्हटल्यावर. आणि त्यातही शितावरुन भाताची परीक्षा घेण्यात माहीर असणारे. असो. तर निस्बेट रोड आहे लाहोरमध्ये. चला, लाहोर म्हटलं की पाकिस्तान. म्हणजे आपला दुश्मन. पण त्याआधी निस्बेट रोडबद्दल दोन-तीन गोष्टी तरी ऐकून घ्या.

या निस्बेटरोडवर सरदार दयाळसिंग मजिथिया यांचं भव्य स्मारक आहे. अगदी दिमाखात. मजिथिया म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेत ज्यांच सहभाग होता, त्यांपैकी एक. अत्यंत पुरोगामी विचारांचे. राम मोहन रॉय यांच्या विचारांचे पाईक.

पहिली स्वदेशी बँक म्हणून ओळख असणाऱ्यापंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या संचालक मंडळातही दयाळसिंग होते आणि काही काळ याच बँकेचे अध्यक्षही. किंबहुना पंजाब नॅशनल बँकेची स्थापनाच 23 मे 1894 रोजी दयाळसिंग यांच्या घरी झाली. तर या दयाळसिंग यांच्या देणगीतूनचदयाळसिंग लायब्ररीसुरु झाली.

निस्बेट रोडवरील या दयाळसिंग लायब्ररीचा भारताशी खूप घनिष्ठ वगैरै संबंध आहे. या लायब्ररीत लोकमान्य टिळांचे तीन कार्ड सापडतात. अगदी आजही. आर्क्टिक होम इन वेदाज, ओरायन आणि तिसरं म्हणजे गीतारहस्य.

आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मंडाळेचा तुरुंगवास भोगून आल्यानंतर टिळकांनी गीतारहस्य प्रकाशित केलं. त्यातील एक प्रत त्यांनी लाला लजपतराय यांना दिली. लालांना दिलेली प्रत या लायब्ररीत आहे. महाभारत, रामायण हे ग्रंथही तिथे आहेत. ‘सुरक्षित’.

वर जसं म्हटलंय ना, हे निस्बेट रोड थोडं वेगळं प्रकरण आहे. या रोडवर पावला-पावलावर भारताच्या खुणा आजही आढळतात. पाकिस्तानातील वेगवेगळ्या हुकुमशाही सरकारने त्या पुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही आठवणी पुसल्या जात नाहीत. अगदी तसंच झालं आणि अनेक आठवणी, ज्या भारताशी संबंधित आहेत, त्या राहिल्या. इथल्या संवदेनशील मनाने त्या प्राणपणाने जपल्याही. त्यातलीच आणखी एकगीता भवन

लाहोरमधील निस्बेट रोडवरील ज्या दयाळसिंग लायब्ररीचा वर उल्लेख केला, त्याच लायब्ररीच्या समोरील बाजूस हे गीता भवन आहे. या गीता भवनाच्या खुणा आजही शिल्लक आहेत. हे भवन सेवकराम यांनी बांधलं. सेवकराम यांचे वडील गंगाराम हे लाहोरमधील त्याकाळचे सेवाभावी गृहस्थ. गंगाराम यांनी तिथल्या गरिबांसाठी एक हॉस्पिटलही काढलं. सर गंगाराम हॉस्पिटल म्हणून आजही ते प्रसिद्ध आहे.

पुढे पाकिस्तानमधील लष्करशहा झिया उल हक यांच्या इस्लामीकरणाच्या रेट्यात गीता भवनवरही हातोडा चालवला गेला. तरीही इमारतीच्या मध्यवर्ती भागात आजही दोन हत्तींच्या शिल्पामध्येगीता भवनहे देवनागरीतलं नाव रुबाबाने दिसतं.

निस्बेट रोडवर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या भारताशी संबंधित आहेत. याच परिसरात मुस्लिम लीगचं अधिवेशन भरलं होतं, ज्या अधिवेशनात स्वत: लोकमान्य टिळक उपस्थित होते. याच अधिवेशनात मोहम्मद अली जीनांनी हिंदू सणांच्या दिवशी गोहत्या करण्याचा प्रस्ताव मांडून संमत केला होता. याच परिसरात नॅशनल कॉलेज आहे, ज्यात शूरवीर भगतसिंग शिकला. आणि भगतसिंग शिकला, त्या काळात कॉलेजचे प्राचार्य होते छबिल दास. याच निस्बेट रोडच्या भागात महाराज गुलाबसिगं यांचा महाल होता. वगैरे वगैरे. खूप काही. तर निस्बेट रोड असा आहे.

हे जे काही सांगितलं, ते काही माझ्या मनातलं नाही. हे सारं पाकिस्तानात राहून, फिरुन, देश समजून घेतलेल्या माणसाने सांगितलंय. अरविंद गोखले यांनी. गोखलेंचंअसाही पाकिस्ताननुकतंच वाचून पूर्ण केलं. त्या पुस्तकाबद्दल राहून मला लिहावं वाटलं.

या पुस्तकाच्या टॅगलाईनसारखेच यातील लेख आहेत. टॅगलाईन आहे – ‘साहित्य, संस्कृती कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान...’.

खरंच खूप वेगळा पाकिस्तान अरविंद गोखलेंनी 34 लेखांमधून मांडला आहे. शेवट-शेवटचे 1-2 लेख सोडले, तर कुठल्याही लेखाला कुठेही राजकीय स्पर्श नाही. सगळे लेख तिथल्या लोकांविषयी, भारताशी मिळत्या-जुळत्या परंपरांविषयी, ऐतिहासिक नातेसंबंधांविषयी, लोकसंस्कृतीविषयी, वास्तूंविषयी, अखंड भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील आठवणींविषयी...आणि बरंच काही.

सिलसिलापिक्चरमधल्या एका गाण्यात एक ओळ आहे, ‘मजबूर ये हालात, इधर भी है, उधर भीतसं काहीतरी या दोन्ही देशांमधील लोकांमध्ये असल्यासारखं या पुस्तकातून वाटलं. तिथली माणसं आणि इथली माणसं यांमध्ये काहीही फरक नाही. तिच कथा, तिच व्यथा आहे.

राजकारण, प्रशासन, लष्कर या तीन गोष्टींनी पाकिस्तानला बरबाद केलं आणि आपणही या तीनच गोष्टींमधून पाकिस्तानकडे पाहतो. मात्र, तिथली तळागाळातली स्थिती वेगळी आहे. तिथेही आपल्यासारखी हाडामासाची माणसं आहे, ज्यांचीही रोजच्या जगण्यासाठी धावपळ सुरु आहे. आपल्याइथे जसं बाबा आमटे तसं तिथे अब्दुल सत्तार इधी होते. असं खूप काही.

अनेक पाकिस्तानी लोकांना भारताबद्दल आजही आकर्षण आहे, कुतुहल आहे. आपली जन्मभूमी कशी असेल, याची उत्सुकता आजही तिथल्या म्हाताऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. जाणवते.

अगदी आताचाच प्रसंग सागायचा तर जावेद सिद्दिकी लिखितबेगम जानहे नाटक पाकिस्तानी रंगभूमीवर तुफान गाजलं. 600 रुपये पर हेड तिकीट असतानाही पाकिस्तानी नाट्यरसिकांनी ते डोक्यावर उचलून धरलं.

जावेद सिद्दिकी भारतात तसा प्रसिद्द आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, उमराव जान, कोई मिल गया, बाजीगर यांसारख्या सिनेमांचं कथालेखन सिद्दिकीने केलंय. त्याच्याच कथेवर आधारीत पाकिस्तानातील बेगम जान नाटक आहे. या सिद्दिकीने पाकिस्तानी निर्मात्याकडून या नाटकाचं मानधन म्हणून काय मागितलं असेल? सिद्दिकी म्हणाला, “पाकिस्तानी रंगभूमीवर माझं नाटक सादर झाल्याचे फक्त फोटो पाठवून द्या, बस्स तेच मानधन.”. सिद्दिकीच्या या दिलदारपणाला पाकिस्तानी नाट्यरसिकांनाही मोठ्या मनाने दाद दिली आणि 600 रुपये पर हेड तिकीट असतानाही हाऊस फुल्ल नाटक चाललं.

जावेद सिद्दिकीचं नाटक पाकिस्तानात चाललं, ते अदृश्य ऋणानुबंधांवरच. अर्थात कथाही त्या तोडीची होती. पण त्या कथेला भारतभूमीच्या ओढीची भावनाही चिटकली होती.

पाकिस्तानी क्रिकेट टीमचा लेग स्पिनर म्हणून दानिश कनेरियाने चमकदार कामगिरी बजावली. तो लेग स्पिनचा आधार ठरला. फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात नाव कमावलेले दीपक फेरवानी कराचीत राहतात. न्यायमूर्ती राणा भगवानदास हे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. कराचीतील शिवमंदिराचे पुजारी म्हणून मोहन गायकवाड नावाचा माणूस काम पाहतो.... एक ना अनेक नावं, पदं, उदाहरणं आहेत, ज्यातून पाकिस्तानात भारताच्या खाणा-खुणा आढळतात.

पाकिस्तानात अजूनही भारतमातेच्या खाणा-खुणा कशाप्रकारे दडल्या आहेत, त्या तिथल्या लोकांनी आजही कशाप्रकारे जोपासल्या आहेत, हे पाना-पानावर सांगण्याचा प्रयत्न अरविंद गोखले यांनी केला आहे.

दोन देशातील लोकसंस्कृतीत किती साम्य आहे, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवंच. शिवाय, माहिती, आकडेवारी यांची जोड आहेच. त्याचसोबत काही गोष्टी अतुट असतात, ते अनुभवण्यासाठीही हे पुस्तक वाचायला हवं, असं वाटतं.

माझ्या वाचकांच्या माहितीसाठी :
पुस्तकाचं नाव - असाही पाकिस्तान
प्रकाशन - रोहन प्रकाशन

20 March, 2017

संघर्ष जारी रहेगा !

(दिवसभर अन्नत्याग केल्यानंतर संध्याकाळी मुंबईतील मनोरा आमदार निवाससमोरील हिरवळीवर उपोषण सोडलं.)


शेताच्या बांधावर घाम गाळून त्याच मातीत गुडूप झालेला बाप आणि सालभर राब राब राबून पिकाला भाव मिळत नाही म्हणून उजाड माथ्याने आसवं गाळत शेताच्या बांधावर धैर्य एकवटत कणखर बनू पाहणारी माय....तुमच्यासाठी होता कालचा दिवस.

मातीत झिजलेल्या अन् घामाने भिजलेल्या हर एका पोशिंद्यासाठी काल एक दिवस अन्नत्याग केला. १९ मार्च निमित्त ठरलं, सहवेदना आणि तळमळ दिस-रात असतेच. शेवटी जगवतोय तो मला. झगमगाटी मुंबईत चेहरा लखाखती राहत असला, तरी काळजाला चिटकलेली माती आजन्म तशीच राहील.
(मुंबईतील उपोषणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा मित्र ब्रम्हा चट्टे ज्यूस पित उपोषण सोडताना. गालाला हात टेकून ब्रम्हाकडे पाहणारा कृष्णा वर्पे आणि काळ्या कुर्त्यावर मी स्वत:)

दिवसभर उपाशीपोटी काम करत उपोषणात सहभाग घेतला. यातून काय साध्य झालं, हा मुद्दा नाही. मनात खदखद आहे, ती जिवंत आहे ना, हे चाचपडून पाहिलं. बस्स. वेळीच लक्ष घाला राजेहो, खदखद फार तग धरुन ठेवता येत नाही. आमचा बा शेतकरी जगला पाहिजे राजेहो.
(मुंबईतील किसानपुत्र)

एका दिवसाच्या अन्नत्यागाने कितीसा फरक पडेल, माहित नाही. पण दिवसातल्या प्रत्येक क्षणाने जी खदखद वाढवलीय, तिच्याने नक्कीच फरक पडेल, एवढं निश्चित.

दिवसभर काम करता करता केलेल्या उपोषणानंतर मनोरा आमदार निवासासमोरील हिरवळीच्या साक्षीने उपोषण सोडलं. समविचारी समवीयन आणि ज्येष्ठांच्या सोबतीने. मुंबईतील किसानपुत्रांनीही अमर हबीब सरांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत पुढाकार घेतला. आणखी सहभाग अपेक्षित होता. पण ठीकंय. निराशावादी सहभाग नक्कीच नव्हता. चित्र आशादायी आहे. संघर्ष जारी रहेगा !

12 March, 2017

केजरीवालांनी ‘करुन दाखवलं’ !



शिक्षण क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज आहे वगैरे नेहमीच चर्चेचा विषय असतो. मग चर्चा अर्थात सरकारच्या ध्येय-धोरणांपर्यंत येऊन ठेपते. मग सुरु होते पुढील चर्चा, ती म्हणजे सरकारने बजेटमध्ये शिक्षणावर किती खर्च केला वगैरे. आणि अर्थात समोर येतं, सरकारने शिक्षणावर बजेटमधील नाममात्र भाग खर्च केलाय. मग टीका, सूचना, सल्ले वगैरे रांगेत असतातच.

शिक्षणावर अधिक खर्च होण्याची गरज आहे, हे खरंय. ते सरकारला का कळत नाही, हा नक्कीच कळीचा मुद्दा आहे. पण ज्यांना कळलाय, त्याची वाहवा तरी कुठे होतेय? पाहा ना अरविंद केजरीवाल यांच्यावर दिवस-रात्र आपली तोफ डागणारे आज गप्प आहेत. कारण सकारात्मक गोष्टींवर न बोलता, केवळ टीकेसाठी मुद्दे शोधली जातात.

केजरीवालांनी असं काय केलंय, ज्यामुळे त्यांची वाहवा करण्याची गरज आहे? तर त्यांनी नक्कीच अत्यंत मोठं आणि स्तुत्य असं पाऊल उचललं आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने दिल्लीचा 2017-18 चा बजेट सादर केला. मनीष सिसोदियांनी मांडलेला हा बजेट एकूण 48 हजार कोटींचा आहे. विशेष म्हणजे, केजरीवाल सरकारने 48 हजार कोटींपैकी 24 टक्के भाग म्हणजे सुमारे 11 हजार 300 कोटी रुपये फक्त आणि फक्त शिक्षण क्षेत्रावर खर्च करण्याचं ठरवलंय. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी खऱ्या अर्थाने करुन दाखवलंआहे.

शिक्षण क्षेत्रातील विविध योजना, शाळेची कामं, अनुदान इत्यादींसाठी हा खर्च असणाराय. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसोबतच आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जाणाराय. हे एकच नव्हे. यातील अत्यंत स्तुत्य काय असेल, तर संगणक कक्ष आणि ग्रंथालयांची संख्या वाढवली जाणार आहे आणि त्यासाठीच अधिक खर्च असेल. सोबत, शाळेतील खोल्यांची संख्या वाढवणं वगैरे आणखी गोष्टी आहेतच.

यात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, केजरीवालांनी बजेटीमधील शिक्षणावरील तरतूद तीन वर्षे वाढवतच नेली आहे. केजरीवाल सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये शिक्षणावर 9,836 कोटी रुपये खर्च, दुसऱ्या बजेटमध्ये 10,690 कोटी रुपये खर्च करण्यात आला, तर तिसऱ्या बजेटमध्ये म्हणजे आताच्या बजेटमध्ये 11,300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांकडे सरकारने गांभिर्याने पाहायला हवं. या क्षेत्रात अत्यंत सचोटीने काम करायला हवं वगैरे बोललं जातं. विशेष म्हणजे सरकारी पातळीवरही असं बोललं जातं. मात्र, प्रत्यक्षात काहीही दिसत नाही. केजरीवालांनी ते प्रत्यक्षात करुन दाखवलंय, हे विशेष.

तळागाळात काम केलेल्या, सामाजिक जाणीव असलेल्या या रॅमन मॅगसेसेपुरस्कार विजेत्या माणसाकडून अशाप्रकारचं काम नक्कीच अपेक्षित होतं. कितीही टीका होवो, वेगवेगळे प्रयोग हा माणूस आपल्या राज्यात राबवत आहे. अनेकदा त्यांना जाणीवपूर्वक ट्रोल केलं जातं, पण त्याकडे दुर्लक्ष करुन आपलं काम सुरुच ठेवत आहेत, हे विशेष.


सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...